Friday, February 14, 2025

प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.


आयुष्यात कधी मी कुंभ मेळ्याला जाईन असं वाटलं नव्हतं. 
 डोंबिवलीतल्या टिपिकल मध्यमवर्गीय घरात मी वाढलो. देवाबद्दल श्रद्धा असली तरी देवभोळेपणा वगैरे नव्हता. 

शिवाय वडिलांचे विचार बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आणि थोडेफार समाजवाद वगैरे कडे झुकणारे. अनेक वर्ष , “गंगेत स्नान केल्याने पुण्य पदरात पडेल याची शाश्वती नाही मात्र दोन चार त्वचेचे रोग नक्की होतील” असं माझं ठाम मत होतं. (अजूनही आहे ). इतकंच काय , दोनेक महिन्यांआधी वाराणसीला गेलेलो तेव्हा वडील म्हटलेले, जातोच आहेस तर अलाहबाद ला जाऊन ये. नेहरुंचं “आनंद भवन “ पाहण्यासारखं आहे. संगम वगैरेला त्यांच्या लेखी फार महत्व नव्हतं.  


पण मी ठरवलं की जायला पाहिजे , बघायला पाहिजे , अनुभवायला पाहिजे. एक दिवस का होईना , जीवाचा कुंभमेळा केला पाहिजे. 


तर आता , मी पाहिलेल्या कुंभ मेळ्याची कहाणी… 


समुद्र मंथन झालं आणि त्यातून अमृत बाहेर आलं. अमृताने भरलेला घडा म्हणजेच कुंभ जसजसा  समोर दिसू लागला तसं देव आणि दानवांमध्ये त्यावरून जुंपली. त्यांच्या खेचाखेचीत त्या कुंभातून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले. पुढे विष्णूने मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचं रूप घेऊन राक्षसांना वेड्यात काढत सगळं अमृत देवांना पाजलं. 

पण ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब सांडले तिथे , म्हणजे हरिद्वार , इलाहाबाद , नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी एका विशिष्ट तिथीला स्नान केलं की त्याचं पुण्य अमृत स्नानाएवढं मानलं जाऊ लागलं. आणि तिथे भरू लागले अर्ध कुंभ , पूर्ण कुंभ आणि महा कुंभ . दर काही वर्षांनी आलटून पालटून. 

आता ही गोष्ट खरंतर एखादी फँटसी कथा वाटेल पण 

धर्माची ताकद काय असते तर एरवी एखाद्या फँटसीच्या पुस्तकात शोभेल अशा गोष्टीला धर्माची , पाप-पुण्याची आणि थोडीफार देवाच्या भीतीची जोड दिली की त्या गोष्टीवर पिढ्यानपिढ्या , हजारो वर्षं लोक विश्वास ठेवतात. प्रयागराजच्या रस्त्यावरून गंगा आणि यमुनेच्या संगमाकडे जाताना धर्माच्या या ताकदीचा प्रत्यय पावलागणिक येत जातो. 

संगम -

 गंगा आणि यमुनेचा. दोन महत्वाच्या नद्या. भारताची आणि त्यातही उत्तर भारताची  संस्कृती या दोन नद्यांभोवती विणली गेलीये.

कितीतरी गोष्टी , गाणी , मिथकं या नद्यांबद्दल जनमानसात रुजली आहेत. 

तर संगम…. एका बाजूला यमुना , भगवान कृष्णाच्या बालपणीच्या लीला बघितलेली, तिच्याच डोहात उतरून कृष्णाने कालियामर्दन केलं, गवळणींच्या मडक्यातलं दही दूध लोणी खाल्लं अशी कृष्णलीलांची साक्षीदार यमुना. तर दुसऱ्या बाजूला गंगा. साक्षात भगवान शंकराने जटेत धारण केलेली, फक्त भगीरथाच्याच नाही तर अख्ख्या भारतभूमीच्या उद्धारासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली गंगा , गंगामैया.  आणि गुप्तपणे वाहणारी सरस्वती. त्रिवेणी संगम. 

होडीतून संगमाकडे जायचं. लाकडी होड्या , एका होडीत ८-१० जण. होडीवाला तुमच्या तोंडाकडे बघून सांगतो , माणशी हजार रुपये. त्याला माहीत असतं कोणाला काय भाव सांगायचा. 

त्याच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी श्रद्धाळूना गंगापार सोडलं असेल. केवट जातीचे हे लोक. पिढ्यांपिढ्या गंगेत नाव चालवून पोट भरणारे. त्यांचा आद्य निषादराज. श्रीराम वनवासात निघाले तेव्हा त्यांना शरयू पार करून देणारा. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.  तर तुमच्याकडून माणशी हजार रुपये घेणारा परत नेताना तुम्हाला बजावतो , “आपने कितना पैसा दिया किसी को बताओ मत”.  त्याला माहीत 

असतं, श्रद्धा प्रत्येकाची सारखी असली तरी त्याचं मोल मोजण्याची कुवत प्रत्येकाची वेगवेगळी. नुसत्या श्रद्धेने पोट भरत नाही पण त्याला पैशांची जोड मिळाली की कित्येक भुकेली पोटं सहज भरतात. 


स्नान - 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमावर स्नान. लाखो करोडो लोक येतात रोज. सगळ्यांचं ध्येय एकच. एक डुबकी मारायची. कोण कोण कुठून कुठून येतं. ज्याला जसं जमेल तसं येतं. चालत , बसने, ट्रेन ने , विमानाने, हेलिकॉप्टरने, स्वतःच्या विमानाने. ज्याला जसं जमेल आणि मानवेल तसं. 

महंत येतात , आचार्य येतात , शंकराचार्य येतात , नागा साधू येतात.  साहजिक आहे ना , मेंढ्यांचा कळप निघाला की मेंढपाळ सुद्धा निघतातच.

