Friday, January 2, 2026

गुडगांव, भरतपूर आणि जाट डोंट केअर



 पूरी बाबे दी आ मेहेर, जाट डोंट केअर ओ बेबी, जाट डोंट केअर. 

साऊथ दिल्लीमधल्या एका अत्यंत महागड्या पब मध्ये रॅपर सुलतानचं हे गाणं वाजत असतं आणि एकच वेळी अनेक जण या गाण्यावर थिरकत असतात . 


दिल्ली - गुडगाव - भरतपूर हा प्रवास एकूण ४ राज्यांतून होत असला ( दिल्ली - एनसीआर , हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ) तरी या प्रवासाला जोडणारा दुवा म्हणजे    भारतातील एक सधन, संपन्न आणि जमीनदार असणारा जात समूह - जाट 


राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर भरतपूर आहे. म्हणायला राजस्थान मध्ये पण बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स उत्तर प्रदेश, हरियाणा इथला. त्याचं कारण इथे राज्य होतं जाट लोकांचं.  सूरजमल जाट हा भरतपूर संस्थानातला सगळ्यात प्रसिद्ध राजा . 


राजस्थानची गंमत अशी की , बऱ्याचशा राजस्थानवर राजपुतांचं राज्य होतं. पण जसं जसं आपण राजस्थान कडून हरियाणा , उत्तर प्रदेश कडे येत जातो तसं तसं जाट लोकांचा इन्फ्लूअन्स वाढत जातो. 


जाट हा मुळात एक जात समूह. अखंड हिंदुस्थानात (फाळणीपूर्वीच हिंदुस्थान) , पूर्व पंजाब , पंजाब , आणि काही प्रमाणात सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर जाट होते आणि आहेत. काळाच्या ओघात काही जाटांनी इस्लाम धर्म स्वीकारला , काहीनी शीख धर्म स्वीकारला तर काहीनी हिंदू. 


तर भरतपूर. हे संस्थान जाटांचं. गंमत अशी की एक काळ होता जेव्हा राजपूत आणि जाट यांच्यातून विस्तवसुद्धा जायचा नाही . पिढ्यान पिढ्यांची दुश्मनी वगैरे. अजूनही या दोघांत रोटी बेटी व्यवहार होणं कठीणच. कदाचित वर्णव्यवस्थेच्या उतरंडीत , राजपूत क्षत्रिय आणि जाट मात्र वैश्य किंवा शूद्र त्यामुळे असावं. पण शेती करणारा जात समूह असल्याने जाट नेहमीच सधन आणि जमीनदार होते. महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखे. राजपूत आणि मुघलांच्या उतरत्या काळात काही जाट सरदारांनी स्वतःची राज्यं स्थापली आणि वाढवली. भरतपूर त्यातलंच एक. 


भरतपूरच्या मध्यभागी किल्ला आहे. किल्ला आणि महाल.  चौबुर्जा च्या चौकात उतरायचं, देवरामची फेमस कचोरी खायची आणि बैटरी रिक्षात बसून किल्ल्याकडे जायचं. किल्ल्याच्या चारो बाजूने “नहर” आहे. जणू काही पाण्याची तटबंदी असावी असं. एकेकाळी यातलं पाणी स्वच्छ असावं. आता अर्थातच ते खराब असतं.


नहर वर बांधलेला छोटासा पूल ओलांडला की भला थोरला दरवाजा लागतो. तो ओलांडून किल्ल्याच्या रस्त्याला लागायचं. किल्ल्याकडे जाण्याच्या रस्त्यात अग्रवाल, गोयल यांची मोठमोठो घरं. कधी काळी राजांनी या जमिनी तिथल्या बनिया लोकांना विकल्या असाव्यात. रिक्षावाला सांगतो , “किला जाटोंका लेकीन इलाका बनियोंका” . 


भरतपूरच्या राजांचं साहजिक मुघलांशी वैर. अनेक मुघल आक्रमणांना आणि नंतर ब्रिटिश आक्रमणांना या किल्ल्याने आणि जाट राजांनी परतवून लावलं. 

असं म्हणतात की ब्रिटिशांनी तब्बल १३ वेळा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. शेवटी १८२६ साली भरतपूर ब्रिटिशांनी जिंकून घेतलं. 


राजस्थानात जाट राजांची संस्थानं फार नाहीत. भरतपूर त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं. दिल्ली आणि आग्र्याच्या जवळ असल्याने मुघलांशी अनेकदा संघर्ष केलेलं. जवळपास शंभर वर्षं टिकून राहिलेलं संस्थान. किल्ल्याच्या आतल्या भागात आता या राजांच्या शस्त्रांची प्रदर्शनं आहेत. त्यांचे फोटोज आहेत आणि संस्थानचा इतिहास आहे. 


परतीच्या प्रवासात , भरतपूरहून दिल्लीकडे जाणारा रस्ता गुरगाव मधून जातो. गुडगाव म्हणजे उत्तर भारतातलं मोठं IT आणि औद्योगिक शहर. मुख्य रस्त्याने गेलात तर सायबर हब , गोल्फ सिटी , IT पार्क बघून डोळे गरगरतात. 

पण एखादा रिक्षावाला तुम्हाला आतल्या रस्त्याने घेऊन जातो आणि ज्या जुन्या गावांच्या छातीवर गुडगाव उभं राहिलं त्या गावांच्या खुणा दिसतात. 

आक्रसून गेलेली जुनी घरं आणि त्या घरांच्या व्हरांड्यात गुडगुड करत हुक्का पिणारा एखादा म्हातारा “ताऊ”जी दिसतो. धुळीने, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याच्या बाजूला एखाद दुसरं मंदिर असतं. त्यावर लिहिलेलं असतं- “महादेव मंदिर , गांव- झरसा “. 


