हळू हळू सूर्य पश्चिमेला कलू लागतो. संध्याकाळ होते . दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीची तयारी सुरू होते. काशी विश्वेश्वराच्या देवळातला घंटानाद आसमंत भारून टाकू लागतो. मंदिराबाहेरच्या मणिकर्णिका घाटावर चिता पेटलेली असते.
गंगा आरती संपते. घाट गजबजून उठतात. आकाशातली चंद्राची कोर हळू हळू ठळक होऊ लागते. आकाश निरभ्र असेल तर चांदण्या गंगेच्या पाण्यावर उतरतात. एक एक घाट ओलांडून मणिकर्णिका घाटाजवळ जायचं. गडद काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्याकंच केशरी रंगाच्या ज्वाळा उठून दिसतात. अविरत चालू असतं त्या ज्वाळांचं आभाळाला भिडणं.
रात्र अजून गहिरी होते. घाटांवरचा कोलाहल थांबतो. दिवसभर गंगेच्या पात्रात असणाऱ्या होड्या घाटाकडेला बांधल्या जातात. एखाद दुसरा बाबा चिलीम ओढत घाटाच्या पायऱ्यांवर पथारी पसरतो. दोन चार अघोरी साधू साधना करत असतात. एक स्तब्धता येते वातावरणात. चालू असते फक्त मणिकर्णिका घाटावरची अविरत चिता.
आणि मग काल मावळलेला सूर्य अस्सी घाटाच्या समोरून हळू हळू परत वर येऊ लागतो. सारस पक्ष्यांचे थवे गंगेच्या पाण्यावरून उडू लागतात. एखादा कलाकार घाटाच्या पायऱ्यांवर बसून बासरीचे सूर छेडू लागतो. काल-चक्र पुन्हा सुरू होतं आणि तिथे मणिकर्णिका घाटावर मृत्युचक्र सुरूच असतं अविरत.
मी वाचलं की मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण करण्यासाठी काही मंदिरे तोडली गेली वगैरे.
किती किती बारकी बारकी मंदिरे आहेत हो काशीत. नजर जाईल तिकडे मंदिर आणि हात लागेल त्या दगडाला शेंदूर फासलेला. आणि हे आज नाही , पुरातन काळापासून तसंच.
साक्षात विश्वेश्वराच्या मंदिराचं सुशोभीकरण करून कॉरिडोर बांधला तेव्हा अनेकांची घरं, दुकान तोडली आहेत .
तर मणिकर्णिका घाटासाठी तोडली आजूबाजूची दोन चार मंदिरे तर काय एवढं. लोक उगाच म्हणतात , बनारस की रूह छीन ली वगैरे.
तर मणिकर्णिका घाट. सगळ्यांना वाटतं मरण यावं तर काशीत आणि अंत्यसंस्कार व्हावेत तर मणिकर्णिका घाटावर. मोक्ष मिळतो म्हणे. सदैव सुरू असतात तिथे चिता.
घाटाच्या बाजूचा रस्ता अगदी चिंचोळा आहे. त्या रस्त्यावरून सदैव प्रेतांची रीघ लागलेली असते. बाकी गर्दी सुद्धा असतेच. लोक कुठून कुठून येतात मोक्ष प्राप्ती साठी काशी मध्ये शेवटचा श्वास घ्यायला.
मृत्यू यायच्या आधी ते असतात माणसं आणि मृत्यू आला की एका क्षणात त्यांची होते “बॉडी” . मग चार पैसे देऊन चौघांच्या खांद्यावर ती बॉडी जाते मणिकर्णिका घाटाच्या पायऱ्यांवर. तिथे होतात सौदे तिथल्या “डोम” राजासोबत.
बॉडीला फासलं जातं तूप , बाजूच्या गाळ्यांमध्ये रचलेली चंदनाची लाकडं जमवून रचली जाते चिता. डोंब उसळतो आगीचा.
मृताला मिळतो मोक्ष. त्याच्या नातेवाईकांना मिळतं समाधान , पिढ्यान पिढ्या प्रेतं जाळणाऱ्या हातांना मिळतात पैसे आणि गंगेच्या विशाल पात्राला मिळते कधी राख तर कधी अर्धवट जळलेले बॉडीचे तुकडे.
गंगामाई सगळं तिच्या पोटात घेऊन वाहत राहते.
मसान चित्रपट पाहिला असेल तुम्ही त्यात आहेच हे सगळं दाखवलेलं….
मणिकर्णिका घाटाच्या त्या बारक्या गल्लीतून गंगेकडे जाताना अनेक विचार मनात येतात. अंगाला घासून जाणाऱ्या तिरड्या आणि त्यावर निश्चल पडलेले देह. निव्वळ व्यवसाय म्हणून पिढ्यान पिढ्या चितेला डोंब लावण्याचं काम करणारे लोक , चंदनाच्या लाकडांचा नाकात जाणारा वास, एकच वेळी जळणाऱ्या चार , चार , पाच पाच चिता, धूर आणि एक चिता विझण्या आधीच दुसरी चिता रचायची घाई. सगळं बघून एक रितेपणा येतो
दोनच उपाय उरतात. एकतर घाटावरून गंगेकडे जावं आणि होडीत बसून दूर दूर जावं किंवा ….
बिन चेहऱ्याच्या गर्दीला , “हे राम जयराम” च्या आवाजाला , सजवलेल्या तिरड्यांना भिडावं आणि त्याच बारीकशा गल्लीतून वरच्या अंगाला जावं - तिथं जगात भारी लस्सीचं दुकान आहे - ब्लू लस्सी वाला. त्या ब्लू लस्सी वाल्याकडे बसावं, मस्त लस्सी प्यावी , खुश व्हावं कारण मरणाला बघितल्यावर जगण्याला भिडायला जास्त मजा येते.
- अभिषेक राऊत
No comments:
Post a Comment