Sunday, January 10, 2021

पितात सारे गोड हिवाळा - रसग्रहण

 पितात सारे गोड हिवाळा - बा. सी. मर्ढेकर 

बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर हे मराठीतले एक नामवंत कवी. मर्ढेकरांचा जन्म १९०९ चा तर १९५६ ला त्यांचं निधन झालं. उण्यापुऱ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठी कवितेला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. मर्ढेकरांच्या कवितेची ठळक लक्षणं सांगायची झाली तर, नावीन्यपूर्ण प्रतिमांचा वापर , रचनेमधील नवता आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर शहरी जीवनाच्या जाणिवांचे चित्रण. हे करताना त्यांनी प्रस्थापित मराठी कवितेचा ढाचा बदलला आणि स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. 

आजची त्यांची कविता , पितात सारे गोड हिवाळा ही मुंबईतल्या हिवाळ्याच्या दिवसाची कविता. पहाट आणि सकाळ ह्यांच्या सिमरेषेवरची ही कविता आणि त्यासोबत आजूवाजुला घडणारे बदल मर्ढेकरांनि टिपलेत. 

वर सांगितलेली त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये या कवितेत प्रकर्षाने जाणवतात. 

पहाटेच्या मुंबईला न्हायलेल्या गर्भवतीच्या सौंदर्याची उपमा देणे असो किंवा मग झोपेतून जाग येण्याला , "डोकी अलगद घरे उचलती , काळोखाच्या उशिवरूनी" असं म्हणणं असो. प्रतिमांमधला नावीन्यपूर्णपणा दिसतो तो असा . 

मर्ढेकरांच्या आधीची मराठी कविता छंदोबद्ध, गेय अशी होती . मर्ढेकरांच्या कवितेतील रचनेचं वेगळेपण या कवितेत दिसतं ते पहिल्या कडव्यातच. 

तर अशी ही कविता पहाटेच्या मुंबई शहराचं वर्णन करणारी आणि मग शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो ,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा

अजस्त्र धांदल क्षणात देई , जिवंततेचे अर्घ्य भास्करा. 

साधारण १९४०-४५ च्या दरम्यान टिपलेली मुंबईच्या पोटातली ही धांदल , मुंबईचं हे स्पिरिट , मुंबईची धावपळ आजही तशीच आहे. मर्ढेकर आज नाहीत, १९४०-५० ची मुंबई आज नाही पण मुंबईची धांदल मात्र आजही आहे आणि उद्याही राहील आणि उगवत्या सूर्याला जिवंततेचे अर्घ्य देत राहील.


- अभिषेक राऊत 

Sunday, April 5, 2020

मलानाच्या गोष्टी - भाग 2










पहिला भाग इथे वाचा.