मला हिंजवडी आठवतं. मोठमोठ्या फेज १,२,३ बांधल्या तरी जरा आतल्या रस्त्यांवर गावातली जुनी घरं, जुनी माणसं , जुने रस्ते , शेंदूर फासलेल्या गावदेवतांची मंदिरे तशीच असतात. जणू काही विकासाच्या रंगरंगोटी मध्ये राहून गेलेले एखाद दुसरे कोपरे. 


मी आय टी मध्ये काम करतो . मला विकासाशी प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर देशात कुठेही आय टी पार्क उभे राहिले तरी विकासाचं “मॉडेल” एकच असतं हे मला माहितीये.  माझ्या मनात मी महाराष्ट्रातले सरंजामदार मराठे आणि उत्तरेतले जाट यांच्यातली साम्यस्थळं शोधू लागतो. 

आणि मग सॅटरडे नाईट ला पुण्यात एखाद्या पब मध्ये “पाटलाचा बैलगाडा त्यानं घाटात केलाय राडा” हे ऐकलं की मला साऊथ दिल्लीतल्या , 

“पूरी बाबे दी आ मेहेर, जट डोंट केअर ओ बेबी, जट डोंट केअर.” गाण्याची आठवण येते आणि माझी भरतपूर - गुडगाव ची ट्रिप आठवते. 


- अभिषेक राऊत 








Saturday, April 19, 2025

मुंबई ते बनारस ते मुंबई - काही नोंदी - २ - ट्रेन प्रवास

 


एकदा तरी यूपी बिहार ला जाणाऱ्या ट्रेन ने किंवा मुंबईहून यूपी बिहार ला येणाऱ्या ट्रेन ने छत्तीस तास प्रवास करावा माणसाने . काय काय अनुभव येतील तुम्हाला सांगतो, फक्त निरीक्षण करत रहावं.

भांगेत सिंदूर आणि ओठांना लिपस्टिक लावून डोक्यावर पदर घेतलेल्या बायका 

दिवसभर तोंडात पान किंवा जर्दा किंवा तमाखु किंवा नुसती सुपारी चघळत राहणारे त्यांचे “ए जीऽऽ” 

पहिली दीदी , मग दुसरी बेबी झाल्या नंतर फार नवसाने झालेल्या “छोटे सरकार “ ला सांभाळत बसणाऱ्या बायका

ए बाबू , ए लड्डूगोपाल म्हणत त्या छोटे सरकार ला सांभाळणारी दीदी तर ए लडके, ए छुटकू म्हणत त्याचे गाल ओढणारी बेबी 

प्रत्येक सीट वर पुरी सब्जी , सत्तू की मठरी आणि आचार आणि मसाला मरमारा यांचा दिवसभर चाललेला रतीब, 

अख्खा संसार मुंबईला घेऊन चाललेले नव वधू आणि वर आणि त्यांच्यासोबत एखादी म्हातारी , संसार लावून द्यायला. 

“बडे चाचा को मीरा रोड में पार्किंग का काँट्राक्ट मिला है तो उन्होने बुला लिया “ म्हणत पहिल्यांदाच गाव सोडणारे , तर दोन तीन पिढ्या मुंबईत राहून , अस्खलित मराठीत बोलणारे , गावाशी बऱ्यापैकी नाळ तुटलेले पण तरीही एखाद दोन वर्षातून एकदा गावाला जाणारे.  

मग ते आपल्याला सांगतात , “आमचं कसं रे , लहानपणापासून शेजार पाजार, मित्र मंडळी सगळे मराठी. आता माझी मराठी ऐकून कोणाला वाटणार पण नाही माझं आडनाव गुप्ता आणि गाव मिर्झापूर ते . गावाला जायला नको वाटतं रे . तुला सांगतो हे लोक जेवढे गलिच्छ मुंबईत राहतात ना त्याच्यापेक्षा दहापट गलिच्छ गावात राहतात . दिवसभर नुसतं ते पान तंबाखू खात इथं तिथं थुकत रहायचं. पोरांना तर अजिबात आवडत नाही पण काय करणार वडिलांच्या नावावर जमीन आहे चुलत्याचा डोळा आहे लक्ष ठेवायला जायला लागतं.” आपण मनात विचार करतो चायला हा तर आपल्यापेक्षा कट्टर मराठी निघाला . 


ट्रेन पुढे सरकत राहते . 

“अब मुंबईमें आना और बस जाना उतना सहज भी नही रहा. वो ही आ सके अब मुंबई में जिसका कोई अपना रिश्तेदार यहा हो या फिर अच्छी खासी जॉब लगी हो . अब हमारे गांव से ज्यादातर लोग गुजरात वगैरा जाते है” 

बाजूच्या सिट वरचा खोकणारा म्हातारा त्याला अनुमोदन देतो. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची सून त्याला औषध आणून देते. “ये लिजिये पापा. आधे घंटे बाद मनोज खाना लेके आयेगा” म्हणत. ती गेल्यावर म्हातारा म्हणतो , “ ये हमार छोटकी बहुरानी. मराठी है. दुई महिना  हुआ है शादी को . पहली बार गांव लेके गये थे इस वक्त. शादी तो बंबई में ही किए थे क्यूँकी”

मग त्याच्यात आणि अजून एका जणात अस्खलित भोजपुरी मध्ये मराठी लोकांची लग्न कशी सुटसुटीत एका दिवसात आटोपतात आणि आपल्याकडे गावाकडे कसं अगदी चार -पाच दिवस वेळ, पैसा , फुकटचे मानपान, हुंडा वगैरे असं सगळं करायला लागतं यावर दहा मिनिट चर्चा होते.


एकूणात उत्तर भारतीयांवद्दल मनात राग नसेल तर छत्तीस तासांचा मुंबई - वाराणसी - मुंबई पर्यंतचा प्रवास व्यवस्थित होऊ शकतो.


शेंडी ठेवलेला एखादा पंडित , “अब आये हो तो अयोध्या भी हो आओ पुण्य मिलेगा “ असं सांगतो. एखादा कुशवाह, मोदीजीनी किती systematically मायावतींची SC -ST वोट बँक तोडत आणि ओबीसी ना आपल्या बाजूला खेचून घेत मुस्लिम -यादव समीकरणाची आणि पर्यायाने अखिलेश मुलायम ची कशी जिरवली हे सांगतो.