अतिसामान्य येतात , सामान्य येतात आणि असामान्य येतात. फक्त प्रत्येकाची सोय वेगवेगळी. अतिसामान्य चेंगराचेंगरीत मरतात,(किती मरतात , कसे मरतात,ते विचरायचं नाही बर का ) . सामान्य जिथे जमेल तिथे पटकन स्नान करून इन्स्टाग्राम वर ,”चलो कुंभ चले” वगैरे चे स्टेटस टाकतात. असामान्य मात्र उंचावर बसून या सगळ्या मेळ्याचे नियोजन किती उत्तम झाले म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतात. धर्म सांगतो सगळे समान आहेत पण धर्म रक्षकांना असं वागून चालत नाही. 


प्रयागराज - 

काही वर्षांपूर्वी इलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नुकतंच नामांतर झालं. कुंभ मेळा कित्येक शतकांपासून इथे भरतोय पण हा कुंभ मेळा विशेष. १४४ वर्षांनी आलेला महा कुंभ वगैरे. शहरासाठी आणि शहरातल्या प्रत्येकासाठी पैसे कमवण्याची संधी. शहरातला प्रत्येक जण या संधीचं सोनं करून घेत असतो. मग तो “हा हा बिलकुल संगम घाट पे छोडेंगे” म्हणत तिथून पाच किलोमीटर दूर सोडून ५०० रुपयाला चुना लावणारा बैटरी रिक्षावाला असू दे किंवा जेमतेम चार माणसं झोपतील एवढ्याशा खोलीचे वर तोंड करून माणशी १००० रुपये मागणारा हॉटेलवाला असू दे. 

इतकंच काय , कुंभमेळ्यातला साधू सुद्धा हातावर दहाची नोट ठेवल्याशिवाय पिशवीतून अंगारा काढून देत नाही.

एकूण काय तर , धर्म, श्रद्धा आणि त्यामागचं अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर प्रयागराज ला जायला पाहिजे. 


तरी आम्ही संत आणि महंत पहिले नाहीत. स्वतःच स्वतःला अभिषेक करून घेणारे महामंडलेश्वर पहिले नाहीत. नागा पहिले नाहीत किंवा अघोर पण पहिले नाहीत.

गांजा पिऊन प्रवचन देणारा आयआयटी बाबा पहिला नाही.  किंवा ती सुंदर डोळ्यांची मोनालिसा पाहिली नाही.

आम्ही साधू पाहिले ते पण चार पैशे काढून दिल्यावर आशीर्वाद म्हणून रुद्राक्ष देणारे. गर्दीत हात पकडून हातावर मंत्र पुटपुटत काहीतरी बोलणारे आणि “वो देखो उसने पैसा निकाला “ म्हटल्यावर तुमचा हात सोडून पैशेवाल्याचा हात पकडणारे. साधूंच्या वेषातले सामान्य!!!


माहिती ला ज्ञान समजण्याच्या आजच्या जगात कुंभ मेळा म्हणजे सनातन धर्माचा फार मोठा सोहळा वाटूच शकतो एखाद्याला. मला मात्र राहून राहून एक गोष्ट आठवली 

अस्सी घाटावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात बसलो होतो गप्पा मारत. “ये कुंभ के दो माह और उसके आगे और दो माह, कोई भी बनारसी गंगा में डुबकी लगाने से डरता है, इतनी मैली हो जाती है मैया” हे ऐकलं आणि एकदम चंद्रभागा आठवली. वारीनंतर तिची अवस्था सुध्दा गंगेसारखीच होत असेल किंवा मग सिंहस्थानंतर जशी गोदावरी. 

जसं सिंहस्थ आठवला तसं कुसुमाग्रज आठवले. आणि आठवली त्यांची कुंभमेळ्यावरची कविता. त्यातली चार कडवी पुढे देतो आणि थांबतो. पूर्ण कविता नक्की मिळवून वाचा 


 व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर

संताचे पुकार | वांझ झाले ||


रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग | तुडुंबला ||


हे साधू नाहतात | साधू जेवतात

साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||


यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची

चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||


अशी झाली सारी | कौतुकाची मात

गांजाची आयात | टनावारी ||


तुका म्हणे ऐसे | मायेचे माईंद 

त्यापाशी गोविंद | नाही नाही ||

Saturday, May 4, 2024

ट्रेन स्लो होते तेव्हा...

 शिवडी स्टेशन वर गाडीत चढलो आणि बसायला जागा नव्हती म्हणून दरवाजातच उभा होतो. शिवडी कडून मुंबईकडे जायला ट्रेन निघाली पण सकाळी सकाळी कुठल्या तरी सिग्नल मध्ये कसला तरी बिघाड आला असावा आणि गाडी शिवडी आणि कॉटन ग्रीन च्या दरम्यान अगदीच रेंगाळल्या सारखी चालू लागली. 

महिनाभरापूर्वी मी पुन्हा एकदा मुंबईत आलो तेव्हापासून ही अशी रेंगाळण्याची माझी पहिलीच वेळ. नाहीतर एवढ्या दिवसात मुंबईच्या वेगाने मला कधी मान वर करून बघायची फुरसत दिली नाही. फार विचार करायची फुरसत दिली नाही

आणि आज गाडी जेव्हा अशी थांबली , मध्येच . माझी नजर सगळीकडे फिरली आणि विचारांना वाऱ्याचा वेग आला. 

नेहमी खरंतर गाडी जशी शिवडी स्टेशन ला येते तसं तुमच्या उजव्या बाजूला नुसत्या उंचच उंच इमारती दिसायला लागतात. 50 मजली, 60 मजली, मान वर करून बघितल्या शिवाय त्या नजरेत मावतच नाहीत. स्काय स्क्रॅपर्स म्हणायचं त्यांना. तुम्ही नवीन असाल मुंबईत तर त्यांच्या उंचीने दडपायला होऊ शकतं.

पण तेच गाडीने शिवडी सोडलं की तिच्या डाव्या बाजूला मात्र या अशा बिल्डिंग नाहीत. तिथे पडकी गोदामं आहेत, पोर्ट ट्रस्ट ची थोडीफार ऑफिसं. थोडक्यात नजर वेधून घेणारं असं फारसं नाही. 

पण आजचा दिवस वेगळा होता. गाडी रेंगाळत कॉटन ग्रीन स्टेशनात शिरली आणि डाव्या बाजूच्या एका बिल्डिंगने माझं लक्ष वेधून घेतलं. 