https://abhishsays.blogspot.com/2019/02/blog-post.html?m=1


मलानाच्या गोष्टी - भाग  2


मलाना गांव मे आपका स्वागत हैं असं लिहिलेल्या बोर्डखाली उभं राहून सभोवार नजर टाकली तर गाव काही नजरेच्या टप्प्यात येत नाही. ते लपलेलं असतं टेकडीच्या कुशीत. मग आजूबाजूचा निसर्ग डोळ्यांत साठवत चालत राहायचं. वाटेत पार्वती नदीचा खळाळणारा अल्लडपणा असतोच. या पार्वती नदीची फार  रंजक गोष्ट आहे. मलाना आणि त्याच्या आसपासचा पार्वती वॅलीचा भाग शंकराच्या फार आवडीचा. (याचं कारण इथलं निसर्ग सौंदर्य असावं की उच्च प्रतीचा गांजा??,  तुम्हाला खरं सांगतो, गाडी थांबवून रस्त्याकडेला उगवलेल्या गांजाच्या रोपट्याचं हिरवंकंच पान आणून हातात दिलेलं ड्राइवरने, म्हणजे इतकी मुबलकता हो.) तर शंकर थेट इथं तपश्चर्याच  करायला आले. बरीच वर्षं तपश्चर्या केल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि या खळाळत्या नदीच्या आणि तिच्या नितांत सुंदर  खोऱ्याचा  नजारा बघून त्यांना आपल्या बायकोच्या सौंदर्याची  आठवण आली. (म्हणजे एवढी वर्षं तपश्चर्या करून माणसाला विरक्ती वगैरे येईल तर तसलं काही नाही डोळे उघडल्या उघडल्या आठवलं काय तर बायकोचं सौंदर्य !!) आणि मग त्या नदीचं नाव पडलं पार्वती. हिमालयातल्या हिमनदीतून उगम पावणारी ही पार्वती कुठल्याश्या असीम ओढीने आणि वेगाने बियास नदीला मिळते. तिच्या थंडगार फेसाळत्या पाण्यात पाय बुडवून बसायचं क्षणभर. बरं वाटतं. मलानाच्या वेशीपाशी थंडगार असणारं हे पाणी पुढे पवित्र माणिकरणला पोहोचतं तेव्हा वाफाळतं आणि गरम असतं. इतकं गरम की तिथल्या शंकराच्या मंदिरात भाविक लोक कापडी पिशवीत डाळ नेतात आणि त्या उकळत्या पाण्यात ती शिजली की तोच प्रसाद महादेवाला चढवतात. माणिकरण साहिब गुरुद्वाराच्या समोरून जेव्हा ही पार्वती जात असते, तेव्हा ती अक्षरशः "hot & wild" म्हणावी अशी असते. जणु काही कधी एकदा जाऊन बियास नदीच्या खांद्यावर हात ठेवतेय आणि प्रवासातल्या सगळ्या गप्पा सांगतेय असंच वाटत असावं तिला.
पार्वतीच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसल्याचं समाधान  मिळालं की मग उठायचं,  मलाना  लांब असतंय अजून. एक छोटासा पूल ओलांडून पार्वतीला निरोप द्यायचा. तुम्ही तुमच्या वाटेनं जायचं आणि ती तिच्या वाटेनं जाते. अरुंद, बऱ्यापैकी चढाची पायवाट चालताना दम लागलाच तर कडेच्या दगडावर जरासं टेकायचं. चालता चालता तुम्हाला सामान वाहून नेणाऱ्या गावातल्या बायका दिसू शकतात.
गावच्या दिशेने जाईस्तोवर रस्त्यात 3-4 टपऱ्या असतायेत. ते लोक मॅगी, मोमोस, कोल्ड ड्रिंक, सिगरेट वगैरे असलं काही विकतात. सोबत त्या टपऱ्यांमध्ये सतत ट्रान्स चालू असतं. गांजा पण मिळू शकत असावा कदाचित. आताशा मलाना बऱ्यापैकी फेमस झालेलंय त्यामुळे सोलो ट्रेकर्स असतात,  काही 3-4 जणांचे ग्रुप्स असतात त्यांची सोबत होतेच वर पोहोचेपर्यंत.
गाव नजरेच्या टप्प्यात येतं तेव्हा दिसतात रस्त्याकडेला खेळणाऱ्या छोट्या मुली. किंवा मग त्याच अरुंद रस्त्यांवर धावत धावत पकडापकडी खेळणारी छोटी मुलं. आताशा बऱ्यापैकी जवळ आलेलो असतो आपण गावाच्या. अर्धा पाऊण तासाच्या या ट्रेक मध्ये बायकोची सॅंडल तुटलेली असते. गावात गेल्यावर घेऊ असं तुम्ही म्हणता पण मलाना मध्ये सॅंडल मिळते का,  जीवनावश्यक वस्तू मिळतात का याबद्दल कुठल्याच ट्रॅव्हल ब्लॉग वाल्यानं लिहिलेलं नसतंय. विचार करत करत तुम्ही चालत राहता आणि एका क्षणी पायवाट संपते. रस्ता थोडासा निमुळता होतो आणि तुम्हाला,  डाव्या बाजूला सार्वजनिक संडास दिसतं.   त्यावरच गांधीजींचा चष्मा काढून स्वच्छ भारत लिहिलेलं असतं. शेजारीच एका छोटासा चर असतो त्यातून त्यातलं सांडपाणी वाहत असतं. गावातले लोक स्वतःला इतर भारतीयांपेक्षा  कितीही उच्च समजो,  हे गाव भारतातलं आहे याचा यापेक्षा ढळढळीत स्टॅम्प दुसरा कुठला असणार. अजून अजून आत शिरतो तसं तसं मलाना उलगडत जातं. लाकडाची एक वखार लागते उजव्या हाताला. त्यात बसलेले असतात विशी पंचविशीचे तरुण, गांजा मळत. थोडंसं पुढे गेलं की डाव्या हाताला एक मंदिर असतं.  त्यावर स्पष्टपणे या मंदिराला बाहेरच्यांनी हात लावू नये असं लिहिलेलं असतं. मग थोडीशी घरं असतात दोन्ही बाजूला. काथकुनी पद्धतीने बांधलेली. एक मजली. वरच्या मजल्याच्या लाकडी खिडक्यांतून लहान लहान मुलं,  मुली हसत,  खिदळत बघत असतात तुमच्याकडे. थोडंसं अजून चाललं की मग तुम्ही पोहोचता एका प्रशस्त मोकळ्या जागी. गावची चावडी असं म्हणायला काही हरकत नाही. तिथेच जमदग्नींच मंदिर आहे एका चौथऱ्यावर. मलानावासियांचा जमलू ऋषी.  साहजिकच, बाहेरच्यांना त्या चौथऱ्यावर जायलाही मनाई असते. डाव्या बाजूच्या चौथऱ्यावर बसलेले असतात गावातले ज्येष्ठ नागरिक. हवापाण्याच्या गप्पा मारत असावेत किंवा आमच्या वेळी इतके बाहेरचे लोक नव्हते हो येत बघायला असं म्हणत असावेत. असा अंदाज बांधायचा कारण त्यांची भाषा तर काही कळत नाही आपल्याला. पुढं चालत जायचं. एखादा म्हातारा मागनं हाक मारतो, गांजा हवाय का विचारतोच इशाऱ्यानेच . पुढच्या कोपऱ्यात अधिकृत शिधावाटप दुकान असतंय.  एक वयस्कर व्यक्ती बसलेली असते गल्ल्यावर. आणि त्याच्या समोर जरा स्टेशनरी, इकड तिकडचं सामान मिळणारं दुकान. बायको इतक्या वेळ अनवाणी चालतेय याची जाणीव होते आणि मग विचार करतो,  चला बघूयात सॅन्डल मिळेल का. दुकान ज्या चौथऱ्यावर असतं तिथून साधारण अर्धा हात लांब उभं राहायला सांगतो दुकानदार. पायाची साईझ सांगितल्यावर तो एकच कम्पनीच्या दोन रंगांच्या (लाल आणि निळा. केवढी ती व्हरायटी!!!) सॅंडल काढून दाखवतो. तिथे सापडते सॅन्डल, आणि मग ती वेळ येते,  जेव्हा दुकानदार ती सॅन्डल पॅक करतो, बाजूला ठेवलेल्या एका चार -पाच  फुटी काठीने ते पॅकेट सरकवत अगदीच चौथऱ्याच्या बाहेर ढकलतो. मग तुम्ही तिथेच चौथऱ्यावर पैसे ठेवायचे. त्याच काठीने तो पुन्हा ते  आपल्याकडे ओढून घेतो. बाहेरच्यांना हात लावायचा नाही ही समजूत जपत एक 'ट्रेड' पूर्ण होतो. खरंतर तुम्ही अगदी प्रत्येक ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये वाचलेलं असतं, अशी वागणूक मिळणारे हे माहित असतं तुम्हाला तरीही लागतंच कुठेतरी आत. एका क्षणात, या देशातल्या एका विशिष्ट समाजाने जातीभेदापायी काय काय भोगलं असेल हे अगदी स्पष्ट जाणवून जातं. अर्थातच फार काळ गावात रेंगाळून चालणार नसतं,  एकतर कुठल्याच चौथऱ्यावर बसायची परवानगी नसते, राहायची बंदी असते, चावडीवरचे म्हातारे फार काही सलगी दाखवणार नसतात,  दिवस उतरणीला लागलेला असतो, ड्रायवर वाट बघत असतो.
आज मी जेव्हा मलानाची भेट आठवतो तेव्हा मला स्पष्टपणे  हे सगळं आठवतं. गावात शिरल्यानंतर जाणवलेलं एक गूढ वातावरण आठवतं. एक थबकलेपण असावं त्या गावातच असं वाटलेलं मला. जणु काही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही वगैरे त्याच जुन्या काळात थांबून राहिली असावी.
थोडक्यात,  "मलाना गांव में आपका स्वागत हैं" असं फक्त कमानीवर लिहिलेलंय बाकी स्वागताच्या व्हाइब्स कुणाकडूनच मिळत नाहीत. ना गावकऱ्यांकडून ना गावाकडून.

अभिषेक राऊत 

Monday, December 9, 2019

डायना मावशी आणि शनिवारची दुपार.