वाराणसी , बलिया , जौनपूर , भदोही , इलाहाबाद , मिर्जापुर, बरैली, गोरखपूर. 

यू पी , बिहार ला जाणाऱ्या कोणत्याही ट्रेन मध्ये बसलात तरी ही अशी दृश्यं, अशी माणसं दिसतातच , भेटतातच. 

आपण फक्त कान , डोळे आणि मन उघडं ठेवायचं. मुंबईसारखं. सगळ्यांसाठी, सदैव . 


- अभिषेक राऊत 

Tuesday, February 25, 2025

बनारस - काही नोंदी. - काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरीडोर वगैरे.

“नमामी शमिशान निर्वाणरूपम, विभू व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम …”


संतकवी तुलसीदासने लिहिलेलं रुद्राष्टकम धीरगंभीर आवाजात सुरू असतं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरातली रांग हळू हळू पुढे सरकत असते. 

देवाच्या रांगेत असताना डोळे मिटून नामस्मरण वगैरे करावं म्हणतात. पण मला ते जमत नाही . मी डोळे अगदी उघडे ठेवतो. त्याने अनेक गोष्टी अशा दिसतात ज्या दिसू नयेत म्हणून कदाचित भगवंताने डोळ्यावर पट्टी बांधून घ्यावी. 

मंदिरात जायला अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात प्रशस्त मार्ग घाटाच्या समोरचा. जिथून काशी विश्वनाथ कॉरिडोर आहे तो. 

गंमत बघा . आधी म्हणजे खूप खूप आधी फक्त गंगा होती . मग मंदिर झालं, घाट झाले , मंदिराभोवती , मंदिराला लागून घरं झाली , वस्ती झाली अगदी दाट . मग मंदिर भ्रष्ट झालं , पिंडीवर घाला घातला गेला , मशीद उभी राहिली , काळाच्या ओघात मंदिर पुन्हा उभं राहिलं. पुन्हा आजूबाजूला तशीच दाट वस्ती , घरं, दुकानं सगळं तसंच. मंदिरात मंत्र म्हटले जाऊ लागले आणि मशिदीत शुक्रवारचे नमाज. मग मशिदीतल्या वादग्रस्त भागाला कुलूप लावण्यात आलं. मग मंदिराला भव्य दिव्य बनवण्यासाठी कॉरिडोर झाला. कॉरिडोर म्हणजे काय तर मंदिराचं नूतनीकरण. आजूबाजूची घरं, दाट लोकवस्ती , दुकानं हे सगळं योग्य मोबदला देऊन हटवून मंदिराचं प्रशस्तीकरण. रांगेत उभं राहिल्यावर  मंदिर प्रांगणाचा प्रशस्तपणा दिसतो , भव्य काशी , दिव्य काशी चे स्लोगन्स दिसतात. भारतमातेचा पुतळा आहे मंदिर प्रांगणात. शिवाय इतर ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती असलेली छोटी मंदिरे, सगळं चकाचक , सुंदर. कौतुक करायचं फक्त. 


रांग पुढे पुढे सरकत राहते. पुढे मागे एखादा बनारसीया असतोच. हातात दुधाचा प्याला आणि बेलपत्र. “पैतीस साल से आ रहे है. रोज. दूध चढाते है और पत्री. फिर निकल जाते है रोज के कामकाज को. अब तो खैर मोदीजी ने सब बदल दिया. लेकिन आच्छा है. बदलाव होना चाहिये. दो चार घर दुकाने टूटी है लेकिन उसका पैसा भी बोहोत दिये है सरकार. इसिलिये तो जिताया मोदीजी को. वापस जितायेंगे. मंदिर तो खूब बढिया बन गया अब. लेकिन भगवान का असल स्थान तो आज भी भ्रष्ट है. भोलेबाबा चाहेंगे तो वो भी शुद्ध होगा. “ मग आपण विचारायचं, “भोलेबाबा या फिर मोदी और योगी बाबा ? “. मग तो फक्त हसतो. 

रांग पुढे सरकत राहते. 

मंदिराला भव्य दिव्य बनवताना झालेल्या घरांच्या , दुकानांच्या पडापडीचे अवशेष आहेत थोडेफार आजूबाजूला. रांगेतून ते दिसतात. साधारणपणे तीनशे घरं, त्यापेक्षा दुप्पट दुकानं, बरीचशी छोटी मोठी मंदिरे सुद्धा आणि जवळपास ६०० परिवार याना आर्थिक मोबदला देऊन हटवण्यात आलं आणि मंदिर प्रशस्त केलं गेलं. स्वच्छ, सुंदर केलं गेलं. त्यातही आता चार वर्षं झाली. भाविकांची संख्या आता वाढलीये. काशी मध्ये या आधी भाविक येत होतेच पण आता त्यांची संख्या दुप्पट, तिप्पट  झालीय. रांग पुढे सरकत राहते. 

“क्या सोच रहे हो भय्या??” बनारसिया पुन्हा गप्पा मारायला चालू करतो. “कुछ साल पहले ऐसे पिंडी को हाथ लगाकर दूध चढाते थे. अब थोडा दूर से. मंदिर जितना बडा हो जाये, भगवान उतना दूर से देखना पडता है. लेकीन सही है , मोदीजी इतना सुंदर मंदिर बनाये, सनातन धर्म का डंका बज रहा है विश्व में. और क्या चाहिये ?? 

और रही बात बाबा की , तो बाबा विश्वनाथजी तो दिल में है हमारे” . 

रांग पुढे सरकत राहते.

आपण कधी पिंडीच्या समोर उभे राहिलो आणि कधी पुजाऱ्याने आपल्याला ओढून बाजूला केलं हे आठवत नाही . मग मी मंदिराच्या प्रांगणात सावलीखाली शांत बसतो. ज्ञानवापी मशिदीकडे कडे तोंड करून असलेल्या नंदीकडे बघत बसतो. 