नुसतीच ताडमाड उंच नव्हती ती. तीन किंवा फारतर चार मजली असावी. बांधकाम बघून आणि तिची स्टाईल बघून जुनी किंवा हेरिटेज प्रकारातली वाटत होती. पण बाहेर लागलेले दोन चार एअर कँडीशनर बघून वाटलं की अजूनही वापरात असेल ही. मग मी नाव पाहिलं , "कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया" "कॉटन एक्सचेंज बिल्डिंग" . म्हणजे कापसाचा शेअर बाजार असं म्हणलं तरी चालतंय.  थेट जुन्या काळाची म्हणजे जेव्हा इंग्रजांचा अंमल अखंड हिंदुस्थानावर होता, मुंबईची ओळख "कापड गिरण्यांचं शहर" किंवा "पूर्वेकडचं मँचेस्टर" अशी होती, भारतातून परदेशात जाणारं कापूस हे महत्वाचं नगदी पीक होतं तेव्हाची आठवण करून देणारी. 

गाडीने कॉटन ग्रीन सोडलं पण ती बिल्डिंग काही मनातून जाईना. साधारणपणे दोन रस्त्यांच्या सांध्यावर , V आकारात उभी असलेली ती बिल्डिंग. ही बिल्डिंग बांधली गेली असावी साधारणपणे 1920 च्या दरम्यान. त्यामुळे हिची बांधणी तशी एकदम ग्रँड ओल्ड व्हिक्टोरियन नाही. थोडीशी नावीन्याकडे झुकणारी. "Art neauvou" या प्रकाराची. फ्रेंच आर्किटेक्चरचा हाच प्रकार पुढे जाऊन "art deco" झाला आणि मुंबईचं आर्किटेक्चर म्हणून ओळखला जाऊ लागला. Art Deco पद्धतीने बांधलेल्या अनेक बिल्डिंग चर्चगेट, फोर्ट , हाय कोर्ट या भागात दिसतात. 

तर पुन्हा येऊया या कॉटन एक्सचेंज च्या इमार्टिकडे. कधी काळी तिला दिलेल्या "पेस्टल ग्रीन" रंगाच्या खुणा तिच्या अंगावर दिसत होत्या. एखाद दुसऱ्या खिडकीची काच तुटलेली पण त्याने तिचं सौंदर्य कमी होत नव्हतं , समांतर बांधणी मुळे आत असणारे लांबच लांब कोरिडॉर्स यांचा अंदाज येत होता. उंचच उंच जाणारे पिलर्स आणि मग त्यांच्या छताशी असणारी कलाकुसर लांबूनही कळत होती. 

कापसाच्या व्यापारात मुंबईचं नाव होऊ लागलं साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात.  १८४४ साली जगातलं कदाचित सगळ्यात पहिलं कॉटन एक्सचेंज (कापसाचा शेअर बाजार म्हणू) सुरू झालं मुंबईत काळबादेवीत. सुरुवातीला सगळं चालायचं ब्रिटिशांच्या अखत्यारीत म्हणजे इस्ट इंडिया कॉटन असोसिएशन मार्फत.  हळूहळू कापसाच्या व्यापारातील पैसा भारतातल्या गुजराथी आणि पारशी व्यापाऱ्यांनी हेरला आणि खेतान, खटाव आणि गोकुलदास सारखे व्यापारी इथल्या कापूस व्यापाराचे सम्राट बनले.  त्यांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सुरू केली आणि त्या अंतर्गत कापसाच्या व्यापारासाठी ही बिल्डिंग बांधली. कापसाच्या व्यापाराने ब्रिटिशांची गरज भागली पण खरी धन झाली व्यापाऱ्यांची, गिरणी मालकांची. एकेकाळी ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूची गोदामं कामगारांनी गजबजलेली होती, कापसानं आणि धान्यांनं भरलेली होती, या बिल्डिंगचे कोरिडॉर्स कापसाच्या भावाची बोली लावणाऱ्या आवाजानं दणदणत होते. ब्रिटिश व्हाइसरॉय, राणी एलिझाबेथ पासून ते अगदी नेहरू, गांधी इथपर्यंत सगळ्यांनी या बिल्डिंगला भेटी दिल्या होत्या. एकेकाळी मुंबईच्या कापड उद्योगतले मोठमोठे हस्ती मग ते गोकुलदास असोत, रुईया असोत, खटाव असोत, खेतान असोत किंवा पिरामल प्रत्येकाची इथे वर्दळ असायची. 

हळूहळू काळ बदलला. मुंबईच्या कापड व्यापराचं, गिरण्यांचं आणि गिरणी कामगारांचं काय झालं हे इतिहासाने नमूद करून ठेवलंय. गिरण्या आणि गिरणी कामगार संपले आणि व्यापार आणि व्यापारी तेवढे उरले.  

आज २०२४ . शंभर वर्षं झाली. आजही कॉटन ग्रीन स्टेशनात गाडी शिरताना डाव्या  बाजूला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया चं ऑफिस म्हणून ही बिल्डिंग उभी आहे. पूर्वीसारखी वर्दळ नसेल कदाचित पण चहलपहल अजूनही आहे. 

हळू हळू ट्रेन पुढे सरकते आणि मग आपल्याला दिसते उजव्या बाजूला एकेकाळी पिरामल ची कापडाची गिरणी असलेल्या जमिनीवर आता बांधकाम सुरू असलेली "पिरामल आरण्या" नावाची बिल्डिंग. चकचकीत, उंच, स्क्वेअर फुटाला लाखाचा भाव असलेली.

 या डाव्या आणि उजव्या बाजूत मुंबईच्या गेल्या शंभर वर्षातली स्थित्यंतरं आहेत. सामाजिक, आर्थिक, सगळीच. थोडं निवांतपणे पहिलं तर ती दिसतात, अनुभवता येतात. पण मुंबई इतकी फास्ट आहे की ती तुम्हाला एका जागी थांबू देत नाही, इतिहासाचा फार विचार करू देत नाही आणि भविष्याची स्वप्नं दाखवताना हातातून घसरत चाललेल्या वर्तमानाची जाणीव करून देत नाही. 