 डायना मावशी अर्थात प्रिन्सेस डायना हिच्या बद्दल मला सगळ्यात पहिले ज्या पद्धतीने कळलं तो दिवस हा खरंतर तिच्या अपघाती मृत्यूचा होता. मी आणि आई हॉल मध्ये गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि घरचा दरवाजा उघडाच होता. (त्या काळी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या शेजार्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असायचे आणि शक्यतो संध्याकाळी सगळ्यांचेच दरवाजे उघडेच असायचे. ) आमच्या शेजारचा दादा धावत आमच्या घरी आला आणि म्हणाला, "अहो काकू,  डायना मावशी गेली. या ना टीव्ही वर दाखवतायेत..".  त्या क्षणाला माझ्या डोक्यात दोन - तीन  प्रश्न आले ते मला स्पष्टपणे आठवतायत. एक म्हणजे, पाटील आडनाव असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मावशीचं नाव डायना कसं काय असू शकतं??  आणि समजा असलंच तरी मावशी गेल्याचं कोणी हसत,  धावत येऊन कसं काय सांगेल?? आणि त्या ही पलीकडे ही मावशी इतकी फेमस आहे की ती गेल्याचं टीव्हीवर दाखवतायेत???
नंतर लक्षात आलं की ही डायना म्हणजे इंग्लंडच्या राणीची सून, युवराज चार्ल्सची बायको. तिचा मृत्यू झाला,  अपघातात.  सौदीच्या उद्योगपतीसोबत गाडीत असताना मागावर असणाऱ्या "पापाराझीं" पासून बचाव करताना. अर्थात पापाराझीं चा अर्थ मला दुसऱ्या दिवशी मराठी वृत्तपत्रांतून कळला.
नंतर जवळजवळ आठवडाभर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये  डायनाबद्दल लिहून येत होतं. ते कळण्याइतका मोठा मी नव्हतो तेव्हा.  पण  अर्थातच डायना बद्दलचं कुतूहल संपलं नव्हतं. नंतर काही वर्षांनी मी डायना बद्दल,  तिच्या आयुष्याबद्दल,  तिच्या चार्ल्स सोबत बिघडलेल्या संबंधांबद्दल वाचलं. तिचा अपघात,  त्या मागच्या थिअरी वाचल्या. तिचे निळे डोळे, गळ्यातली मोत्यांची माळ आणि देखणं हसू यात काहीतरी मेस्मराइजिंग वाटायचं. प्रसारमाध्यमांनी तिची उभी केलेली "आहे मनोहर तरी  गमते उदास " ही प्रतिमा मनात रुतून बसलेली.
शनिवारच्या निवांत दुपारी हाईड पार्कच्या हिरवळी वरून चालताना हे आठवत होतं. डायना मेमोरियल फौंटन बघायचं होतं. या मेमोरियल कडे जाण्याचा रस्ता फार सुरेख आहे. त्याचं नावच मुळात "द डायना,  प्रिन्सेस ऑफ वेल्स मेमोरियल वॉक "
एका बाजूला हाईड पार्कची हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला सर्पेंटिने तळ्याचा काठ. निवांत दुपारी नौकाविहार करणारे टुरिस्ट,  तळ्याकाठने डौलात विहरणारे राजहंस बघत बघत चालत राहायचं. मेमोरियल कडे जाणाऱ्या मार्गात दर दीडशे मीटरवर,  पंचधातूचं गुलाबाचं फूल कोरलंय. चालता चालता त्या गुलाबाच्या फुलाकडे नजर जातेच. एल्टन जॉनने डायनाच्या अंत्यविधीला गायलेलं,  "गुडबाय इंग्लंडस रोज, मे यु एव्हर ग्रो इन  आवर हार्ट्स" हे गाणं नकळत कानात वाजायला लागतं. जगभरात अंदाजे अडीचशे कोटी लोकांनी तिच्या अंतिम निरोपाचा प्रसंग पाहिला. आज सुद्धा तिच्या मेमोरियल फौंटनला वर्षाला आठ लाख लोक भेट देतात. बावीस वर्षांनंतरही डायनाचं गारुड कमी होत नाही.
‌मेमोरियल फाऊंटनच्या दरवाजातच तिचा हसरा फोटो लावलाय. आत शिरताच लक्षात येतं हे "This is not a regular fountain".   हाईड पार्कच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करत, कॉर्निश ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे कारंजे रूढार्थाने कारंजासारखे नाहीच मुळी. या कारंज्याचं पाणी थुईथुई नाचत नाही. यातलं पाणी वाहतं. खळाळतं. आजूबाजूला हिरवाई आणि मध्येही  हिरवाई. त्यामध्ये बांधलेल्या ग्रॅनाइटच्या घळीतून पाण्याचा हा प्रवाह अखंड सुरु राहतो. इतर कारंज्यांसारखं नुसतं कडेकडेने फिरायचं आणि चार हात लांबून सौंदर्य बघायचं असं इथं नाही.  एक छोटीशी पायवाट तुम्हाला थेट कारंज्याच्या मध्यात असलेल्या हिरवळीवर आणून सोडते. सभोवार नजर टाकली की दिसतात वाहणाऱ्या पाण्यात खेळणारी लहान मुलं. एकमेकांच्या अंगावर कारंज्याचं पाणी उडवणारं तरुण जोडपं किंवा मग नुसतंच पाण्यात पाय सोडून बसलेली इंग्लिश आज्जी. कारंज्याच्या मध्यातून पुन्हा त्याच्या कडेला यावं आणि खळाळत्या पाण्याच्या सोबतीने एक चक्कर मारावी. मी काही जगातले प्रसिद्ध फाऊंटन्स पाहिलेले नाहीत. उंचच उंच उडणाऱ्या पाण्याचं,  त्याच्या तुषारांचं, संगीताच्या तालावर नाचणाऱ्या रंगीबेरंगी कारंज्यांचं मला आकर्षण आहेच. तरीसुद्धा, हा वाहणारा,  पाण्याला उंचावर, अधिक लांबवर न नेता जवळ आणणारा आणि सहजपणे ज्याच्या अवतीभवती बागडता यावं, गाभ्यात शिरता यावं असा वेगळासा कारंजा मनात घर करून राहिलाय.
बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच्या व्हिक्टोरिया मेमोरियलचा ग्रँडपणा या मेमोरियल मध्ये नाही. पण डायनाच्या मेमोरियल मध्ये आपलेपणा,  सहजपणा आहे. मेमोरियलच्या डिझाईन मध्ये,  त्या मागच्या थॉट मध्ये आणि त्याच्या एक्सिक्युशन मध्ये सुद्धा.  प्रिन्सेस  डायनाच्या सामाजिक आयुष्यातही तो होताच. म्हणून तर ती नुसती प्रिन्सेस न राहता "People's Princess" ठरली.  डायनाच्या हसऱ्या फोटोकडे पाहत मी तिथून निघालो. शनिवारची दुपार समाधानकारक होती.