आज दोन महिने झाले. आज महाशिवरात्र. मी आठवून आठवून थकलो पण मला अजूनही विश्वनाथाच्या मंदिराचा गाभारा आठवत नाही किंवा पिंड सुद्धा आठवत नाही.

मला फक्त आठवतात बनारसच्या त्या सामान्य माणसाचे शब्द. “विश्वनाथजी तो दिल मे है हमारे. और क्या चाहिये”.  


-अभिषेक राऊत 





Friday, February 14, 2025

प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.


आयुष्यात कधी मी कुंभ मेळ्याला जाईन असं वाटलं नव्हतं. 
 डोंबिवलीतल्या टिपिकल मध्यमवर्गीय घरात मी वाढलो. देवाबद्दल श्रद्धा असली तरी देवभोळेपणा वगैरे नव्हता. 

शिवाय वडिलांचे विचार बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आणि थोडेफार समाजवाद वगैरे कडे झुकणारे. अनेक वर्ष , “गंगेत स्नान केल्याने पुण्य पदरात पडेल याची शाश्वती नाही मात्र दोन चार त्वचेचे रोग नक्की होतील” असं माझं ठाम मत होतं. (अजूनही आहे ). इतकंच काय , दोनेक महिन्यांआधी वाराणसीला गेलेलो तेव्हा वडील म्हटलेले, जातोच आहेस तर अलाहबाद ला जाऊन ये. नेहरुंचं “आनंद भवन “ पाहण्यासारखं आहे. संगम वगैरेला त्यांच्या लेखी फार महत्व नव्हतं.  


पण मी ठरवलं की जायला पाहिजे , बघायला पाहिजे , अनुभवायला पाहिजे. एक दिवस का होईना , जीवाचा कुंभमेळा केला पाहिजे. 


तर आता , मी पाहिलेल्या कुंभ मेळ्याची कहाणी… 


समुद्र मंथन झालं आणि त्यातून अमृत बाहेर आलं. अमृताने भरलेला घडा म्हणजेच कुंभ जसजसा  समोर दिसू लागला तसं देव आणि दानवांमध्ये त्यावरून जुंपली. त्यांच्या खेचाखेचीत त्या कुंभातून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले. पुढे विष्णूने मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचं रूप घेऊन राक्षसांना वेड्यात काढत सगळं अमृत देवांना पाजलं. 

पण ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब सांडले तिथे , म्हणजे हरिद्वार , इलाहाबाद , नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी एका विशिष्ट तिथीला स्नान केलं की त्याचं पुण्य अमृत स्नानाएवढं मानलं जाऊ लागलं. आणि तिथे भरू लागले अर्ध कुंभ , पूर्ण कुंभ आणि महा कुंभ . दर काही वर्षांनी आलटून पालटून. 

आता ही गोष्ट खरंतर एखादी फँटसी कथा वाटेल पण 

धर्माची ताकद काय असते तर एरवी एखाद्या फँटसीच्या पुस्तकात शोभेल अशा गोष्टीला धर्माची , पाप-पुण्याची आणि थोडीफार देवाच्या भीतीची जोड दिली की त्या गोष्टीवर पिढ्यानपिढ्या , हजारो वर्षं लोक विश्वास ठेवतात. प्रयागराजच्या रस्त्यावरून गंगा आणि यमुनेच्या संगमाकडे जाताना धर्माच्या या ताकदीचा प्रत्यय पावलागणिक येत जातो. 

संगम -

 गंगा आणि यमुनेचा. दोन महत्वाच्या नद्या. भारताची आणि त्यातही उत्तर भारताची  संस्कृती या दोन नद्यांभोवती विणली गेलीये.

कितीतरी गोष्टी , गाणी , मिथकं या नद्यांबद्दल जनमानसात रुजली आहेत. 

तर संगम…. एका बाजूला यमुना , भगवान कृष्णाच्या बालपणीच्या लीला बघितलेली, तिच्याच डोहात उतरून कृष्णाने कालियामर्दन केलं, गवळणींच्या मडक्यातलं दही दूध लोणी खाल्लं अशी कृष्णलीलांची साक्षीदार यमुना. तर दुसऱ्या बाजूला गंगा. साक्षात भगवान शंकराने जटेत धारण केलेली, फक्त भगीरथाच्याच नाही तर अख्ख्या भारतभूमीच्या उद्धारासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली गंगा , गंगामैया.  आणि गुप्तपणे वाहणारी सरस्वती. त्रिवेणी संगम. 

होडीतून संगमाकडे जायचं. लाकडी होड्या , एका होडीत ८-१० जण. होडीवाला तुमच्या तोंडाकडे बघून सांगतो , माणशी हजार रुपये. त्याला माहीत असतं कोणाला काय भाव सांगायचा. 

त्याच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी श्रद्धाळूना गंगापार सोडलं असेल. केवट जातीचे हे लोक. पिढ्यांपिढ्या गंगेत नाव चालवून पोट भरणारे. त्यांचा आद्य निषादराज. श्रीराम वनवासात निघाले तेव्हा त्यांना शरयू पार करून देणारा. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.  तर तुमच्याकडून माणशी हजार रुपये घेणारा परत नेताना तुम्हाला बजावतो , “आपने कितना पैसा दिया किसी को बताओ मत”.  त्याला माहीत 

असतं, श्रद्धा प्रत्येकाची सारखी असली तरी त्याचं मोल मोजण्याची कुवत प्रत्येकाची वेगवेगळी. नुसत्या श्रद्धेने पोट भरत नाही पण त्याला पैशांची जोड मिळाली की कित्येक भुकेली पोटं सहज भरतात. 


स्नान - 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमावर स्नान. लाखो करोडो लोक येतात रोज. सगळ्यांचं ध्येय एकच. एक डुबकी मारायची. कोण कोण कुठून कुठून येतं. ज्याला जसं जमेल तसं येतं. चालत , बसने, ट्रेन ने , विमानाने, हेलिकॉप्टरने, स्वतःच्या विमानाने. ज्याला जसं जमेल आणि मानवेल तसं. 

