Sunday, February 10, 2019

मलानाच्या गोष्टी - भाग १



त्याच्या खांद्याला भलीमोठी ट्रेकर्सची सॅक होती. ती त्याने गाडीच्या डिकीत ठेवली. ATM मधून पैसे काढले. समोरच्या दुकानातून चार चॉकोलेट चिप कूकीस विथ एक्सट्रा चॉकोलेट सॉस उचलल्या आणि गाडीत पुढच्या सीट वर येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो स्थिरावला. कूकीजचा डब्बा त्याने डॅशबोर्डवर ठेवला. लेदर जॅकेटच्या डाव्या खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. त्यात रोलिंग पेपर होते. हलक्या हाताने त्यातला एक त्याने वेगळा केला. त्याच पाकिटाचा एक जाडसर तुकडा घेऊन त्याचा रोच तयार केलासिगरेटच्या पाकिटातली एक अर्धी सिगरेट होती त्यातला तंबाखू त्या रोलिंग पेपर वर पसरवलाउजव्या खिशातून नुकताच घेतलेला स्टफ काढला. अस्सल खवय्याने मसालेदार मटणाचा गंध घेऊन नुसतीच मान हलवून पसंतीची पावती द्यावी तसं काहीसं त्याने केलं. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्यातला थोडा स्टफ काढून , मळून त्याने तो रोलिंग पेपरवर घातला. एखाद्या हलवायाने जितक्या सराईतपणे बुंदीचे लाडू वळावे तितक्याच सहजपणे त्याने रोलिंग पेपर रोच भोवती गुंडाळला आणि रोल तयार केला. लाईटरने रोल पेटवत पहिला कश घेतला आणि तो उद्गारला , "ओह मलाना स्टफ मॅन". दुसरा कश हवेत सोडता सोडता, टिपिकल मल्याळी अक्सेंट मध्ये  मागे वळून म्हणाला, "हेय  ब्रो , यु वॉन्ट पफ ?".  अर्थातच बायकोसमोर मी स्टफ मारणार नव्हतोच. त्यामुळे चेहऱ्यावर शक्य तितके "मी नाही मारत ब्वा " असे भाव ठेवून मी नाही म्हणालो. एव्हाना आमची गाडी कसोलच्या चुंगुल मधून बाहेर पडत खडबडीत आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून मलानाच्या दिशेने निघालेली होती.
तर मलाना!!!! बरंच काही ऐकलेलं या गावाबद्दल. माणूस जनरली सिमला , कुल्लू , मनाली करतो हनिमूनला. आम्ही सिमला , कुल्लू गाळलं आणि कसोलला पोहोचलो. तरीसुद्धा मलानाला जाऊ असं वाटलं नव्हतं. जमदग्निंच्याच मनात असणार पण बहुदा. नाहीतर रात्री रौंराव वाहणारी नदी सकाळी कशी दिसते हे बघायला नदीकाठाशी उतरावं काय , मग त्याच काठाने एका बाजूला टुमदार घरं आणि दुसऱ्या बाजूने उंच पाइनची झाडं बघत चालावं काय, चालता चालता आणि नदीच्या अंगावर बांधलेल्या झुलत्या लाकडी पुलांवरून कधी या काठावर तर कधी त्या काठावर करता करता दोनेक किलोमीटर दूर यावं काय , मग हमरस्त्याशी पोहोचल्यावर हात दाखवताच एका अल्टोवाल्याने  थांबावं काय , तो मलानाला चाललाय ऐकल्यावर आम्ही दोघांनी चलो फिर हमें भी ले चलो म्हणत क्षणार्धात हॉटेल ऐवजी मलानाचा रस्ता पकडावा काय. माझ्या डोळ्यांसमोरून मागचा अर्धा तास तरळला. "वैसे शादीशुदा लोग ज्यादा नहीं आते यहांपे." ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो. "ओह यु गाईझ  आर  मॅरीड ? ग्रेटसमोरच्या सीट वरचा अचानक आयुष्याच्या सत्याची जाणीव झाल्यासारखा म्हणाला. एव्हाना त्याचा जॉईंट संपला होता. त्याने कूकीज काढल्या आणि मला एक ऑफर केली. मी नाही म्हणणार नव्हतोच. बाहेर नजर टाकली आणि मलाना जलविद्युत प्रकल्पा अंतर्गत चाललेलं काम दिसलं. विकासाच्या खाणाखुणा मागे टाकत आम्ही पुढे निघालो. डोंगर पोखरून काढलेले वळणावळणाचे खडबडीत रस्ते, त्या वळणांना "कॉम्प्लेक्स" देत तितक्याच वळणावळणाच्या पात्रातून खळाळत वाहणारी पार्वती नदी यांच्या संगतीनं आम्ही चाललो होतो.
सोबत ड्रायव्हरची कॉमेंट्री  होतीच. ड्रायवर तिथलाच कसोल जवळच्या गावातला. मलाना बद्दल , तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या स्टफबद्दल तो सांगत होता. त्याला ते नेहमीचंच असावं. "अब देखो ये जो लोग  हैं अपने आप को पवित्र मानते हैं. देखा जाये तो हम भी ब्राह्मण हैं लेकिन ये खुदको हमसे भी उंचा मानते हैं."