मी पोचलोय आता CSMT ला आणि धावतोय बस पकडायला. पुन्हा केव्हातरी माझी गाडी रेंगाळेल आणि पुन्हा मला विचार करायला मिळेल अशी अपेक्षा मुंबईकडून ठेवत. तोपर्यंत, मुंबई झिंदाबाद !!!

-  अभिषेक राऊत







Saturday, February 24, 2024

प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)

 मांडू ला गेलास की न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांग. असं भाच्याने सांगितल्याने आणि मी एक चांगला मामा असल्याने मध्य प्रदेश ची ट्रिप मांडू शिवाय करणार नव्हतोच. त्यातच आमच्या दोस्ताने एक दिवस राहण्यासाठी मांडू निवडलं होतं त्यामुळे मोकळ्यात वेळ होता. 

तर मांडू किंवा मांडव पण त्याच्याबद्दल बोलण्या आधी आपण बोलूयात माळव्याबद्दल. 

माळवा, हिंदीत म्हणतात मालवा. हा असा उभा आडवा भारत असेल तर त्याच्या थेट मध्यात पसरलेला , जवळजवळ 68 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला, काळ्या बेसाल्टचा हा जवळजवळ 80 हजार किलोमीटरचा पठाराचा टापू. विंध्य पर्वताच्या उत्तरेला कुठल्याश्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा आणि मग तो लाव्हा हजारो किलोमीटर पसरत जाऊन हळू हळू थंड झाला असावा. दक्खनच्या पठाराचंच एक्स्टेंशन खरं तर पण नर्मदा नदी वेगळं करते दोघांना.

 तर हा असा माळवा. महाकालच्या आशीर्वादाने पवित्र झालेला, "इंदौर के मिष्टान" खाऊन "चटोरा" झालेला, होळकर , पवार आणि सिंदिया सरदारांच्या पराक्रमाने गाजलेला, नर्मदेच्याआणि क्षीप्रेच्या पाण्याने हिरवागार फुललेला आणि राणी रुपमतीच्या प्रेमाने रोमँटिक झालेला माळवा. 

एकेकाळी या माळव्यात राजा भोज आणि कविकुलगुरु कालिदास होता.

"आषाढस्य प्रथम दिवसे" अशी सुरुवात करत त्याने साक्षात आकाशातल्या काळ्या ढगाला आपल्या प्रेमाचा संदेश घेऊन प्रेयसीकडे पाठवलं आणि त्यातून उभं राहिलं अजरामर काव्य "मेघदूत". तुम्हाला सांगतो प्रेमात पडलेल्या माणसाने एक शब्द लिहिला तरी त्याचं काव्य होतं मग इथे तर साक्षात कालिदास होता म्हटल्यावर महाकाव्य होणारच ना. पण कालिदासबद्दल, मेघदूताबद्दल पुन्हा केव्हातरी. आजचा विषय आहे मांडू किंवा मांडव कारण तिथेही प्रेमाची दास्तान आहे आणि शिवाय आमच्या रोड ट्रिप मधलं ते एक महत्वाचं ठिकाण आहे. 

मला अनेकदा प्रश्न पडतो, आदर्श प्रेम कोणतं. ते कसं असतं . प्रेमात एकमेकांकडून अपेक्षाच ठेवू नयेत असं सांगणारं प्रेम आदर्श की प्रेमात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पार चन्द्र , सूर्य ,  तारे आणून देणारं प्रेम आदर्श!! 

म्हणजे आता बघा, दस्तुरखुद्द माळव्याचा सुलतान, शिकारीला जाताना एक मंजुळ आवाज ऐकतो काय, त्या आवाजाचा शोध घेताना त्याला त्या गाणाऱ्या तरुणीचं सौंदर्य भुरळ काय पाडतं आणि तो तिला विचारतो, मी असं काय करावं ज्याने तू माझी होशील, माझ्यासोबत माझ्या महालात येशील. 

साक्षात सुलतानाने असं विचारल्यावर कुणीही लगेच हो म्हणेल पण ती तरुणी म्हणते, "तुझं प्रेम असेल माझ्यावर पण माझं प्रेम आहे नर्मदेवर आणि रोज नर्मदेला बघून माझी सकाळ होते आणि तिच्या दर्शनाने संध्याकाळ. नर्मदा वाहते का तुझ्या मांडू मधून? बस्स तेवढं जर झालं तर मी लगेच येईन मांडू ला. "

याला म्हणायचा स्त्री हट्ट . प्रेमात हट्ट करावा तर असा. नाहीतर आमच्या बायकोने सांगितलेलं , "वाटतंय ना लग्न करावं मग स्विच कर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोध". अर्थात हे करतानाही माझ्या नाकी नऊ आलेले पण ते एक असो. 

तर रुपमतीने अट घातली सुलतान बाझ बहादूरला आणि तो कामाला लागला. तिच्यासाठी स्वतःच्या महालासमोरच्या टेकडीवर भला मोठा महाल बांधला. त्या महालाच्या मनोऱ्यामधून तरी नर्मदेचं दर्शन तिला होईल म्हणून. पण मांडू पासून जवळ जवळ 50 किलोमीटर दुरून वाहणाऱ्या नर्मदेला वळवायचं तरी कसं ?? त्याने नर्मदामय्येपुढे हात जोडले. तिला म्हणाला, "प्रेमाबद्दल मी तुला काय सांगू. पण ह्या रुपमतीच्या प्रेमात मी आकंठ बुडालोय आणि ती आहे तुझ्या प्रेमात. तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस सरत नाही आणि तुला पाहिल्याशिवाय तिचा दिवस सार्थ होत नाही. तू एकवेळ माझ्यासाठी येऊ नकोस पण रुपमतीसाठी ये." 

नर्मदेचं ह्रदय द्रवलं. ती म्हणाली, "मी येते. तुझ्या महालापासून थोडी दूर एक टेकडी आहे तिथं एक गोरख चिंचेचं (baobab tree) झाड आहे तिथं खणलास की जे लागेल तीच मी. रेवा. "

आणि मग बाझ बहादूर ने त्या झाडाखाली रेवा कुंड बांधलं. आणि त्या कुंडा समोरच्या टेकडीवर बांधला एक मोठ्ठासा महाल. तोच रुपमती महाल. 