- Abhishek Raut

Wednesday, July 3, 2019

अपूर्ण इच्छांचा उत्सव



काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं.  गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. "Weekly Achievers" मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं किंवा माहित असूनही करता न येणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. झपाट्यानं त्याचं मन भूतकाळात जायला लागलं. खूप लहान असताना त्याला पायलट व्हायचं होतं. पप्पा त्यांचा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायचे तेव्हा त्याला वाटायचं मॉडेल व्हावं. थोडासा मोठा झाला तेव्हा त्याला गिटार सापडली. पप्पांचे मित्र यायचे; त्यांच्यातलाच एक गिटार वाजवायचा. आपण गिटारिस्ट व्हायचं हे त्याने मनोमन ठरवलं. त्याला आठवलं , त्यानं ठरवलं तसं काही झालंच नाही. एक दिवशी अचानक पप्पानं स्वतःच्या बॅग्स उचलल्या कॅमेरा घेतला आणि कुठेतरी निघून गेला. जाताना त्याचा गालगुच्चा घेऊन आणि त्याच्यासाठी नवीकोरी गिटार ठेवून गेला. काही महिने त्याने मम्मीला विचारलं पप्पा कुठे गेला, असं न सांगता कुणी जातं का. त्याला वाटायचं कि मम्मी पप्पावर खूप चिडलीये पण कारण कळायचं नाही. ह्याला कधी पप्पाचा फारसा राग आला नाही. पप्पाचा राग. त्याला आठवली ती रात्र. बारावीच्या निकालानंतर काय करायचं असं मम्मीने विचारल्यावर तो म्हणालेला, "मला म्युझिकमध्ये करिअर करायचंय. गिटारिस्ट व्हायचंय. गिटार वाजवणं माझं पॅशन आहे." मम्मीने मला दोन कानाखाली मारल्या आणि म्हणाली, "पॅशनच्या गप्पा मला नको सांगूस." त्या क्षणी त्याला पप्पाची खूप आठवण आली. पप्पा असता तर त्याने बरोब्बर मम्मीला समजावलं असतं. का नव्हता तो त्या वेळेला. पप्पानेच दिलेली ना ती गिटार मग आता मम्मी खेचून घेत होती तेव्हा पप्पा इकडे हवा होता. त्याने काळजी घ्यायला हवी होती गिटारची. आणि अचानक त्याला जाणवलं कि ती काळजी असती तर तो असं अचानक त्याला आणि मम्मीला सोडून गेलाच नसता. त्या दिवशी रात्री मम्मीला गिटार कुलूपबंद कपाटात ठेवताना पाहून आणि स्वतः उशीत डोकं खुपसून रडताना त्याला पप्पाचा खूप जास्त राग आलेला... खूप जास्त.  आणि मग दिवसागणिक, वर्षागणिक तो राग साचत गेला, वाढत गेला.


मोबाईलच्या रिंगटोनने तो भानावर आला. "नमस्कार मी विसावा वृद्धाश्रमातून बोलतेय. येत्या रविवारी आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय त्यात तुमच्या वडिलांनी काढलेल्या फोटोसचं प्रदर्शन सुद्धा आहे. तुम्हाला यायला आवडेल का?"

 "अं... हां म्हणजे मी कळवतो तुम्हाला तसं तुम्ही मला वेळ मेल करून ठेवा"

याच फोटोसने, कॅमेऱ्याने या माणसाच्या संसाराची, आयुष्याची धूळधाण केली, ह्याला वृद्धाश्रमात आणून सोडलं तरीही ह्याची फोटोग्राफी काही जात नाही आणि आपण इतक्या सहजपणे तेव्हा गिटार सोडली. आजही गिटार, म्युझिक आपल्याला बोलवत असतं पण ही हातातली नोकरी सरळसोट सोडून देता येत नाही आणि मनात आपण विचार करत राहतो कि आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, त्याने रागात कॉम्पुटर बंद केला आणि सिगरेट मारायला स्मोकिंग झोन कडे निघाला. येत्या रविवारी बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून वृद्धाश्रमात जायचं त्याने ठरवलं. इतके वर्ष साचलेल्या रागाला वाट मोकळी करून द्यायला.


गाडी पार्क करून तो हॉलमध्ये आला. तिकडे त्याच्या पप्पाने 'क्लिक' केलेले काही फोटोग्राफ्स मांडून ठेवले होते. त्याच्या पप्पाचे काही तिथलेच वृद्ध मित्र, दोन चार महाविद्यालयीन तरुण होते तिकडे. तो पप्पाजवळ आला. त्याला जाणवलं वयापेक्षा फार लवकर म्हातारा झालाय पप्पा. "हा माझा मुलगा." पप्पाने सोबतच्या दोन वृद्धांना त्याची ओळख करून दिली. त्यांच्या डोळ्यांत त्याला एकाच वेळी त्याच्याबद्दलचं प्रेम आणि पप्पांबद्दलचा हेवा दिसला. त्यांच्या इतक्या जवळचं, इतक्या रक्ताच्या नात्याचं कुणी तिथे येत नसावं बहुदा. तितक्यात ते दोन तीन तरुण तिथे आले आणि पप्पा बोलू लागला, "मी तसा कॅमेरा आजकाल ठेवूनच दिलाय रे बाजूला. हे पोरं इथे येत असतात आमच्याशी गप्पा मारायला.  ह्यांच्या हातात लागला ; तर म्हणे आपण प्रदर्शन भरवूयात. आता काय म्हणत होते कि तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या फोटोग्राफीचं वर्कशॉप घ्यायला. बाकी तू येशील असं वाटलं नव्हतं."

 "हं .. कधी कधी आपल्याला वाटत नसतं तसंच वागतात लोक" तो जरा घुश्श्यातच म्हणाला.

"हं ते ही खरंच. चल जरा फिरून येऊ."

तो पप्पांसोबत फिरायला निघाला आणि बोलता बोलता दोघं त्यांच्या खोलीजवळ आले. "ये. ही माझी खोली. सवय झालीये आता एकटं राहायची."

"एकटं राहण्याबद्दल तुम्ही मला नका सांगू पप्पा. तुम्ही गेल्यापासून आम्ही एकटंच राहतोय."