मला आमच्याकडचे चित्पावन आठवले. हे मलानावासी म्हणजे तर थेट चित्पावनांच्या आजोबांचेच वंशज म्हणा. आमचा ड्रायव्हर तसा शिकलेला. आई वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. कुल्लू मधल्या एकमात्र मोठ्या डिग्री कॉलेजातून इंग्लिशमध्ये BA केलेला. पण नोकरी नाही म्हणून कॅब चालवायला घेतली. कसोल , कुल्लू, मलाना , पार्वती वॅली सगळीकडे टूरिस्ट्सना फिरवायचं आणि फिरवत फिरवता गप्पा मारत मन मोकळं करायचं. अर्थातच कॅब चालवण्यातून पैसे बऱ्यापैकी मिळतोच पण हिमाचलच्या त्या निसरड्या , वळणदार रस्त्यांवरून गाडी चालवायची म्हणजे रिस्कच. त्याला ते हि सवयीचंच झालेलं. त्यामुळे आम्ही पार वाकून वाकून निसर्गाची उधळण पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र , "बचपनसे येही देख राहा हूं" असेच भाव असायचे.   साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका कमानीपाशी पोहोचलो. त्यावर लिहिलं होतं , "मलाणा गांव के लिये रस्ता".  आम्ही खाली उतरलो. समोरच्या सीट वर बसलेल्या मल्याळी मित्राची अवस्था , "आजि म्या स्वर्ग पहिला" अशी झाली होती. दोन दिवस मलाना मध्ये राहायचा प्लॅन होता त्याचा. आम्ही मात्र गावात चक्कर टाकून परत येणार होतो. आमच्या मित्राने पूजे आधी अगरबत्ती लावावी तसं एक रोल तयार केला आणि पहिला पफ मारून पुढे निघाला. मी नजर टाकली. एका छोट्याश्या टेकडीवर दोन तीन घरं होती. खास हिमाचलच्या "काथ कुनी " पद्धतीने बांधलेली. फक्त दगड आणि लाकूड यांचा वापर करून. बाकीचा गाव त्या टेकडीच्या कुशीत लपलेला होता. आम्ही कमानीसमोर उभे होतो आणि छोटीशी पायवाट आम्हाला बोलवत होती. मलानाकडे. इथली माणसं , इथली संस्कृती, इथलं जगणं याबद्दल ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं आणि तेच अनुभवायला मलाना आम्हाला बोलवत होतं. पायवाटेवरून आम्ही निघालो तेव्हा दुपारचा एक वाजला होता.