महंत येतात , आचार्य येतात , शंकराचार्य येतात , नागा साधू येतात.  साहजिक आहे ना , मेंढ्यांचा कळप निघाला की मेंढपाळ सुद्धा निघतातच.

अतिसामान्य येतात , सामान्य येतात आणि असामान्य येतात. फक्त प्रत्येकाची सोय वेगवेगळी. अतिसामान्य चेंगराचेंगरीत मरतात,(किती मरतात , कसे मरतात,ते विचरायचं नाही बर का ) . सामान्य जिथे जमेल तिथे पटकन स्नान करून इन्स्टाग्राम वर ,”चलो कुंभ चले” वगैरे चे स्टेटस टाकतात. असामान्य मात्र उंचावर बसून या सगळ्या मेळ्याचे नियोजन किती उत्तम झाले म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतात. धर्म सांगतो सगळे समान आहेत पण धर्म रक्षकांना असं वागून चालत नाही. 


प्रयागराज - 

काही वर्षांपूर्वी इलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नुकतंच नामांतर झालं. कुंभ मेळा कित्येक शतकांपासून इथे भरतोय पण हा कुंभ मेळा विशेष. १४४ वर्षांनी आलेला महा कुंभ वगैरे. शहरासाठी आणि शहरातल्या प्रत्येकासाठी पैसे कमवण्याची संधी. शहरातला प्रत्येक जण या संधीचं सोनं करून घेत असतो. मग तो “हा हा बिलकुल संगम घाट पे छोडेंगे” म्हणत तिथून पाच किलोमीटर दूर सोडून ५०० रुपयाला चुना लावणारा बैटरी रिक्षावाला असू दे किंवा जेमतेम चार माणसं झोपतील एवढ्याशा खोलीचे वर तोंड करून माणशी १००० रुपये मागणारा हॉटेलवाला असू दे. 

इतकंच काय , कुंभमेळ्यातला साधू सुद्धा हातावर दहाची नोट ठेवल्याशिवाय पिशवीतून अंगारा काढून देत नाही.

एकूण काय तर , धर्म, श्रद्धा आणि त्यामागचं अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर प्रयागराज ला जायला पाहिजे. 


तरी आम्ही संत आणि महंत पहिले नाहीत. स्वतःच स्वतःला अभिषेक करून घेणारे महामंडलेश्वर पहिले नाहीत. नागा पहिले नाहीत किंवा अघोर पण पहिले नाहीत.

गांजा पिऊन प्रवचन देणारा आयआयटी बाबा पहिला नाही.  किंवा ती सुंदर डोळ्यांची मोनालिसा पाहिली नाही.

आम्ही साधू पाहिले ते पण चार पैशे काढून दिल्यावर आशीर्वाद म्हणून रुद्राक्ष देणारे. गर्दीत हात पकडून हातावर मंत्र पुटपुटत काहीतरी बोलणारे आणि “वो देखो उसने पैसा निकाला “ म्हटल्यावर तुमचा हात सोडून पैशेवाल्याचा हात पकडणारे. साधूंच्या वेषातले सामान्य!!!


माहिती ला ज्ञान समजण्याच्या आजच्या जगात कुंभ मेळा म्हणजे सनातन धर्माचा फार मोठा सोहळा वाटूच शकतो एखाद्याला. मला मात्र राहून राहून एक गोष्ट आठवली 

अस्सी घाटावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात बसलो होतो गप्पा मारत. “ये कुंभ के दो माह और उसके आगे और दो माह, कोई भी बनारसी गंगा में डुबकी लगाने से डरता है, इतनी मैली हो जाती है मैया” हे ऐकलं आणि एकदम चंद्रभागा आठवली. वारीनंतर तिची अवस्था सुध्दा गंगेसारखीच होत असेल किंवा मग सिंहस्थानंतर जशी गोदावरी. 

जसं सिंहस्थ आठवला तसं कुसुमाग्रज आठवले. आणि आठवली त्यांची कुंभमेळ्यावरची कविता. त्यातली चार कडवी पुढे देतो आणि थांबतो. पूर्ण कविता नक्की मिळवून वाचा 


 व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर

संताचे पुकार | वांझ झाले ||


रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग | तुडुंबला ||


हे साधू नाहतात | साधू जेवतात

साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||


यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची

चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||


अशी झाली सारी | कौतुकाची मात

गांजाची आयात | टनावारी ||


तुका म्हणे ऐसे | मायेचे माईंद 

त्यापाशी गोविंद | नाही नाही ||

Saturday, May 4, 2024

ट्रेन स्लो होते तेव्हा...

 शिवडी स्टेशन वर गाडीत चढलो आणि बसायला जागा नव्हती म्हणून दरवाजातच उभा होतो. शिवडी कडून मुंबईकडे जायला ट्रेन निघाली पण सकाळी सकाळी कुठल्या तरी सिग्नल मध्ये कसला तरी बिघाड आला असावा आणि गाडी शिवडी आणि कॉटन ग्रीन च्या दरम्यान अगदीच रेंगाळल्या सारखी चालू लागली. 

महिनाभरापूर्वी मी पुन्हा एकदा मुंबईत आलो तेव्हापासून ही अशी रेंगाळण्याची माझी पहिलीच वेळ. नाहीतर एवढ्या दिवसात मुंबईच्या वेगाने मला कधी मान वर करून बघायची फुरसत दिली नाही. फार विचार करायची फुरसत दिली नाही

आणि आज गाडी जेव्हा अशी थांबली , मध्येच . माझी नजर सगळीकडे फिरली आणि विचारांना वाऱ्याचा वेग आला. 