त्या रुपमती महालाच्या खालच्या अंगाला सुलतान बाझ बहादूर चा महाल आहे. आधी त्याचा महाल बघायचा, मग रुपमती महाल आणि मग रेवा कुंड. 

असं म्हणतात , रुपमती रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या महालाच्या सगळ्यात वरच्या चौथऱ्यावर जाऊन उभी राहायची. तिथून तिला नर्मदा दिसायची आणि त्याच वेळी बाझ बहादूर आपल्या महालाच्या चौथऱ्यावर उभा राहून नर्मदेकडे एकटक पाहणाऱ्या रुपमतीकडे मोहित होऊन पाहायचा. न चुकता रोज. 


रुपमतीच्या महालात आता तसं काही नाही. जिथं उभं राहून रुपमती डोळ्यांत प्राण आणून नर्मदा दिसतेय का म्हणून बघायची तिथं जाण्याच्या जिन्याला सरकारने कुलूप  घातलंय. कधी कधी वाटतं आपण तिथे गेलो तरी आपल्याला थोडीच दिसणारे नर्मदा तिथून . त्यासाठी प्रेम हवं, नजरेत, मनात आणि आस असावी नर्मदेला पाहण्याची जशी रुपमती ला असायची रोज, उन्हा पावसात,थंडी वाऱ्यात न चुकता. कुलूप तोडून वर पोहोचलो तरी ना आपल्याला नर्मदा दिसणार ना आपल्याला पाहण्यासाठी कुणी बाझ बहादूर दूर खाली डोळ्यांत जीव आणून आपल्या येण्याची वाट पाहणार. 

पण खैर म्हणून प्रेम करूच नये असं काही नाही. प्रेम करावं , निभवावं आपल्या आपल्या पद्धतीने. जसं पुढे जाऊन रुपमतीने निभावलं. अकबराच्या सरदाराने बाझ बहादूर ला मारलं आणि रुपमतीचं चारित्र्य भ्रष्ट होतंय की काय अशी परिस्थिती आली तेव्हा त्या पवित्र नर्मदेच्या रेवा कुंडात रुपमती ने जल समाधी घेतली. प्रेमात केलेला जौहार... नर्मदेच्या पाण्याने पवित्र झालेलं हे कुंड रुपमतीच्या प्रेमतल्या बलिदानाने अजून झळाळून निघालं. प्रेमाची महती ही अशी. आजही नर्मदेची परिक्रमा या रेवा कुंडाचं दर्शन घेतल्या शिवाय आणि रुपमती आणि बाझ बहादूर च्या प्रेमाची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. 


मला मांडू मध्ये सरलेली आमची रात्र आठवते. डोंगराच्या टोकावरचं हॉटेल, बारीकशी थंडी आणि सोबतीला निवांतपणा. आदल्या रात्रीच पौर्णिमा झाली होती. समोरच्या दरीतल्या झाडांच्या शेंड्यावर चांदण प्रकाश पडलेला, हलकासा वारा वाहत होता, जगजीत ची गझल लागलेली, "कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा", 

गझल उलगडत होती आणि मित्र सांगत होता त्याच्या प्रेमाची गोष्ट. 

एकच स्वप्न दोघांनी एकत्र पाहणं, मग कित्येक वर्षं, किती उतार चढाव, खाच खळगे, केवढी जवळीक केवढा दुरावा, आणि मग शेवटी ते स्वप्नं सत्यात येणं. खरंच प्रेमात पडणं प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही..


मित्राची गोष्ट ऐकता ऐकता पुन्हा रुपमती आठवली. 

असं म्हणतात अजूनही रुपमती दर पौर्णिमेला तिच्या महालात येते, जिन्याला घातलेल्या कुलुपाचं तिला बंधन नाही. ती वर चढते, तिच्या आवडीच्या जागी उभं राहून डोळे भरून नर्मदेला पाहते , डोळ्यांच्या एक कोनातून तिला दिसतं की बाझ बहादूर पण आपल्याकडे बघतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची खात्री झाली की दोघेही निघून जातात पुन्हा पुढच्या पौर्णिमेला परत येण्यासाठी....


एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जीवांच्या गोष्टी अशाच असतात. म्हटलं तर खऱ्या म्हटलं तर दंतकथा.  त्या ऐकायच्या असतात, ऐकवायच्या असतात, त्यांची गाणी करून गायची असतात आणि प्रेमाच्या गोष्टी चिरंतन टिकवायच्या असतात. 


म्हणून तुम्ही सुद्धा न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांगा.


- अभिषेक राऊत




Saturday, January 6, 2024

नर्मदापुरम (होशंगाबाद) - २५ डिसेंबर २०२३.

सकाळी उठून घाटावर जावं, नर्मदेचं पात्र पाहावं. शांत व्हावं. 

भल्याथोरल्या घाटाच्या  पायऱ्यांवर उभं राहून नर्मदेला पाहावं

घाट स्वच्छ नसतोच. 

नर्मदेचं पात्र, नजर ठरत नाही. डुबकी मारायची इच्छा होतेच. आपण थोडीच पापं धुवायला आलेलो असतो? आपण आलेलो असतो नर्मदेच्या गोष्टी ऐकायला. 

आपल्याच विचारात चालत जावं , घाटावरच्या नर्मदेच्या मंदिरात. नर्मदासूक्त लिहिलेलं असतं तिथे. प्रयत्नपूर्वक वाचावं ते. "त्वदीय पाद पंकज , नममि देवी नर्मदे"

पुजाऱ्याच्या पुढ्यातल्या ताटात पैसे टाकले की पुजारी बोलता होतो. 

तो सांगतो, नर्मदा मैया पवित्र. साक्षात भगवान शंकराच्या घामापासून तयार झालेली. ,"बात ये है की पाप धोने के लिये गंगा जी में डुबकी लगानी पडती हैं , लेकीन नर्मदा जी के तो दर्शन ही काफी हैं"

आपण आपला पाप पुण्याचा हिशोब मांडायला लागतो आणि वाटतं, इतरांचं नुसत्या दर्शनाने काम होईल पण आपल्याला मात्र पाप धुण्यासाठी इथेही डुबकीच मारायला लागेल. 

