शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला रामरक्षा म्हणायचो.
“दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा
पुरतो मारुतीयस्य तं वंदे रघुनंदनं….”
डोळ्यांसमोर रामाचं चित्र उभं रहायचं. कोदंडधारी (कोदंड म्हणजे धनुष्य) राम , त्याच्या एक बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीता आणि पायाशी हात जोडून बसलेला हनुमान.
आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा रामरक्षा म्हटली.
रामायण आणि महाभारत गोष्टी म्हणून ऐकलं नेहमी. कधी आईकडून , कधी बाबांकडून.
बाबा सांगतात माणसाने कसं रामासारखं व्हावं. “एक वचनी” , “एक बाणी” , “एक पत्नी” . मग आपण म्हणयचं “ आहो बाबा , रामाचा काळ त्रेता युगाचा. आत्ता चालू आहे कलियुग. कलियुगात रामासारखं होणं किती अवघड”
मग एक दिवस केव्हातरी गीत रामायण ऐकलं….
“पुत्र सांगती चरित पित्याचे , ज्योतीने तेजाची आरती” .
गदिमांच्या शब्दांनी , बाबूजींच्या सुरांनी वेड लावलंच पण राम सुद्धा त्यातून उलगडत गेला.
वनवासात भेटायला आलेल्या भरताला सहजपणे म्हणणारा राम की ,
“तात स्वर्गवासी झाले , बंधू ये वनात..,
अतर्क्य ना घडले काही , जरी अकस्मात…
खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा… पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…”
अक्खं जग ज्याला देव मानतं तो म्हणतो , खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा ???. इतकं सहज ??
कधी कधी वाटतं, हिंदू धर्माचं सौंदर्य हे आहे की आपले देव , देवांचे अवतार हे सगळे असे आपल्यासारखे, आपल्यातले वाटतात. अस्सल माणसांसारखे. त्यांचं सुख , दुःख , प्रयत्न, त्यांचं जिंकणं, हारणं सगळं काही अस्सल तुमच्या आमच्यासारखं. म्हणून कदाचित रावणाला जिंकून आलेल्या भगवान रामाला सुद्धा सीतेची अग्निपरीक्षा घेण्यावाचून उपाय राहत नाही.
मग पुढे जाऊन कधीतरी रामायणातल्या इतर कॅरेक्टर्स बद्दल वाचलं. शबरी असो , शिळा होऊन पडलेली आणि रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा जिवंत झालेली अहिल्या असो किंवा बंधू प्रेमापोटी वनवासात गेलेल्या लक्ष्मणाची चौदा वर्षं वाट पाहणारी उर्मिला. ग्रेसांची कविता आठवते…
“आटले सरोवर जेथे , का मोर नाचती लागू
तू सोड उर्मिले आता , डोळ्यांत बांधला राघू…”
एक वनवास रामाचा , एक वनवास उर्मिलेचा…..कुणाचा अधिक दारुण ते ज्याने त्याने ठरवायचं.
राम आणि रामायण हे असं इथल्या प्रत्येकाच्या जगण्यात भिनलेलं. कुणी म्हणतं रामायण फक्त महाकाव्य आहे. कुणी अगदी रामाचा कालखंड वगैरे काढून दाखवतं. पण राम आणि रामायण या सगळ्याच्या पल्याड आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि त्याने लिहिलेलं हे गारुड विणलं गेलंय हिंदुस्थानच्या मनामनात.
मग तो विणकर आठवतो कबीर नावाचा. संत कबीर म्हणतो,
एक राम दशरथ का बेटा।।
एक राम घट घट में बैठा।
एक राम का सगल पसारा।
एक राम सब हूँ से नियारा।
आणि मग साहजिक आठवतं माणिक वर्मानी गायलेलं गाणं.
“कबीराचे विणतो शेले , कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम “
रस्त्याने येताना हे सगळं आठवत होतो , इकडे तिकडे भाबडे भक्त शोधत होतो मी. सुंठवडा कुठे मिळेल प्रसाद म्हणून ते शोधत होतो.
डीजे, साउंडच्या आवाजात आणि लेसर लाइट्सच्या प्रकाशात रामाला शोधत होतो. अयोध्येत रामाचं मंदिर झालं आणि अचानक राम नवमी फार मोठा सण , उत्सव वगैरे झाल्यासारखं झालंय. चालायचंच. विकास फक्त शहरांचाच नाही देवांचा पण होतो.
सहजच एका दुकानात गेलो तर तिथल्या काकांनी हातावर सुंठवडा ठेवला. बरं वाटलं. कुठल्याशा मंदिरात , आठ दहा सुवासिनींनी एकत्र येऊन रामला पाळण्यात घालून जोजवलं असेल , कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणत , “राम जन्मला गं सखे राम जन्मला” गात गात आनंद साजरा केला असेल आणि तोच प्रसादाचा सुंठवडा आपल्यापर्यंत पोहोचला असेल.
आता त्या डीजे च्या कर्कश्श आवाजाचं आणि “भारत का बच्चा बच्चा, जय जय श्रीराम बोलेगा “ या तद्दन सुमार गाण्याचं वाईट वाटेनासं झालं.
शेवटी राम एकच असला तरी प्रत्येकाचा राम वेगळा. आजच्या राम नवमीला तुमचा राम तुम्हाला आणि तुमच्या रामाला तुम्ही भेटो हीच सदीच्छा.
- अभिषेक राऊत