"हं.. मी परत आलो नाही हे खरंच. फोटोग्राफी माझं जगणं झालं होतं. ती  असाइनमेंट म्हणजे एक खूप मोठी संधी होती. हातातली नोकरी, तुम्ही दोघं, सगळं सोडून मी गेलो." त्यांना मध्येच तोडत तो म्हणाला, "हो तू गेलास. 'तुझ्या'  पॅशनसाठी पण त्या अनुभवाने मम्मी इतकी कडवट झाली कि मला माझी गिटार, म्युझिक सारं काही सोडून द्यावं लागलं. केवळ तुझ्यामुळे. बरं गेलास ते गेलास आणि परत आलास तर ते सुद्धा एक अयशस्वी फोटोग्राफर म्हणून"?

 "अच्छा म्हणजे मी यशस्वी झालो असतो तर माझ्या नावाचा उपयोग करून मी तुला एक गिटारिस्ट म्हणून 'सेटल' केलं असतं असं होय"?

"होय. इतके वर्षं तुझं नाव लावल्याचा काहीतरी फायदा झाला असता."

"हं खरंय. ना मी एक चांगला बाप झालो ना एक चांगला फोटोग्राफर."

पप्पाला मध्येच तोडत तो पुन्हा म्हणाला "तुझ्या या अशा बेजबाबदार वागण्यामुळे मलाही गिटारिस्ट नाही होता आलं. मी गिटार सोडली, नोकरी करतोय, दर महिन्याला या वृद्धाश्रमाचे पैसे भरतोय आणि तू मात्र अजूनही तुला आयुष्यभरासाठी फेल करणारी फोटोग्राफी सोडत नाहीयेस. तुला काहीच कसं वाटत नाही रे पप्पा"?

इतका वेळ आपल्या पोराच्या डोळ्याला डोळा न देणाऱ्या पप्पाने वर पाहिलं, नजर रोखली आणि म्हणाला, "माझ्या नावाखाली स्वतःचा पळपुटेपणा लपवू नकोस. माझ्यामुळे कदाचित एकदा तुझ्यापासून गिटार दुरावली असेल पण निर्णायक क्षणी तू स्वतःतरी अशी कितीदा तिला स्वीकारलीयेस"?

 पप्पाच्या त्या वाक्याने त्याला आठवलं, कॉलेजच्या लास्ट इयरला असताना म्युझिक बँड बनवण्याची हाताने घालवलेली संधी, नंतर नोकरी लागल्यावर कमी झालेली प्रॅक्टिस, काहीतरी वेगळं करायचंय असं ऑफिसमध्ये म्हणायचं आणि वेळ आली कि 'म्युझिक गिग' सोडून ओव्हरटाईम करायचा. पप्पाला दोष देता देता त्याची पॅशन वयाच्या पंचवी-तिशीतच मरू लागली होती. बराच वेळ तो शांत राहिला.

पप्पा त्याला म्हणाला, "फार विचार करू नकोस. मी पॅशनेट म्हणून मरेन आणि तू असाच जगत राहिलास तर प्रॅक्टिकल म्हणून मरशील. तोवर तुला जसा वेळ मिळेल तसा इथे येत राहा".

 पप्पा अंथरुणातून उठला. सहजपणे त्याने हात पुढे केला. त्याचा हात धरून पप्पा कपाटाजवळ आला त्याने कपाट उघडलं आणि आत ठेवलेली नवी कोरी गिटार त्याला दिली, म्हणाला, "हे घे. मला माहित होतं तू आज येशील. लगेच सगळं सोडून गिटारिस्ट हो असं नाही म्हणणार मी. तितपत प्रॅक्टिकल मी सुद्धा झालोय आता, पण वाजवत राहा सोडू नकोस".

आताशा दर पंधरा दिवसांनी तो वृद्धाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुद्धा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मारतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतके वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या इच्छांचा उत्सव साजरा करतात.
-अभिषेक राऊत 

Sunday, February 10, 2019

मलानाच्या गोष्टी - भाग १



त्याच्या खांद्याला भलीमोठी ट्रेकर्सची सॅक होती. ती त्याने गाडीच्या डिकीत ठेवली. ATM मधून पैसे काढले. समोरच्या दुकानातून चार चॉकोलेट चिप कूकीस विथ एक्सट्रा चॉकोलेट सॉस उचलल्या आणि गाडीत पुढच्या सीट वर येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो स्थिरावला. कूकीजचा डब्बा त्याने डॅशबोर्डवर ठेवला. लेदर जॅकेटच्या डाव्या खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. त्यात रोलिंग पेपर होते. हलक्या हाताने त्यातला एक त्याने वेगळा केला. त्याच पाकिटाचा एक जाडसर तुकडा घेऊन त्याचा रोच तयार केलासिगरेटच्या पाकिटातली एक अर्धी सिगरेट होती त्यातला तंबाखू त्या रोलिंग पेपर वर पसरवलाउजव्या खिशातून नुकताच घेतलेला स्टफ काढला. अस्सल खवय्याने मसालेदार मटणाचा गंध घेऊन नुसतीच मान हलवून पसंतीची पावती द्यावी तसं काहीसं त्याने केलं. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्यातला थोडा स्टफ काढून , मळून त्याने तो रोलिंग पेपरवर घातला. एखाद्या हलवायाने जितक्या सराईतपणे बुंदीचे लाडू वळावे तितक्याच सहजपणे त्याने रोलिंग पेपर रोच भोवती गुंडाळला आणि रोल तयार केला. लाईटरने रोल पेटवत पहिला कश घेतला आणि तो उद्गारला , "ओह मलाना स्टफ मॅन". दुसरा कश हवेत सोडता सोडता, टिपिकल मल्याळी अक्सेंट मध्ये  मागे वळून म्हणाला, "हेय  ब्रो , यु वॉन्ट पफ ?".  अर्थातच बायकोसमोर मी स्टफ मारणार नव्हतोच. त्यामुळे चेहऱ्यावर शक्य तितके "मी नाही मारत ब्वा " असे भाव ठेवून मी नाही म्हणालो. एव्हाना आमची गाडी कसोलच्या चुंगुल मधून बाहेर पडत खडबडीत आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून मलानाच्या दिशेने निघालेली होती.
तर मलाना!!!! बरंच काही ऐकलेलं या गावाबद्दल. माणूस जनरली सिमला , कुल्लू , मनाली करतो हनिमूनला. आम्ही सिमला , कुल्लू गाळलं आणि कसोलला पोहोचलो. तरीसुद्धा मलानाला जाऊ असं वाटलं नव्हतं. जमदग्निंच्याच मनात असणार पण बहुदा. नाहीतर रात्री रौंराव वाहणारी नदी सकाळी कशी दिसते हे बघायला नदीकाठाशी उतरावं काय , मग त्याच काठाने एका बाजूला टुमदार घरं आणि दुसऱ्या बाजूने उंच पाइनची झाडं बघत चालावं काय, चालता चालता आणि नदीच्या अंगावर बांधलेल्या झुलत्या लाकडी पुलांवरून कधी या काठावर तर कधी त्या काठावर करता करता दोनेक किलोमीटर दूर यावं काय , मग हमरस्त्याशी पोहोचल्यावर हात दाखवताच एका अल्टोवाल्याने  थांबावं काय , तो मलानाला चाललाय ऐकल्यावर आम्ही दोघांनी चलो फिर हमें भी ले चलो म्हणत क्षणार्धात हॉटेल ऐवजी मलानाचा रस्ता पकडावा काय. माझ्या डोळ्यांसमोरून मागचा अर्धा तास तरळला. "वैसे शादीशुदा लोग ज्यादा नहीं आते यहांपे." ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो. "ओह यु गाईझ  आर  मॅरीड ? ग्रेटसमोरच्या सीट वरचा अचानक आयुष्याच्या सत्याची जाणीव झाल्यासारखा म्हणाला. एव्हाना त्याचा जॉईंट संपला होता. त्याने कूकीज काढल्या आणि मला एक ऑफर केली. मी नाही म्हणणार नव्हतोच. बाहेर नजर टाकली आणि मलाना जलविद्युत प्रकल्पा अंतर्गत चाललेलं काम दिसलं. विकासाच्या खाणाखुणा मागे टाकत आम्ही पुढे निघालो. डोंगर पोखरून काढलेले वळणावळणाचे खडबडीत रस्ते, त्या वळणांना "कॉम्प्लेक्स" देत तितक्याच वळणावळणाच्या पात्रातून खळाळत वाहणारी पार्वती नदी यांच्या संगतीनं आम्ही चाललो होतो.
सोबत ड्रायव्हरची कॉमेंट्री  होतीच. ड्रायवर तिथलाच कसोल जवळच्या गावातला. मलाना बद्दल , तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या स्टफबद्दल तो सांगत होता. त्याला ते नेहमीचंच असावं. "अब देखो ये जो लोग  हैं अपने आप को पवित्र मानते हैं. देखा जाये तो हम भी ब्राह्मण हैं लेकिन ये खुदको हमसे भी उंचा मानते हैं."