Saturday, February 24, 2018

अंगारमाळ्याच्या गोष्टी

रणरणत्या उन्हात या शेतातले मोठमोठे दगड-धोंडे उचलून दूर करत असताना शरद जोशींना कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या , " एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" आणि मग या जागेचं नाव ठेवलं गेलं , "अंगारमळा".
अंगारमाळ्याच्या आवारातल्या बोराच्या झाडाखाली बसून विनय हर्डीकर जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
चाकण जवळच्या आंबेठाण गावात शरद जोशींनी अक्षरशः शून्यातून उभा केलेला हा पसारा. आज त्या वास्तूत ते नाहीत पण त्यांचं व्यक्तिमत्व समजेल अशा पुष्कळ गोष्टी आहेत. सोबत हर्डीकर सर असतात. ते काही आठवणी सांगतात. सध्या त्या पसार्याची काळजी घेणारे सुरेशचंद्र म्हात्रे सर असतात.
आत शिरल्या शिरल्या दिसतात गांधीजी आणि शिवाजी महाराजांचे भव्य पोर्ट्रेट. आजपर्यंत महाराजांच्या  शेजारी शाहू,फुले , आंबेडकर पाहिलेले असतात आणि गांधीजींना शक्यतो एकटं . पण आत शिरल्या शिरल्या या दोघांचे पोर्ट्रेट पाहून प्रतीकांची निवड करण्यातला हा वेगळेपणा झटकन दिसून येतो. मी विचार करतो , असा नक्की काय विचार असेल या दोघांना एकत्र समोर 'प्रोजेक्ट'करण्यात. मला  जाणवत  जातं , बघायला गेलं तर हे दोनच असे नेते ज्यांनी सामान्यांमधल्या शक्तीला जाणलं आणि बघताबघता अक्खा मावळ राजांच्या बाजूने तर गावखेड्यातला हरेक माणूस गांधीबाबाच्या मागे उभा राहिला. एका मोठ्या जनसमुदायाला 'अपील' होणारे हे दोन नेते. प्रतीकांची हि  कल्पकतेने केलेली निवड तिथल्या पोस्टर्समध्येही दिसत राहते. आंदोलनांसाठी तयार केलेले पोस्टर, त्यातली भाषा, यातलं वैविध्य, त्यातली प्रसंगोपात समयसूचकता जाणवत राहते. 'ऊसदर आंदोलन' असो, 'शरद पवारांना गावबंदी' असो किंवा मग चांदवडचा स्त्रीशक्तीचा जागर करणारा मेळावा असो. त्यासाठी बनवलेली पोस्टर्स एकाच वेळी परिणामकारक असतात आणि कल्पकही.
पुढे सरकतो तर एका मोठ्ठया भिंतीवर तितकाच मोठ्ठा
फलक असतो.त्यात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात बळी  गेलेल्या आंदोलकांची नावं असतात. मी वाचत जातो. वय वर्ष २० पासून ते ६५ पर्यंत. तरुण , म्हातारे, बाया बापड्या सगळेच असतात त्यात. जास्त करून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ , मराठवाडा या भागातले. संघटनेची यशस्वी झालेली मोठी आंदोलनं सुद्धा त्याच भागातली. पुणे जिल्ह्यात जन्म घेतलेल्या संघटनेला , पुणे जिल्ह्याने आपलंसं करताना मात्र हात आखाडताच घेतला. पुढे हर्डीकरांच्या बोलण्यातूनही हि खंत जाणवत राहते.
पोल्ट्रीसाठी बांधलेल्या इमारतीचं शरद जोशींनी मुख्यालय केलं . तिथून शेतकरी हिताची हाळी दिली. "कृषिप्रधान" देशात नुसता चवीपुरता ठेवलेला शेतकरी पाहता पाहता राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवला. "रास्त  हमीभाव" आणि "सरकारी हस्तक्षेप रहित शेती" या दोन काळाच्या पुढच्या धाडसी मागण्या  केल्या. हे सगळं कुठून आलं ? सगळं जग एकुणातच शेतकरी आणि कामगार हितासाठी समाजवादाची भाषा बोलत असताना हा मनुष्य मुक्त अर्थव्यवस्थेची मागणी करतो. याची उत्तरं मिळत जातात पुढच्या वास्तूत शिरलं कि. तिकडे रांगेने