मग घाटाच्या पायऱ्या उतरताना मग एक बाबा दिसतो. त्याच्या बाजूला बसून नुसतं "नर्मदे हर" म्हणायचं अवकाश की गप्पाच सुरू होतात.

तो सांगतो, ही इतकी शांत, निवांत नर्मदा इथली होशंगाबाद (आता नर्मदापुरम) ची. खरी नर्मदा अवखळ,  एखादी टीनऐजर मुलगी जशी असते ना , उत्साहाने खळखळणारी, अल्लड, अवखळ अगदी एखाद्या प्रेमकथेत शोभेल अशी.  अमरकंटक च्या पहाडांमधली. नुसती खळखळणारी , आपला मार्ग शोधणारी आणि उपजतच आवेगाने वाहणारी, सतत प्रवाही. म्हणून तिला म्हणायचं रेवा. आणि मग तिचा जीव जडतो सोनभद्र वर. लोक म्हणतात अल्लड वयात झालेलं प्रेम थिल्लर असतं पण आमच्या नर्मदेचं, लाडक्या रेवाचं तसं नाही. तिचं प्रेम अगदी खरं. म्हणून तर सोनभद्र मिलन नावाचं ठिकाण आहे अमरकंटक जवळ. तर ही रेवाची गोष्ट. रेवाच्या सोनभद्र वरच्या प्रेमाची. पण हे प्रेम स्वीकारता आलं नाही सोनभद्र ला. रेवाशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या पण सोनभद्रचा जीव जडलेला जोहीला वर (ही सुद्धा एक नदीच बरं का). आणि मग एक दिवस रेवाला कळलं ना हे सगळंच. ती तशीच वळली, मागे फिरली वेगाने धावू लागली, दूर दूर उलट्या दिशेने, सोनभद्र पासून दूर, अमरकंटक पासून दूर, भेडाघाटातून मार्ग काढत , मागे वळून पाहिलंच नाही तिने. वाहत वाहत तिची नदी झाली, ती नर्मदा झाली. आज तिच्या आजूबाजूच्या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पण आमची रेवा, प्रेमात खाल्लेल्या धोक्याने जी मागे वळली, मार्गच बदलला तिने.  ती थेट अरबी समुद्रालाच जाऊन मिळाली. ती एकटीच अशी. 

ही अशी नर्मदेची गोष्ट. ती गोष्ट ऐकून मग नर्मदा अजून जवळची वाटायला लागते. बाबा तर निघून जातो आपल्याला घाटावर एकटं सोडून. 

आयुष्यात धोके, धक्के आपण खाल्लेलेच असतात की सगळ्यांनी. असं वाटतं रेवाच्या पाण्यात आता खरंच उतरावं. पाप धुवायला म्हणून नाही तर तिला सांगावं,  मला तुझी गोष्ट कळते, समजते आणि म्हणून तू मला जवळची वाटतेस. 

अशा या घाटावरच्या गोष्टी.. नदी, तिच्या गोष्टी, तिच्या गप्पा आणि तिच्याभोवती नकळत विणली जाणारी संस्कृती. 

आता जायलाच हवं पाण्यात असं म्हणत निग्रहाने पाण्यात पाय ठेवला की लक्षात येतं प्रचंड थंड आहे पाणी. तरीही दोन डुबक्या घेतोच. मग प्रचंड भूक लागते. पुढे चालत आलात की एका ठिकाणी रस्त्याच्या चौकात गर्दी असते तिथे नक्की कचोरी आणि समोसा मिळतो.

कचोरी खावी छोले आणि चटणी मिक्स करून

चवीचा कल्लोळ होतो जिभेवर

समोसा खावा. अजून विचारावं ," भैयाजी और क्या खिलाओगे"

तो म्हणतो ," हाव गुलाबजाम में रबडी मिला के खावो"

मग ते घ्यावं, पहिल्याच घासात तृप्त व्हावं.

दिवसाची सुरुवात छान आहे. नर्मदापुरम छान आहे. 

असं वाटतं नदीकिनारीच राहावं, नदीच्या गोष्टी ऐकत राहाव्यात . पण मग लक्षात येतं अरे पुढचा प्रवास करायचाय. आता निघायला हवं. नर्मदेचं पाणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवत पुढचा प्रवास सुरु होतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.


- अभिषेक राऊत

Saturday, September 30, 2023

तुम्ही जंटलमन क्लबात जाऊन आलात का


तर तसे माझ्या लंडन च्या ट्रिप ला आता 4 वर्ष झाली. एक आठवड्याची ऑफिस ट्रिप म्हणजे काही फार मोठी ट्रिप नाही खरंतर पण तरीही त्यातल्या काही गोष्टी , आठवणी अधूनमधून उफाळून वर येतात आणि चेहऱ्यावर तजेला आणतात अगदी "इंग्लिश मॉर्निंग टी" सारख्या. 

आजही ठळकपणे आठवतं ते म्हणजे प्रिन्सेस डायनाच्या स्मरणार्थ बांधलेल्या कारंज्याची सफर आणि तो जगप्रसिद्ध प्रिन्सेस डायना मेमोरियल वॉक. त्यावर कोरलेली गुलाबफुलं आणि कानात रुंजी घालणारे एल्टन जॉनच्या गुडबाय इंग्लंडस रोज चे शब्द. 

तसाच एक चेहऱ्यावर अचानक तजेला आणणारा अनुभव म्हणजे स्ट्रीपर क्लब चा . तारुण्य सुलभ कुतूहलाने "टॉप 10 स्ट्रीपर क्लब इन सेंट्रल लंडन" असं आधीच सर्च करून ठेवलं होतं. एकूणच ट्रिप ला जाण्यापूर्वीची धावपळ यात कुठेतरी ते मागे पडलं पण लक्षात होतंच. २-३ दिवसात स्थिरस्थावर झाल्यानंतर आणि वीकेंडला रूढार्थाने जी पर्यटनस्थळं बघावी असं सांगतात ती बघून झाल्यावर मात्र या ऑफ बिट डेस्टिनेशन चे वेध लागले. आत्ता या क्षणाला 

आपली खर्च करण्याची कुवत, कम्पनीने रोजच्या खर्चाला दिलेले पौंड आणि त्याची रुपायातली किंमत असा सगळा हिशोब लावून झाला आणि आपोआपच "टॉप 10 स्ट्रीपर क्लब" हे मागे पडलं आणि "नियरेस्ट अँड चीप स्ट्रीपर क्लब" असा सर्च करून , एक ठिकाण हेरून ठेवलं. 