मला आमच्याकडचे चित्पावन आठवले. हे मलानावासी म्हणजे तर थेट चित्पावनांच्या आजोबांचेच वंशज म्हणा. आमचा ड्रायव्हर तसा शिकलेला. आई वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. कुल्लू मधल्या एकमात्र मोठ्या डिग्री कॉलेजातून इंग्लिशमध्ये BA केलेला. पण नोकरी नाही म्हणून कॅब चालवायला घेतली. कसोल , कुल्लू, मलाना , पार्वती वॅली सगळीकडे टूरिस्ट्सना फिरवायचं आणि फिरवत फिरवता गप्पा मारत मन मोकळं करायचं. अर्थातच कॅब चालवण्यातून पैसे बऱ्यापैकी मिळतोच पण हिमाचलच्या त्या निसरड्या , वळणदार रस्त्यांवरून गाडी चालवायची म्हणजे रिस्कच. त्याला ते हि सवयीचंच झालेलं. त्यामुळे आम्ही पार वाकून वाकून निसर्गाची उधळण पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र , "बचपनसे येही देख राहा हूं" असेच भाव असायचे.   साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका कमानीपाशी पोहोचलो. त्यावर लिहिलं होतं , "मलाणा गांव के लिये रस्ता".  आम्ही खाली उतरलो. समोरच्या सीट वर बसलेल्या मल्याळी मित्राची अवस्था , "आजि म्या स्वर्ग पहिला" अशी झाली होती. दोन दिवस मलाना मध्ये राहायचा प्लॅन होता त्याचा. आम्ही मात्र गावात चक्कर टाकून परत येणार होतो. आमच्या मित्राने पूजे आधी अगरबत्ती लावावी तसं एक रोल तयार केला आणि पहिला पफ मारून पुढे निघाला. मी नजर टाकली. एका छोट्याश्या टेकडीवर दोन तीन घरं होती. खास हिमाचलच्या "काथ कुनी " पद्धतीने बांधलेली. फक्त दगड आणि लाकूड यांचा वापर करून. बाकीचा गाव त्या टेकडीच्या कुशीत लपलेला होता. आम्ही कमानीसमोर उभे होतो आणि छोटीशी पायवाट आम्हाला बोलवत होती. मलानाकडे. इथली माणसं , इथली संस्कृती, इथलं जगणं याबद्दल ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं आणि तेच अनुभवायला मलाना आम्हाला बोलवत होतं. पायवाटेवरून आम्ही निघालो तेव्हा दुपारचा एक वाजला होता.