नेहमी खरंतर गाडी जशी शिवडी स्टेशन ला येते तसं तुमच्या उजव्या बाजूला नुसत्या उंचच उंच इमारती दिसायला लागतात. 50 मजली, 60 मजली, मान वर करून बघितल्या शिवाय त्या नजरेत मावतच नाहीत. स्काय स्क्रॅपर्स म्हणायचं त्यांना. तुम्ही नवीन असाल मुंबईत तर त्यांच्या उंचीने दडपायला होऊ शकतं.

पण तेच गाडीने शिवडी सोडलं की तिच्या डाव्या बाजूला मात्र या अशा बिल्डिंग नाहीत. तिथे पडकी गोदामं आहेत, पोर्ट ट्रस्ट ची थोडीफार ऑफिसं. थोडक्यात नजर वेधून घेणारं असं फारसं नाही. 

पण आजचा दिवस वेगळा होता. गाडी रेंगाळत कॉटन ग्रीन स्टेशनात शिरली आणि डाव्या बाजूच्या एका बिल्डिंगने माझं लक्ष वेधून घेतलं. 

नुसतीच ताडमाड उंच नव्हती ती. तीन किंवा फारतर चार मजली असावी. बांधकाम बघून आणि तिची स्टाईल बघून जुनी किंवा हेरिटेज प्रकारातली वाटत होती. पण बाहेर लागलेले दोन चार एअर कँडीशनर बघून वाटलं की अजूनही वापरात असेल ही. मग मी नाव पाहिलं , "कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया" "कॉटन एक्सचेंज बिल्डिंग" . म्हणजे कापसाचा शेअर बाजार असं म्हणलं तरी चालतंय.  थेट जुन्या काळाची म्हणजे जेव्हा इंग्रजांचा अंमल अखंड हिंदुस्थानावर होता, मुंबईची ओळख "कापड गिरण्यांचं शहर" किंवा "पूर्वेकडचं मँचेस्टर" अशी होती, भारतातून परदेशात जाणारं कापूस हे महत्वाचं नगदी पीक होतं तेव्हाची आठवण करून देणारी. 

गाडीने कॉटन ग्रीन सोडलं पण ती बिल्डिंग काही मनातून जाईना. साधारणपणे दोन रस्त्यांच्या सांध्यावर , V आकारात उभी असलेली ती बिल्डिंग. ही बिल्डिंग बांधली गेली असावी साधारणपणे 1920 च्या दरम्यान. त्यामुळे हिची बांधणी तशी एकदम ग्रँड ओल्ड व्हिक्टोरियन नाही. थोडीशी नावीन्याकडे झुकणारी. "Art neauvou" या प्रकाराची. फ्रेंच आर्किटेक्चरचा हाच प्रकार पुढे जाऊन "art deco" झाला आणि मुंबईचं आर्किटेक्चर म्हणून ओळखला जाऊ लागला. Art Deco पद्धतीने बांधलेल्या अनेक बिल्डिंग चर्चगेट, फोर्ट , हाय कोर्ट या भागात दिसतात. 

तर पुन्हा येऊया या कॉटन एक्सचेंज च्या इमार्टिकडे. कधी काळी तिला दिलेल्या "पेस्टल ग्रीन" रंगाच्या खुणा तिच्या अंगावर दिसत होत्या. एखाद दुसऱ्या खिडकीची काच तुटलेली पण त्याने तिचं सौंदर्य कमी होत नव्हतं , समांतर बांधणी मुळे आत असणारे लांबच लांब कोरिडॉर्स यांचा अंदाज येत होता. उंचच उंच जाणारे पिलर्स आणि मग त्यांच्या छताशी असणारी कलाकुसर लांबूनही कळत होती. 

कापसाच्या व्यापारात मुंबईचं नाव होऊ लागलं साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात.  १८४४ साली जगातलं कदाचित सगळ्यात पहिलं कॉटन एक्सचेंज (कापसाचा शेअर बाजार म्हणू) सुरू झालं मुंबईत काळबादेवीत. सुरुवातीला सगळं चालायचं ब्रिटिशांच्या अखत्यारीत म्हणजे इस्ट इंडिया कॉटन असोसिएशन मार्फत.  हळूहळू कापसाच्या व्यापारातील पैसा भारतातल्या गुजराथी आणि पारशी व्यापाऱ्यांनी हेरला आणि खेतान, खटाव आणि गोकुलदास सारखे व्यापारी इथल्या कापूस व्यापाराचे सम्राट बनले.  त्यांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सुरू केली आणि त्या अंतर्गत कापसाच्या व्यापारासाठी ही बिल्डिंग बांधली. कापसाच्या व्यापाराने ब्रिटिशांची गरज भागली पण खरी धन झाली व्यापाऱ्यांची, गिरणी मालकांची. एकेकाळी ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूची गोदामं कामगारांनी गजबजलेली होती, कापसानं आणि धान्यांनं भरलेली होती, या बिल्डिंगचे कोरिडॉर्स कापसाच्या भावाची बोली लावणाऱ्या आवाजानं दणदणत होते. ब्रिटिश व्हाइसरॉय, राणी एलिझाबेथ पासून ते अगदी नेहरू, गांधी इथपर्यंत सगळ्यांनी या बिल्डिंगला भेटी दिल्या होत्या. एकेकाळी मुंबईच्या कापड उद्योगतले मोठमोठे हस्ती मग ते गोकुलदास असोत, रुईया असोत, खटाव असोत, खेतान असोत किंवा पिरामल प्रत्येकाची इथे वर्दळ असायची. 

हळूहळू काळ बदलला. मुंबईच्या कापड व्यापराचं, गिरण्यांचं आणि गिरणी कामगारांचं काय झालं हे इतिहासाने नमूद करून ठेवलंय. गिरण्या आणि गिरणी कामगार संपले आणि व्यापार आणि व्यापारी तेवढे उरले.  

आज २०२४ . शंभर वर्षं झाली. आजही कॉटन ग्रीन स्टेशनात गाडी शिरताना डाव्या  बाजूला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया चं ऑफिस म्हणून ही बिल्डिंग उभी आहे. पूर्वीसारखी वर्दळ नसेल कदाचित पण चहलपहल अजूनही आहे. 