दुसऱ्या दिवशी ऑफिस वगैरे आटोपल्यानंतर ट्यूब पकडली आणि इच्छित स्टेशन ला उतरून स्ट्रीपर क्लब चा रस्ता पकडला. तुम्हाला सांगतो , गुगल मॅप हा किती क्रांतिकारी शोध आहे याची जाणीव मला त्या क्षणाला झाली. अन्यथा एक भारतीय माणूस, लंडन च्या रस्त्यांवर ते इथलं जवळचं "जंटलमन क्लब" कुठे ओ असं किती जणांना विचारत फिरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. 

बरं , विषय असा की इंग्रजाला सभ्यतेचा इतका लळा की स्ट्रीपर क्लब ला तिथलं जनमानस जंटलमन क्लब वगैरे म्हणतंय. म्हणजे अमच्याकडचे नगरसेवक किंवा आमदार कसे सांस्कृतिक महोत्सव किंवा लोक कलेचा जागर या नावाने गौतमी पाटीलच्या नाचाचा कार्यक्रम ठेवतात अगदी तसंच. 

आत्ता या क्षणाला ते ट्यूब स्टेशन कुठलं, त्या स्ट्रीपर क्लब चं नाव काय अशा छोट्या छोट्या गोष्टी अजिबात आठवत नाहीत बघा. मॅप वर दाखवलेल्या रस्त्याने सरळ चालत गेलो आणि अगदी सहज फूटपाथ ला लागून असलेल्या एका दारापाशी आलो. बाऊन्सर बाहेर होताच. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्लबत जा, बाऊन्सर सगळीकडे सारखेच दिसतात आणि सारखेच काळे कपडे घालतात. त्याने एक नजरेत मला जोखलं आणि एवढंच म्हणला, "फर्स्ट टाइम"? "डु यु हाव कॅश" ? मी फक्त मानेने होकार दिला. तसा तो म्हणाला, "बी गुड" आणि दरवाजा उघडून मी आत शिरलो. 

एखाद्या स्टॅंडर्ड पब सारखा सेट अप, फक्त डान्स फ्लोर च्या ऐवजी साधारणपणे सगळ्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित दिसेल आशा ठिकाणी लावलेलं स्टेज आणि त्याला लावलेला एक पोल आणि त्याच पोल वर डान्स करणाऱ्या तरुणी. आजूबाजूला दोन चार मखमली सोफे. ते खास लॅप डान्स घेण्यासाठी / देण्यासाठी, प्रशस्त बार काउंटर आणि  दोन चार टेबल एखाद दोन जण बसतील इतके (शक्यतो आंबट शौकीन म्हाताऱ्यांसाठी कदाचित) असा सगळा तो माहोल. 

बार काउंटर च्या बाजूलाच मोक्याची जागा हेरून मी उभा राहिलो, एक पाइंट बियर मागवली उभ्या उभ्याच एक चौफेर नजर टाकली. तिथल्या तरुणी, तिथे मजा करायला आलेले तरुण, तिथलं संगीत , नुकतेच डोळे शेकायला आलेले म्हातारे या सगळ्यांपेक्षा माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या ,"ग्राहकांना सूचना" या मथळ्याखाली लिहिलेल्या किमान 10 सूचनांनी. अगदी "Do's and Dont's". 

त्यांना सूचना म्हणण्यापेक्षा नियम म्हटलेलं अधिक योग्य ठरेल. उगाच स्ट्रीपर क्लबात आलात म्हणून संयम विसरू नका असा सज्जड दम सोज्ज्वळ शब्दांत देण्याचं काम त्या सूचना करत होत्या.

मी अगदी काळजीपूर्वक सगळ्या सूचना वाचल्या.  "लॅप डान्स " घेताना तरुणींच्या अंगाला न विचारता स्पर्श करू नका, आशा सूचना घोकून घेतल्या आणि बियर चा एक घोट पोटात जातो न जातो तोच माझ्यासमोर एक ललना सुहास्य वदनाने समोर उभी राहिली. 

तिच्या हातात एक नक्षीदार भांडं होतं आणि माझ्यामते ती त्याच्यात तिचं इनाम गोळा करत होती.  मी फार विचार न करता एक पौंडचं नाणं तिच्या भांड्यात घातलं. ( वर म्हटल्याप्रमाणे खूप सारे हिशेब करून मी खास 10 पाउंडाचे सुट्टे करून आणले होते) ती हसली आणि पूढे गेली. पुढचा परफॉर्मन्स तिचाच होता. 

माझ्या पुढे उभ्या असलेल्या इंग्लिश तरुणांच्या घोळक्याने एकत्रीतच काही नोटा तिच्या हातात ठेवल्या. पुढच्या काही क्षणात ती पोल जवळ पोहोचली आणि मग सुरू झालं नृत्य आणि नृत्यासह स्ट्रीपिंग. 

गाण्याच्या ठेक्यावर अदाकारी आणि अंगावरून उतरत जाणाऱ्या प्रत्येक कपड्यासोबत वाढत जाणारा ठेका. 

वाढणाऱ्या प्रत्येक ठेक्यासोबत त्या तरुणीकडे वळणाऱ्या नजराही वाढायच्या. मी तर टक लावून बघत होतोच म्हणा (आ वासून असं म्हणणं जास्त योग्य ठरेल पण अर्थातच आ मनात वासलेला) . 