मांडून ठेवलेली असते , जोशींची ग्रंथसंपदा. त्यात अक्षरशः सगळं असतं . कार्ल मार्क्स असतो, अँगल्सचे तर ते भक्तच. गॉर्की असतो. पॉल क्रुगमन असतो, जॉर्ज सोरोस असतो, फ्रेडरिक हायेक असतो. अक्षरशः प्रचंड वैविध्य. जगभरातलं जे उत्तम आहे ते कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचायचं आणि मग सोप्प्या भाषेत ते शेतकऱ्यांसमोर मांडायचं . जे योग्य आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनं करायची आणि मागण्यांना अभ्यासाचं अधिष्ठान ठेवायचं . १९८२ पासून सातत्याने शरद जोशींनी हे केलं .
तिथेच भामा आसखेडच्या प्रकल्पाची कोनशिला आहे. म्हात्रे सर सांगतात, शेतकऱ्यांच्या जमिनीचे केवळ संपादन न करता त्यांना प्रकल्प भागधारक करून घेऊन त्यायोगे प्रकल्प विकास करण्याची ती पहिली महत्वाकांक्षी सुरुवात होती. सरकारी अनास्थेमुळे ती रेंगाळली. पण आज जेव्हा मी मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी सारखी उदाहरणं पाहतो, समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना प्रकल्प भागधारक करून घेण्यास अनुकूल असणारं सरकार पाहतो तेव्हा मला त्या कोनशिलेचं महत्व कळतं . जोशींच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं . मग आम्ही
गच्चीत जातो. त्यावरून समोर नजर टाकली कि भामचंद्राचा डोंगर दिसतो. तुकारामांना याच डोंगरावर साक्षात्कार झाला. अंगरमाळ्याच्या  वाटचालीला भामचंद्राचा डोंगर साक्षी असतो.
तिथून  थोडंसं चालत जात आम्ही जोशींच्या घरी जातो. आटोपशीर घर. जोशींचे काही फॅमिली फोटोस आणि थोडंसं सामान. त्याच्याच पुढे लागून दिल्लीतून उचलून आणलेलं ऑफिस. त्या ऑफिसमध्येही पुस्तकं , खुर्ची , बसायला सोफा आणि बाजूला संघटनेचा 'आयकॉन' बनलेला शेतकर्याचा मोठ्ठा कट आउट . हर्डीकर सर मग त्या फोटोमागची स्टोरी सांगतात. एका सामान्य शेतकर्याचा सहज काढलेला फोटो बघता बघता संपूर्ण संघटनेची, आंदोलनाची आणि असंख्य शेतकऱ्यांची ओळख बनून जातो. कल्पक आणि तितकंच प्रभावी.
निघायची वेळ झालेली असते. आजवर मुलाखतीतून ऐकलेल्या शरदरावांच्या विचारांमागची बैठक कुठून पक्की झाली हे कळलेलं असतं . नेता होण्याची आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शारीरिक अशी कुठलीही पूर्व पार्श्वभूमी नसलेला हा माणूस जवळपास पस्तीस वर्षं शेतकऱयांचं प्रेम मिळवत राहतो. अभ्यासपूर्ण आंदोलन करतो, चळवळीला दिशा देतो, संघटना बांधतो, स्थानिक नेतृत्व घडवतो आणि त्याहूनही महत्तवाचं म्हणजे शेतकऱयांचा मुद्दा बघता बघता राष्ट्रीय पटलावर सक्षमपणे घेऊन जातो. महिला प्रश्नांवर महिलांशी सहजपणे संवाद साधणारे जोशी तितक्याच सहजपणे देशातल्या मोजक्या एक्सिक्युटिव्स समोर 'मेटॅफिसिक्स ऑफ लीडरशिप " सारखा विषयही मांडतात .
"ग्यानबाच्या वृक्षाखाली " बसून विचार करताना जाणवतं , आताशा अंगरमाळ्यातला अंगार थंडावलाय कि काय . जोशींची भाषणं , त्यांचे लेख , पुस्तकं या सगळ्यांचं डॉकुमेंटेशन करायला चार पाच तरुणही मिळत नाहीत असं जेव्हा म्हात्रे सर म्हणतात तेव्हा वाईट वाटतं . बाकी काही नाही तरी "अभ्यासोनि अंदोलनावे " हि अंगरमाळ्याची खरी शिकवण आणि ती पुढच्या पिढीत झीरपावी हि खरी गरज आहे .
अभिषेक राऊत .