हळू हळू ट्रेन पुढे सरकते आणि मग आपल्याला दिसते उजव्या बाजूला एकेकाळी पिरामल ची कापडाची गिरणी असलेल्या जमिनीवर आता बांधकाम सुरू असलेली "पिरामल आरण्या" नावाची बिल्डिंग. चकचकीत, उंच, स्क्वेअर फुटाला लाखाचा भाव असलेली.

 या डाव्या आणि उजव्या बाजूत मुंबईच्या गेल्या शंभर वर्षातली स्थित्यंतरं आहेत. सामाजिक, आर्थिक, सगळीच. थोडं निवांतपणे पहिलं तर ती दिसतात, अनुभवता येतात. पण मुंबई इतकी फास्ट आहे की ती तुम्हाला एका जागी थांबू देत नाही, इतिहासाचा फार विचार करू देत नाही आणि भविष्याची स्वप्नं दाखवताना हातातून घसरत चाललेल्या वर्तमानाची जाणीव करून देत नाही. 

मी पोचलोय आता CSMT ला आणि धावतोय बस पकडायला. पुन्हा केव्हातरी माझी गाडी रेंगाळेल आणि पुन्हा मला विचार करायला मिळेल अशी अपेक्षा मुंबईकडून ठेवत. तोपर्यंत, मुंबई झिंदाबाद !!!

-  अभिषेक राऊत







Saturday, February 24, 2024

प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)

 मांडू ला गेलास की न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांग. असं भाच्याने सांगितल्याने आणि मी एक चांगला मामा असल्याने मध्य प्रदेश ची ट्रिप मांडू शिवाय करणार नव्हतोच. त्यातच आमच्या दोस्ताने एक दिवस राहण्यासाठी मांडू निवडलं होतं त्यामुळे मोकळ्यात वेळ होता. 

तर मांडू किंवा मांडव पण त्याच्याबद्दल बोलण्या आधी आपण बोलूयात माळव्याबद्दल. 

माळवा, हिंदीत म्हणतात मालवा. हा असा उभा आडवा भारत असेल तर त्याच्या थेट मध्यात पसरलेला , जवळजवळ 68 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला, काळ्या बेसाल्टचा हा जवळजवळ 80 हजार किलोमीटरचा पठाराचा टापू. विंध्य पर्वताच्या उत्तरेला कुठल्याश्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा आणि मग तो लाव्हा हजारो किलोमीटर पसरत जाऊन हळू हळू थंड झाला असावा. दक्खनच्या पठाराचंच एक्स्टेंशन खरं तर पण नर्मदा नदी वेगळं करते दोघांना.

 तर हा असा माळवा. महाकालच्या आशीर्वादाने पवित्र झालेला, "इंदौर के मिष्टान" खाऊन "चटोरा" झालेला, होळकर , पवार आणि सिंदिया सरदारांच्या पराक्रमाने गाजलेला, नर्मदेच्याआणि क्षीप्रेच्या पाण्याने हिरवागार फुललेला आणि राणी रुपमतीच्या प्रेमाने रोमँटिक झालेला माळवा. 

एकेकाळी या माळव्यात राजा भोज आणि कविकुलगुरु कालिदास होता.

"आषाढस्य प्रथम दिवसे" अशी सुरुवात करत त्याने साक्षात आकाशातल्या काळ्या ढगाला आपल्या प्रेमाचा संदेश घेऊन प्रेयसीकडे पाठवलं आणि त्यातून उभं राहिलं अजरामर काव्य "मेघदूत". तुम्हाला सांगतो प्रेमात पडलेल्या माणसाने एक शब्द लिहिला तरी त्याचं काव्य होतं मग इथे तर साक्षात कालिदास होता म्हटल्यावर महाकाव्य होणारच ना. पण कालिदासबद्दल, मेघदूताबद्दल पुन्हा केव्हातरी. आजचा विषय आहे मांडू किंवा मांडव कारण तिथेही प्रेमाची दास्तान आहे आणि शिवाय आमच्या रोड ट्रिप मधलं ते एक महत्वाचं ठिकाण आहे. 

मला अनेकदा प्रश्न पडतो, आदर्श प्रेम कोणतं. ते कसं असतं . प्रेमात एकमेकांकडून अपेक्षाच ठेवू नयेत असं सांगणारं प्रेम आदर्श की प्रेमात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पार चन्द्र , सूर्य ,  तारे आणून देणारं प्रेम आदर्श!! 

म्हणजे आता बघा, दस्तुरखुद्द माळव्याचा सुलतान, शिकारीला जाताना एक मंजुळ आवाज ऐकतो काय, त्या आवाजाचा शोध घेताना त्याला त्या गाणाऱ्या तरुणीचं सौंदर्य भुरळ काय पाडतं आणि तो तिला विचारतो, मी असं काय करावं ज्याने तू माझी होशील, माझ्यासोबत माझ्या महालात येशील. 

साक्षात सुलतानाने असं विचारल्यावर कुणीही लगेच हो म्हणेल पण ती तरुणी म्हणते, "तुझं प्रेम असेल माझ्यावर पण माझं प्रेम आहे नर्मदेवर आणि रोज नर्मदेला बघून माझी सकाळ होते आणि तिच्या दर्शनाने संध्याकाळ. नर्मदा वाहते का तुझ्या मांडू मधून? बस्स तेवढं जर झालं तर मी लगेच येईन मांडू ला. "

याला म्हणायचा स्त्री हट्ट . प्रेमात हट्ट करावा तर असा. नाहीतर आमच्या बायकोने सांगितलेलं , "वाटतंय ना लग्न करावं मग स्विच कर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोध". अर्थात हे करतानाही माझ्या नाकी नऊ आलेले पण ते एक असो. 