Saturday, February 24, 2018

अंगारमाळ्याच्या गोष्टी

रणरणत्या उन्हात या शेतातले मोठमोठे दगड-धोंडे उचलून दूर करत असताना शरद जोशींना कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या , " एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" आणि मग या जागेचं नाव ठेवलं गेलं , "अंगारमळा".
अंगारमाळ्याच्या आवारातल्या बोराच्या झाडाखाली बसून विनय हर्डीकर जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
चाकण जवळच्या आंबेठाण गावात शरद जोशींनी अक्षरशः शून्यातून उभा केलेला हा पसारा. आज त्या वास्तूत ते नाहीत पण त्यांचं व्यक्तिमत्व समजेल अशा पुष्कळ गोष्टी आहेत. सोबत हर्डीकर सर असतात. ते काही आठवणी सांगतात. सध्या त्या पसार्याची काळजी घेणारे सुरेशचंद्र म्हात्रे सर असतात.
आत शिरल्या शिरल्या दिसतात गांधीजी आणि शिवाजी महाराजांचे भव्य पोर्ट्रेट. आजपर्यंत महाराजांच्या  शेजारी शाहू,फुले , आंबेडकर पाहिलेले असतात आणि गांधीजींना शक्यतो एकटं . पण आत शिरल्या शिरल्या या दोघांचे पोर्ट्रेट पाहून प्रतीकांची निवड करण्यातला हा वेगळेपणा झटकन दिसून येतो. मी विचार करतो , असा नक्की काय विचार असेल या दोघांना एकत्र समोर 'प्रोजेक्ट'करण्यात. मला  जाणवत  जातं , बघायला गेलं तर हे दोनच असे नेते ज्यांनी सामान्यांमधल्या शक्तीला जाणलं आणि बघताबघता अक्खा मावळ राजांच्या बाजूने तर गावखेड्यातला हरेक माणूस गांधीबाबाच्या मागे उभा राहिला. एका मोठ्या जनसमुदायाला 'अपील' होणारे हे दोन नेते. प्रतीकांची हि  कल्पकतेने केलेली निवड तिथल्या पोस्टर्समध्येही दिसत राहते. आंदोलनांसाठी तयार केलेले पोस्टर, त्यातली भाषा, यातलं वैविध्य, त्यातली प्रसंगोपात समयसूचकता जाणवत राहते. 'ऊसदर आंदोलन' असो, 'शरद पवारांना गावबंदी' असो किंवा मग चांदवडचा स्त्रीशक्तीचा जागर करणारा मेळावा असो. त्यासाठी बनवलेली पोस्टर्स एकाच वेळी परिणामकारक असतात आणि कल्पकही.
पुढे सरकतो तर एका मोठ्ठया भिंतीवर तितकाच मोठ्ठा
फलक असतो.त्यात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात बळी  गेलेल्या आंदोलकांची नावं असतात. मी वाचत जातो. वय वर्ष २० पासून ते ६५ पर्यंत. तरुण , म्हातारे, बाया बापड्या सगळेच असतात त्यात. जास्त करून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ , मराठवाडा या भागातले. संघटनेची यशस्वी झालेली मोठी आंदोलनं सुद्धा त्याच भागातली. पुणे जिल्ह्यात जन्म घेतलेल्या संघटनेला , पुणे जिल्ह्याने आपलंसं करताना मात्र हात आखाडताच घेतला. पुढे हर्डीकरांच्या बोलण्यातूनही हि खंत जाणवत राहते.
पोल्ट्रीसाठी बांधलेल्या इमारतीचं शरद जोशींनी मुख्यालय केलं . तिथून शेतकरी हिताची हाळी दिली. "कृषिप्रधान" देशात नुसता चवीपुरता ठेवलेला शेतकरी पाहता पाहता राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवला. "रास्त  हमीभाव" आणि "सरकारी हस्तक्षेप रहित शेती" या दोन काळाच्या पुढच्या धाडसी मागण्या  केल्या. हे सगळं कुठून आलं ? सगळं जग एकुणातच शेतकरी आणि कामगार हितासाठी समाजवादाची भाषा बोलत असताना हा मनुष्य मुक्त अर्थव्यवस्थेची मागणी करतो. याची उत्तरं मिळत जातात पुढच्या वास्तूत शिरलं कि. तिकडे रांगेने मांडून ठेवलेली असते , जोशींची ग्रंथसंपदा. त्यात अक्षरशः सगळं असतं . कार्ल मार्क्स असतो, अँगल्सचे तर ते भक्तच. गॉर्की असतो. पॉल क्रुगमन असतो, जॉर्ज सोरोस असतो, फ्रेडरिक हायेक असतो. अक्षरशः प्रचंड वैविध्य. जगभरातलं जे उत्तम आहे ते कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचायचं आणि मग सोप्प्या भाषेत ते शेतकऱ्यांसमोर मांडायचं . जे योग्य आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनं करायची आणि मागण्यांना अभ्यासाचं अधिष्ठान ठेवायचं . १९८२ पासून सातत्याने शरद जोशींनी हे केलं .
तिथेच भामा आसखेडच्या प्रकल्पाची कोनशिला आहे. म्हात्रे सर सांगतात, शेतकऱ्यांच्या जमिनीचे केवळ संपादन न करता त्यांना प्रकल्प भागधारक करून घेऊन त्यायोगे प्रकल्प विकास करण्याची ती पहिली महत्वाकांक्षी सुरुवात होती. सरकारी अनास्थेमुळे ती रेंगाळली. पण आज जेव्हा मी मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी सारखी उदाहरणं पाहतो, समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना प्रकल्प भागधारक करून घेण्यास अनुकूल असणारं सरकार पाहतो तेव्हा मला त्या कोनशिलेचं महत्व कळतं . जोशींच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं . मग आम्ही
गच्चीत जातो. त्यावरून समोर नजर टाकली कि भामचंद्राचा डोंगर दिसतो. तुकारामांना याच डोंगरावर साक्षात्कार झाला. अंगरमाळ्याच्या  वाटचालीला भामचंद्राचा डोंगर साक्षी असतो.
तिथून  थोडंसं चालत जात आम्ही जोशींच्या घरी जातो. आटोपशीर घर. जोशींचे काही फॅमिली फोटोस आणि थोडंसं सामान. त्याच्याच पुढे लागून दिल्लीतून उचलून आणलेलं ऑफिस. त्या ऑफिसमध्येही पुस्तकं , खुर्ची , बसायला सोफा आणि बाजूला संघटनेचा 'आयकॉन' बनलेला शेतकर्याचा मोठ्ठा कट आउट . हर्डीकर सर मग त्या फोटोमागची स्टोरी सांगतात. एका सामान्य शेतकर्याचा सहज काढलेला फोटो बघता बघता संपूर्ण संघटनेची, आंदोलनाची आणि असंख्य शेतकऱ्यांची ओळख बनून जातो. कल्पक आणि तितकंच प्रभावी.
निघायची वेळ झालेली असते. आजवर मुलाखतीतून ऐकलेल्या शरदरावांच्या विचारांमागची बैठक कुठून पक्की झाली हे कळलेलं असतं . नेता होण्याची आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शारीरिक अशी कुठलीही पूर्व पार्श्वभूमी नसलेला हा माणूस जवळपास पस्तीस वर्षं शेतकऱयांचं प्रेम मिळवत राहतो. अभ्यासपूर्ण आंदोलन करतो, चळवळीला दिशा देतो, संघटना बांधतो, स्थानिक नेतृत्व घडवतो आणि त्याहूनही महत्तवाचं म्हणजे शेतकऱयांचा मुद्दा बघता बघता राष्ट्रीय पटलावर सक्षमपणे घेऊन जातो. महिला प्रश्नांवर महिलांशी सहजपणे संवाद साधणारे जोशी तितक्याच सहजपणे देशातल्या मोजक्या एक्सिक्युटिव्स समोर 'मेटॅफिसिक्स ऑफ लीडरशिप " सारखा विषयही मांडतात .
"ग्यानबाच्या वृक्षाखाली " बसून विचार करताना जाणवतं , आताशा अंगरमाळ्यातला अंगार थंडावलाय कि काय . जोशींची भाषणं , त्यांचे लेख , पुस्तकं या सगळ्यांचं डॉकुमेंटेशन करायला चार पाच तरुणही मिळत नाहीत असं जेव्हा म्हात्रे सर म्हणतात तेव्हा वाईट वाटतं . बाकी काही नाही तरी "अभ्यासोनि अंदोलनावे " हि अंगरमाळ्याची खरी शिकवण आणि ती पुढच्या पिढीत झीरपावी हि खरी गरज आहे .
अभिषेक राऊत .