Wednesday, August 2, 2017

आनंदाची गुरुकिल्ली

"मला सांगा , सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य केलं कि ते , घरबसल्या मिळतं " ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समस्त मानवजात नक्कीच आभारी राहील. गंमत अशी आहे कि सुख,समाधान,आनंद ह्या काही बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. सहजासहजी मिळणाऱ्या तर बिलकुलच नाही. सुखाची गंमतही अशी कि एखाद्या चंद्रमौळी झोपडीतला माणूस सुद्धा सुखी असू शकतो पण त्याच वेळेस महालात झोपणारा धनिक सुखी असेलच असं नाही.
सुखाचा शोध हा अविरत चालणारा आहे .प्रत्येकजण आपापल्या परीने शोधत राहतो आनंदाचा , सुखाचा सदरा. रामदास स्वामी म्हणतात , "जगी सर्व सुखी असा कोणty आहे,विचारे मना तूंचि शोधूनि पाहे"
सिग्मान्ड फ्रॉइड म्हणतो , "कल्पनातीत अपेक्षेच्या पूर्ततेतून येणारा भाव म्हणजे सुख." गंमत बघा, सुखाचा शोध हा असा संतांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आपापल्या दृष्टिकोनातून घेत राहतो.
सामान्य माणसांची फार गंमत होऊन जाते बघा, एखादा सर्वसंगपरित्याग केलेला तत्त्ववेत्ता म्हणतो , "गरजा कमी कराल तर आपोआप सुखी व्हाल" त्याच वेळेस एखादा नावाजलेला उद्योगपती म्हणतो , "रिक्षात बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझ मध्ये बसून रडलेलं बरं ". आजच्या व्यवहारवादी जगात जिथे गरजा कमी करणं हे अशक्यप्राय होऊन बसलंय आणि जिथे पैसे फेकून सुख मिळवता येतं हा विचार रूढ आहे अशा जगात म्हणूनच शाश्वत सुखाचा,आनंदाचा मार्ग शोधणं गरजेचं आहे.
अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात डॉ.थॉमस गिलोवीच हे मानसशास्त्रद्न्य गेली २० वर्षं संशोधन करतायेत कि सुख,आनंद नक्की कशात  असतं ? पैसे खर्च करून एखादी नवीन वस्तू घेतली कि होणारा आनंद, त्या वास्तूच्या वापरातून मिळणारं सुख असं किती दिवस टिकून राहतं ? शाश्वत आनंदासाठी काय करावं ?
त्यांच्या या संशोधनातून आलेले निष्कर्ष फार महत्तवाचे आहेत. ते म्हणतात , "अनुभूतीतून आलेला आनंद हा भौतिक वस्तूंच्या मालकीतून आलेल्या आनंदापेक्षा शाश्वत असतो,
म्हणून तुमचे पैसे अशा गोष्टीवर खर्च करा ज्यातून तुम्हाला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी गोळा करता येतील."
ते पुढे म्हणतात कि भौतिक वस्तूंतून मिळणाऱ्या आनंदाचे काही तोटे आहेत जसे कि
१.नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तू दुसर्या दिवशी जुनी होते आणि तिच्याबरोबरच जुना होतो ती वस्तू घेताना मिळालेला आनंद,झालेलं समाधान. गंमत बघा , नव्याकोऱ्या आय - फोने ने ढीगभर सेल्फी काढले तरी होणारा आनंद जुन्या कपाटात सापडलेल्या रंगीत फोटोच्या तुलनेत कमीच असतो. कारण  तो असतो आठवणीतून आलेल्या  अनुभूतीचा आनंद.
२.वाढीव गरजा - ३० इंचाचा टीव्ही ५४ इंचापुढे छोटा वाटायला लागतो. काल घेतलेला मोबाईल नवीन मॉडेलपुढे निरुपयोगी वाटायला लागतो. भौतिक गरजांची हि ओढ मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाते आणि त्या गरजांच्या पूर्ततेतून होणारा आनंदही क्षणिकच ठरतो.
३."भला उसकी सारी मेरे सारी से अच्छी कैसे ?"- तुलना आणि त्यातून येणारी असूया हे मनुष्याचं व्यवच्छेदक लक्षण. आपण नव्या घेतलेल्या वस्तूचा  आनंद होण्यापेक्षा शेजार्यांकडे असलेल्या वस्तूचा जास्त हेवा वाटत असेल तर मग अशा आनंदाला,अशा सुखाला अर्थच काय.
म्हणून डॉ . गिलोवीच म्हणतात , भौतिकतेतून आलेल्या अनंदापेक्षा अनुभुतीतून आलेला आनंद दीर्घकाळ टिकतो आणि सदाबहार असतो .
अनुभूतींच्या आठवणी होतात आणि आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत दरवळत राहतात . अनुभवांची गंमत पहा ,
कळत नकळत ते तुमचाच एक भाग होऊन जातात .
४ गाडया , २ घरं याच्या पलिकडे तुमची ओळख असतात , तुम्ही घेतलेले आनंदानुभव . ते फक्त तुमचे असतात . ह्या आनंदानुभवांना असूयेची किनार नसते . ते निखळ असतात, त्यांच्या  आठवणी होतात म्हणून शाश्वत असतात.
याच विषयावर संशोधन करणाऱ्या ब्रिटिश कोलंबिया  विद्यापीठाच्या प्राध्यापिका एलिझाबेथ डून म्हणतात,  "वस्तू  कदाचित अनुभवांपेक्षा जास्त काळ टिकत असतील  मात्र अनुभवांच्या आठवणी होतात आणि मनाच्या कोपर्यात रेंगाळणाऱ्या आठवणी आयुष्यभर आनंद देतात." आनंदाच्या अशा आठवणी गोळा करणं मह्त्त्वाचं . सुखाचा , समाधानाचा मार्ग त्यातूनच जातो . कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या महागड्या वस्तूंनी सजलेल्या दिवाणखान्यापेक्षा अमूल्य अशा आनंदानुभवानी आणि आठवणींनी भरलेलं मन जास्त सुख देतं .
- अभिषेक राऊत.
(ट्रेव्हिस ब्रॅडबरी ने फोर्ब्स मासिकासाठी लिहिलेल्या "व्हाय यु शुड स्पेंड मनी ऑन एक्सपीरिअन्स , नॉट थिंग्स " या लेखाचा स्वैर अनुवाद.)