तर रुपमतीने अट घातली सुलतान बाझ बहादूरला आणि तो कामाला लागला. तिच्यासाठी स्वतःच्या महालासमोरच्या टेकडीवर भला मोठा महाल बांधला. त्या महालाच्या मनोऱ्यामधून तरी नर्मदेचं दर्शन तिला होईल म्हणून. पण मांडू पासून जवळ जवळ 50 किलोमीटर दुरून वाहणाऱ्या नर्मदेला वळवायचं तरी कसं ?? त्याने नर्मदामय्येपुढे हात जोडले. तिला म्हणाला, "प्रेमाबद्दल मी तुला काय सांगू. पण ह्या रुपमतीच्या प्रेमात मी आकंठ बुडालोय आणि ती आहे तुझ्या प्रेमात. तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस सरत नाही आणि तुला पाहिल्याशिवाय तिचा दिवस सार्थ होत नाही. तू एकवेळ माझ्यासाठी येऊ नकोस पण रुपमतीसाठी ये." 

नर्मदेचं ह्रदय द्रवलं. ती म्हणाली, "मी येते. तुझ्या महालापासून थोडी दूर एक टेकडी आहे तिथं एक गोरख चिंचेचं (baobab tree) झाड आहे तिथं खणलास की जे लागेल तीच मी. रेवा. "

आणि मग बाझ बहादूर ने त्या झाडाखाली रेवा कुंड बांधलं. आणि त्या कुंडा समोरच्या टेकडीवर बांधला एक मोठ्ठासा महाल. तोच रुपमती महाल. 

त्या रुपमती महालाच्या खालच्या अंगाला सुलतान बाझ बहादूर चा महाल आहे. आधी त्याचा महाल बघायचा, मग रुपमती महाल आणि मग रेवा कुंड. 

असं म्हणतात , रुपमती रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या महालाच्या सगळ्यात वरच्या चौथऱ्यावर जाऊन उभी राहायची. तिथून तिला नर्मदा दिसायची आणि त्याच वेळी बाझ बहादूर आपल्या महालाच्या चौथऱ्यावर उभा राहून नर्मदेकडे एकटक पाहणाऱ्या रुपमतीकडे मोहित होऊन पाहायचा. न चुकता रोज. 


रुपमतीच्या महालात आता तसं काही नाही. जिथं उभं राहून रुपमती डोळ्यांत प्राण आणून नर्मदा दिसतेय का म्हणून बघायची तिथं जाण्याच्या जिन्याला सरकारने कुलूप  घातलंय. कधी कधी वाटतं आपण तिथे गेलो तरी आपल्याला थोडीच दिसणारे नर्मदा तिथून . त्यासाठी प्रेम हवं, नजरेत, मनात आणि आस असावी नर्मदेला पाहण्याची जशी रुपमती ला असायची रोज, उन्हा पावसात,थंडी वाऱ्यात न चुकता. कुलूप तोडून वर पोहोचलो तरी ना आपल्याला नर्मदा दिसणार ना आपल्याला पाहण्यासाठी कुणी बाझ बहादूर दूर खाली डोळ्यांत जीव आणून आपल्या येण्याची वाट पाहणार. 

पण खैर म्हणून प्रेम करूच नये असं काही नाही. प्रेम करावं , निभवावं आपल्या आपल्या पद्धतीने. जसं पुढे जाऊन रुपमतीने निभावलं. अकबराच्या सरदाराने बाझ बहादूर ला मारलं आणि रुपमतीचं चारित्र्य भ्रष्ट होतंय की काय अशी परिस्थिती आली तेव्हा त्या पवित्र नर्मदेच्या रेवा कुंडात रुपमती ने जल समाधी घेतली. प्रेमात केलेला जौहार... नर्मदेच्या पाण्याने पवित्र झालेलं हे कुंड रुपमतीच्या प्रेमतल्या बलिदानाने अजून झळाळून निघालं. प्रेमाची महती ही अशी. आजही नर्मदेची परिक्रमा या रेवा कुंडाचं दर्शन घेतल्या शिवाय आणि रुपमती आणि बाझ बहादूर च्या प्रेमाची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. 


मला मांडू मध्ये सरलेली आमची रात्र आठवते. डोंगराच्या टोकावरचं हॉटेल, बारीकशी थंडी आणि सोबतीला निवांतपणा. आदल्या रात्रीच पौर्णिमा झाली होती. समोरच्या दरीतल्या झाडांच्या शेंड्यावर चांदण प्रकाश पडलेला, हलकासा वारा वाहत होता, जगजीत ची गझल लागलेली, "कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा", 

गझल उलगडत होती आणि मित्र सांगत होता त्याच्या प्रेमाची गोष्ट. 

एकच स्वप्न दोघांनी एकत्र पाहणं, मग कित्येक वर्षं, किती उतार चढाव, खाच खळगे, केवढी जवळीक केवढा दुरावा, आणि मग शेवटी ते स्वप्नं सत्यात येणं. खरंच प्रेमात पडणं प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही..


मित्राची गोष्ट ऐकता ऐकता पुन्हा रुपमती आठवली. 

असं म्हणतात अजूनही रुपमती दर पौर्णिमेला तिच्या महालात येते, जिन्याला घातलेल्या कुलुपाचं तिला बंधन नाही. ती वर चढते, तिच्या आवडीच्या जागी उभं राहून डोळे भरून नर्मदेला पाहते , डोळ्यांच्या एक कोनातून तिला दिसतं की बाझ बहादूर पण आपल्याकडे बघतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची खात्री झाली की दोघेही निघून जातात पुन्हा पुढच्या पौर्णिमेला परत येण्यासाठी....


एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जीवांच्या गोष्टी अशाच असतात. म्हटलं तर खऱ्या म्हटलं तर दंतकथा.  त्या ऐकायच्या असतात, ऐकवायच्या असतात, त्यांची गाणी करून गायची असतात आणि प्रेमाच्या गोष्टी चिरंतन टिकवायच्या असतात. 


म्हणून तुम्ही सुद्धा न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांगा.


- अभिषेक राऊत