Wednesday, August 2, 2017

आनंदाची गुरुकिल्ली

"मला सांगा , सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य केलं कि ते , घरबसल्या मिळतं " ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समस्त मानवजात नक्कीच आभारी राहील. गंमत अशी आहे कि सुख,समाधान,आनंद ह्या काही बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. सहजासहजी मिळणाऱ्या तर बिलकुलच नाही. सुखाची गंमतही अशी कि एखाद्या चंद्रमौळी झोपडीतला माणूस सुद्धा सुखी असू शकतो पण त्याच वेळेस महालात झोपणारा धनिक सुखी असेलच असं नाही.
सुखाचा शोध हा अविरत चालणारा आहे .प्रत्येकजण आपापल्या परीने शोधत राहतो आनंदाचा , सुखाचा सदरा. रामदास स्वामी म्हणतात , "जगी सर्व सुखी असा कोणty आहे,विचारे मना तूंचि शोधूनि पाहे"
सिग्मान्ड फ्रॉइड म्हणतो , "कल्पनातीत अपेक्षेच्या पूर्ततेतून येणारा भाव म्हणजे सुख." गंमत बघा, सुखाचा शोध हा असा संतांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आपापल्या दृष्टिकोनातून घेत राहतो.
सामान्य माणसांची फार गंमत होऊन जाते बघा, एखादा सर्वसंगपरित्याग केलेला तत्त्ववेत्ता म्हणतो , "गरजा कमी कराल तर आपोआप सुखी व्हाल" त्याच वेळेस एखादा नावाजलेला उद्योगपती म्हणतो , "रिक्षात बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझ मध्ये बसून रडलेलं बरं ". आजच्या व्यवहारवादी जगात जिथे गरजा कमी करणं हे अशक्यप्राय होऊन बसलंय आणि जिथे पैसे फेकून सुख मिळवता येतं हा विचार रूढ आहे अशा जगात म्हणूनच शाश्वत सुखाचा,आनंदाचा मार्ग शोधणं गरजेचं आहे.
अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात डॉ.थॉमस गिलोवीच हे मानसशास्त्रद्न्य गेली २० वर्षं संशोधन करतायेत कि सुख,आनंद नक्की कशात  असतं ? पैसे खर्च करून एखादी नवीन वस्तू घेतली कि होणारा आनंद, त्या वास्तूच्या वापरातून मिळणारं सुख असं किती दिवस टिकून राहतं ? शाश्वत आनंदासाठी काय करावं ?
त्यांच्या या संशोधनातून आलेले निष्कर्ष फार महत्तवाचे आहेत. ते म्हणतात , "अनुभूतीतून आलेला आनंद हा भौतिक वस्तूंच्या मालकीतून आलेल्या आनंदापेक्षा शाश्वत असतो,
म्हणून तुमचे पैसे अशा गोष्टीवर खर्च करा ज्यातून तुम्हाला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी गोळा करता येतील."
ते पुढे म्हणतात कि भौतिक वस्तूंतून मिळणाऱ्या आनंदाचे काही तोटे आहेत जसे कि
१.नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तू दुसर्या दिवशी जुनी होते आणि तिच्याबरोबरच जुना होतो ती वस्तू घेताना मिळालेला आनंद,झालेलं समाधान. गंमत बघा , नव्याकोऱ्या आय - फोने ने ढीगभर सेल्फी काढले तरी होणारा आनंद जुन्या कपाटात सापडलेल्या रंगीत फोटोच्या तुलनेत कमीच असतो. कारण  तो असतो आठवणीतून आलेल्या  अनुभूतीचा आनंद.
२.वाढीव गरजा - ३० इंचाचा टीव्ही ५४ इंचापुढे छोटा वाटायला लागतो. काल घेतलेला मोबाईल नवीन मॉडेलपुढे निरुपयोगी वाटायला लागतो. भौतिक गरजांची हि ओढ मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाते आणि त्या गरजांच्या पूर्ततेतून होणारा आनंदही क्षणिकच ठरतो.
३."भला उसकी सारी मेरे सारी से अच्छी कैसे ?"- तुलना आणि त्यातून येणारी असूया हे मनुष्याचं व्यवच्छेदक लक्षण. आपण नव्या घेतलेल्या वस्तूचा  आनंद होण्यापेक्षा शेजार्यांकडे असलेल्या वस्तूचा जास्त हेवा वाटत असेल तर मग अशा आनंदाला,अशा सुखाला अर्थच काय.
म्हणून डॉ . गिलोवीच म्हणतात , भौतिकतेतून आलेल्या अनंदापेक्षा अनुभुतीतून आलेला आनंद दीर्घकाळ टिकतो आणि सदाबहार असतो .
अनुभूतींच्या आठवणी होतात आणि आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत दरवळत राहतात . अनुभवांची गंमत पहा ,
कळत नकळत ते तुमचाच एक भाग होऊन जातात .
४ गाडया , २ घरं याच्या पलिकडे तुमची ओळख असतात , तुम्ही घेतलेले आनंदानुभव . ते फक्त तुमचे असतात . ह्या आनंदानुभवांना असूयेची किनार नसते . ते निखळ असतात, त्यांच्या  आठवणी होतात म्हणून शाश्वत असतात.
याच विषयावर संशोधन करणाऱ्या ब्रिटिश कोलंबिया  विद्यापीठाच्या प्राध्यापिका एलिझाबेथ डून म्हणतात,  "वस्तू  कदाचित अनुभवांपेक्षा जास्त काळ टिकत असतील  मात्र अनुभवांच्या आठवणी होतात आणि मनाच्या कोपर्यात रेंगाळणाऱ्या आठवणी आयुष्यभर आनंद देतात." आनंदाच्या अशा आठवणी गोळा करणं मह्त्त्वाचं . सुखाचा , समाधानाचा मार्ग त्यातूनच जातो . कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या महागड्या वस्तूंनी सजलेल्या दिवाणखान्यापेक्षा अमूल्य अशा आनंदानुभवानी आणि आठवणींनी भरलेलं मन जास्त सुख देतं .
- अभिषेक राऊत.
(ट्रेव्हिस ब्रॅडबरी ने फोर्ब्स मासिकासाठी लिहिलेल्या "व्हाय यु शुड स्पेंड मनी ऑन एक्सपीरिअन्स , नॉट थिंग्स " या लेखाचा स्वैर अनुवाद.)