Tuesday, April 11, 2017

गाड्याची शर्यत - एक मुक्तचिंतन

"१२ सेकंद २५ मिली,फक्त १२ सेकंद २५ मिली. अत्यंत विक्रमी वेळेत याठिकाणी शर्यत पूर्ण केलेली आहे . ढेबेगावच्या  पाटलांच्या बैलजोडीनं ही  कमाल केलेली आहे याठिकाणी  आणि गाडामालकांचे हार्दिक अभिनंदन."

लाऊडस्पीकरवरचे हे शब्द आसमंतात घुमत जातात, गाड्याने
उडवलेला धुराळा खाली बसत जातो आणि मगाशी वाऱ्याच्या
वेगाने  धावणाऱ्या बैलजोडीला कासरा  धरून परत  आणलं जातं . गुलाल उधळून त्यांचं कौतुक करायचं असतं ना.

गावच्या जत्रेत मजा असते. मंदिरावरची  रोषणाई, जत्रेतील  बाजार,खास जत्रेसाठी  आलेल्या  माहेरवाशिणींची  लगबग, रातच्याला रंगणाऱ्या तमाशातली गाणी बतावणी,कुस्त्यांच्या  फडात शड्डू ठोकत  एकमेकांना  चीत  करणारे  पहिलवान  आणि  याउप्पर एखाद्या फॅशन  शो  मधली शो स्टॉपर  असावी अशी  गाड्यांची  शर्यत.