बाजूचे इंग्लिश तरुणही वाढत्या संगीताच्या ठेक्यासोबत (उतरणाऱ्या एकेक  कपड्या सोबत असं वाचा) तरुणीकडे बघू लागले. बाजूच्या दोन सोफ्यावर बसून लॅप डान्स घेणारे दोन शौकीन पण मांडीवर बसलेल्या लालनांचा मोह चुकवून हळूच एखादी नजर पोल डान्स करणाऱ्या तरुणीकडे टाकू लागले (इथं मी ह्याच्या मांडीवर बसलेय आणि हा त्या नाचऱ्या नटवी कडे बघतोय असा विचार करून लॅप डान्स देणारी तरुणी अधिकच मादकतेने तिचं काम करू लागली). संगीत टिपेला पोचलं, पोल डान्स करणाऱ्या तरुणीच्या अंगावर कपड्याचा एकही अंश उरला नाही आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा त्या नर्तिकेकडे लागल्या. अगदी मगाचपासून कोपऱ्यात खुर्चीवर बसून "डेली मेल" (डेली मेल म्हणजे इंग्लंडचा संध्यानंद असं म्हणायला हरकत नाही) वाचणाऱ्या म्हाताऱ्यानेही त्यातून डोकं वर काढलं आणि डोळ्यावरचा चष्मा सावरत , नेमक्या योग्य वेळी तरुणीकडे कटाक्ष टाकला. मादकतेचं अत्युच्च टोक गाठून ती तरुणी बाजूला झाली आणि तिची जागा घेण्यासाठी दुसरी तरुणी सज्ज झाली. तिथला माहौल, मादक ललना , त्यांचं नेत्रदीपक नृत्य यांचा मनापासून आनंद घेत आणि अजून दोन चार पाइंट रिचवून मी तिथून बाहेर पडलो. तसं तर मुंबईतही मी डान्स बार अनुभवलेत. पण अर्थातच दोन्हींची तुलना करून इथल्या  बार बालांचं आयुष्य कसं खडतर वगैरे टेप मी लावणार नाही.

चूक काय बरोबर काय, नैतिक काय अनैतिक काय ह्या गोष्टींचा किस काढायला मला आवडत नाही. 

पण एक नक्कीच सांगेन की लंडनला गेलात तर स्ट्रीप क्लब ला नक्की जा. 

~ अभिषेक राऊत


Sunday, January 17, 2021

तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला -विंदा करंदीकर - रसग्रहण

 मुळात ही कल्पनाच ग्रेट आहे. ते म्हणतात ना जे न देखे रवी ते देखे कवी. त्यात जर तो कवी म्हणजे विंदा करंदीकर असतील तर सांगायलाच नको.

तर ही कविता म्हणजे दोन महान सृजनशील माणसांमधला संवाद आहे. एकाच वेळेला दोघांचं एकमेकांच्या निर्मितीबद्दल असणारं कुतूहल आणि त्या कुतुहलातून येणारा छानसा संवाद म्हणजे ही कविता. 

बरं हा संवाद होतो कुठे तर तुकारामांच्या दुकानात. शेक्सपियर अगदी सहज म्हणून जातो , मी भलेही मानवी भावभावनांचा संसार मांडला असेल पण बा तुकारामा, जे शब्दातीत तू शब्दांत मांडलेस त्याची तोड नाही . 

शेवटच्या काही कडव्यांमध्ये तुकाराम म्हणतात , ही सगळी शब्दपीट व्यर्थच. शेवटी जाऊन भगवंताला मिळणं हेच खरं सत्य. आणि मग क्षणार्धात त्यांना आठवण येते आवडेची. संसाराची. संसारात राहून विठ्ठलाची प्रीती करणं कठीणच.


तर अशी ही शेक्सपिअर आणि तुकारामांच्या भेटीची कहाणी, विंदानी ती फार सुरेख रंगावलीये

Sunday, January 10, 2021

पितात सारे गोड हिवाळा - रसग्रहण

 पितात सारे गोड हिवाळा - बा. सी. मर्ढेकर 

बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर हे मराठीतले एक नामवंत कवी. मर्ढेकरांचा जन्म १९०९ चा तर १९५६ ला त्यांचं निधन झालं. उण्यापुऱ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठी कवितेला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. मर्ढेकरांच्या कवितेची ठळक लक्षणं सांगायची झाली तर, नावीन्यपूर्ण प्रतिमांचा वापर , रचनेमधील नवता आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर शहरी जीवनाच्या जाणिवांचे चित्रण. हे करताना त्यांनी प्रस्थापित मराठी कवितेचा ढाचा बदलला आणि स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. 

आजची त्यांची कविता , पितात सारे गोड हिवाळा ही मुंबईतल्या हिवाळ्याच्या दिवसाची कविता. पहाट आणि सकाळ ह्यांच्या सिमरेषेवरची ही कविता आणि त्यासोबत आजूवाजुला घडणारे बदल मर्ढेकरांनि टिपलेत. 

वर सांगितलेली त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये या कवितेत प्रकर्षाने जाणवतात. 

पहाटेच्या मुंबईला न्हायलेल्या गर्भवतीच्या सौंदर्याची उपमा देणे असो किंवा मग झोपेतून जाग येण्याला , "डोकी अलगद घरे उचलती , काळोखाच्या उशिवरूनी" असं म्हणणं असो. प्रतिमांमधला नावीन्यपूर्णपणा दिसतो तो असा . 

मर्ढेकरांच्या आधीची मराठी कविता छंदोबद्ध, गेय अशी होती . मर्ढेकरांच्या कवितेतील रचनेचं वेगळेपण या कवितेत दिसतं ते पहिल्या कडव्यातच. 

तर अशी ही कविता पहाटेच्या मुंबई शहराचं वर्णन करणारी आणि मग शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो ,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा

अजस्त्र धांदल क्षणात देई , जिवंततेचे अर्घ्य भास्करा. 

साधारण १९४०-४५ च्या दरम्यान टिपलेली मुंबईच्या पोटातली ही धांदल , मुंबईचं हे स्पिरिट , मुंबईची धावपळ आजही तशीच आहे. मर्ढेकर आज नाहीत, १९४०-५० ची मुंबई आज नाही पण मुंबईची धांदल मात्र आजही आहे आणि उद्याही राहील आणि उगवत्या सूर्याला जिवंततेचे अर्घ्य देत राहील.


- अभिषेक राऊत