पूरी बाबे दी आ मेहेर, जाट डोंट केअर ओ बेबी, जाट डोंट केअर.
साऊथ दिल्लीमधल्या एका अत्यंत महागड्या पब मध्ये रॅपर सुलतानचं हे गाणं वाजत असतं आणि एकच वेळी अनेक जण या गाण्यावर थिरकत असतात .
दिल्ली - गुडगाव - भरतपूर हा प्रवास एकूण ४ राज्यांतून होत असला ( दिल्ली - एनसीआर , हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ) तरी या प्रवासाला जोडणारा दुवा म्हणजे भारतातील एक सधन, संपन्न आणि जमीनदार असणारा जात समूह - जाट
राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर भरतपूर आहे. म्हणायला राजस्थान मध्ये पण बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स उत्तर प्रदेश, हरियाणा इथला. त्याचं कारण इथे राज्य होतं जाट लोकांचं. सूरजमल जाट हा भरतपूर संस्थानातला सगळ्यात प्रसिद्ध राजा .
राजस्थानची गंमत अशी की , बऱ्याचशा राजस्थानवर राजपुतांचं राज्य होतं. पण जसं जसं आपण राजस्थान कडून हरियाणा , उत्तर प्रदेश कडे येत जातो तसं तसं जाट लोकांचा इन्फ्लूअन्स वाढत जातो.
जाट हा मुळात एक जात समूह. अखंड हिंदुस्थानात (फाळणीपूर्वीच हिंदुस्थान) , पूर्व पंजाब , पंजाब , आणि काही प्रमाणात सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर जाट होते आणि आहेत. काळाच्या ओघात काही जाटांनी इस्लाम धर्म स्वीकारला , काहीनी शीख धर्म स्वीकारला तर काहीनी हिंदू.
तर भरतपूर. हे संस्थान जाटांचं. गंमत अशी की एक काळ होता जेव्हा राजपूत आणि जाट यांच्यातून विस्तवसुद्धा जायचा नाही . पिढ्यान पिढ्यांची दुश्मनी वगैरे. अजूनही या दोघांत रोटी बेटी व्यवहार होणं कठीणच. कदाचित वर्णव्यवस्थेच्या उतरंडीत , राजपूत क्षत्रिय आणि जाट मात्र वैश्य किंवा शूद्र त्यामुळे असावं. पण शेती करणारा जात समूह असल्याने जाट नेहमीच सधन आणि जमीनदार होते. महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखे. राजपूत आणि मुघलांच्या उतरत्या काळात काही जाट सरदारांनी स्वतःची राज्यं स्थापली आणि वाढवली. भरतपूर त्यातलंच एक.
भरतपूरच्या मध्यभागी किल्ला आहे. किल्ला आणि महाल. चौबुर्जा च्या चौकात उतरायचं, देवरामची फेमस कचोरी खायची आणि बैटरी रिक्षात बसून किल्ल्याकडे जायचं. किल्ल्याच्या चारो बाजूने “नहर” आहे. जणू काही पाण्याची तटबंदी असावी असं. एकेकाळी यातलं पाणी स्वच्छ असावं. आता अर्थातच ते खराब असतं.
नहर वर बांधलेला छोटासा पूल ओलांडला की भला थोरला दरवाजा लागतो. तो ओलांडून किल्ल्याच्या रस्त्याला लागायचं. किल्ल्याकडे जाण्याच्या रस्त्यात अग्रवाल, गोयल यांची मोठमोठो घरं. कधी काळी राजांनी या जमिनी तिथल्या बनिया लोकांना विकल्या असाव्यात. रिक्षावाला सांगतो , “किला जाटोंका लेकीन इलाका बनियोंका” .
भरतपूरच्या राजांचं साहजिक मुघलांशी वैर. अनेक मुघल आक्रमणांना आणि नंतर ब्रिटिश आक्रमणांना या किल्ल्याने आणि जाट राजांनी परतवून लावलं.
असं म्हणतात की ब्रिटिशांनी तब्बल १३ वेळा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. शेवटी १८२६ साली भरतपूर ब्रिटिशांनी जिंकून घेतलं.
राजस्थानात जाट राजांची संस्थानं फार नाहीत. भरतपूर त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं. दिल्ली आणि आग्र्याच्या जवळ असल्याने मुघलांशी अनेकदा संघर्ष केलेलं. जवळपास शंभर वर्षं टिकून राहिलेलं संस्थान. किल्ल्याच्या आतल्या भागात आता या राजांच्या शस्त्रांची प्रदर्शनं आहेत. त्यांचे फोटोज आहेत आणि संस्थानचा इतिहास आहे.
परतीच्या प्रवासात , भरतपूरहून दिल्लीकडे जाणारा रस्ता गुरगाव मधून जातो. गुडगाव म्हणजे उत्तर भारतातलं मोठं IT आणि औद्योगिक शहर. मुख्य रस्त्याने गेलात तर सायबर हब , गोल्फ सिटी , IT पार्क बघून डोळे गरगरतात.
पण एखादा रिक्षावाला तुम्हाला आतल्या रस्त्याने घेऊन जातो आणि ज्या जुन्या गावांच्या छातीवर गुडगाव उभं राहिलं त्या गावांच्या खुणा दिसतात.
आक्रसून गेलेली जुनी घरं आणि त्या घरांच्या व्हरांड्यात गुडगुड करत हुक्का पिणारा एखादा म्हातारा “ताऊ”जी दिसतो. धुळीने, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याच्या बाजूला एखाद दुसरं मंदिर असतं. त्यावर लिहिलेलं असतं- “महादेव मंदिर , गांव- झरसा “.
मला हिंजवडी आठवतं. मोठमोठ्या फेज १,२,३ बांधल्या तरी जरा आतल्या रस्त्यांवर गावातली जुनी घरं, जुनी माणसं , जुने रस्ते , शेंदूर फासलेल्या गावदेवतांची मंदिरे तशीच असतात. जणू काही विकासाच्या रंगरंगोटी मध्ये राहून गेलेले एखाद दुसरे कोपरे.
मी आय टी मध्ये काम करतो . मला विकासाशी प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर देशात कुठेही आय टी पार्क उभे राहिले तरी विकासाचं “मॉडेल” एकच असतं हे मला माहितीये. माझ्या मनात मी महाराष्ट्रातले सरंजामदार मराठे आणि उत्तरेतले जाट यांच्यातली साम्यस्थळं शोधू लागतो.
आणि मग सॅटरडे नाईट ला पुण्यात एखाद्या पब मध्ये “पाटलाचा बैलगाडा त्यानं घाटात केलाय राडा” हे ऐकलं की मला साऊथ दिल्लीतल्या ,
“पूरी बाबे दी आ मेहेर, जट डोंट केअर ओ बेबी, जट डोंट केअर.” गाण्याची आठवण येते आणि माझी भरतपूर - गुडगाव ची ट्रिप आठवते.
- अभिषेक राऊत





.jpeg)