मंदिरासमोरच्या छोटयाश्या टेकडावर आखले जातात गाड्यांसाठीचे मार्ग. पंचक्रोशीतले गाडे जमा होतात. वर्षभर ज्यांच्यावर मेहनत घेतलीये, ज्यांना  जीव लावलाय, खुराक दिलाय असे बैल जोडले जातात त्यांना.भगवा जरीपटका घेऊन  शर्यतीचा अश्व  दौडत  पुढे जातो आणि त्याच्या मागे , गाड्याला जोडलेले बैल.काही सेकंदांचा थरार फक्त , थोड्याश्या फरकाने एखादा गाडा पडतो मागे आणि डार्विनने म्हटल्या प्रमाणे "Survival of the fittest" च्या तत्वाने  जिंकतो  कुणीतरी एक आणि मागे उरतात , फेटे उडवणारे , टोप्या नाचवणारे तुमच्या आमच्या सारखी माणसं. धुरळा विरत  जातो, जिंकलेल्यांचा आवाज घुमत जातो तेव्हा लक्षात येतं , बेभानपणे गाडा ओढत मालकाला जिंकवलेल्या बैलांना वेसण घालून परतही आणायचं असतं .

त्या तिकडे दूर. तामिळनाडूत सुद्धा असंच काहीस. मोकळे  सोडलेले धिप्पाड बैल आणि त्यांना अडवणारे , अंगावर धावून जात त्या बैलांना वेसण घालणारे तरुण.कुठे गाडयांची शर्यत तर कुठे जल्लीकट्टू.माणसानेच तयार केलेले हे शुद्ध खेळ, त्याचं समर्थन करण्यासाठी लढवलेल्या नवनवीन शकला आणि त्यात धुराळा उडवत धावणारे, भिरभिरणाऱ्या नजरेचे बैल.

इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं असतं माणसाच्या उत्क्रांती विषयी, आगीचा शोध, चाकाचा शोध,शेती,समाज,मग प्राण्यांचा वापर शेतीसाठी. या सगळ्यात माणूस समजतो, त्याच्या चालीरीती समजतात. दहावीच्या पुस्तकात वाचलेला असतो एखादा धडा, बैलावरच्या प्रेमाचा. माहीत असतं बैलपोळ्याला किती आत्मीयतेने भरवतात पुरणपोळी बैलांना आणि मग शर्यतीच्या दिवशी जिवाच्या आकांताने गाडा  ओढणाऱ्या बैलांना पाहिला कि हे सगळं झर्र्कन आठवून जातं.

सोप्पं नसतंच खरंतर शर्यतीचा बैल घडवणं . मेहनत असते,खर्च असतो . वर्षभर बैलांची  शाळा घेतली जाते, बारा सेकंदांच्या "ग्लोरी रन" साठी. डोळे उघडे ठेवून नीट पाहिलं तर लक्षात येतं कि धावतो बैल पण जिंकतो माणूस. अशावेळी  वाटतं, प्रचंड बुद्धिमान असण्याबरोबरच कमालीचा दुटप्पीये माणूस . किती सहजपणे वाकवतो तो निसर्गाला , निसर्गातल्या प्राण्यांना , फार कुशलतेने वापरून घेतो आणि मग एखादा दिवस , एखादा सण किंवा एखादी प्रथा , परंपरा माथी मारतो कृतज्ञता व्यक्त करायला. कमालीच्या धूर्तपणे स्वतःच ठरवतो कुणाला शर्यतीत धावायला लावायचं , कुणाला नांगराला जुंपायचं , कुणाला कत्तलखान्यात द्यायचं. खरंतर किती कठीण आहे दुसर्याच्या आनंदासाठी,प्रतिष्ठेसाठी
स्वतः शर्यतीत धावणं.ज्याक्षणी माणसाला कळलं असेल, आपल्या  कामासाठी प्राण्यांना वापरणं, खरंतर त्याच क्षणी   या शर्यतीची  बीजं रोवली गेली असतील. गाड्याची शर्यत बघताना हे सगळं प्रकर्षाने जाणवत राहतं.

ऊर फुटेस्तोवर धावणार्याला जिंकण्याचं सोयरसुतक नाही.
त्याला कदाचित  समजतही नसेल जिंकणं म्हणजे काय  हरणं म्हणजे  काय. वर्षभर त्याच्यावर घेतल्या जाणाऱ्या मेहनतीने बैलाला जाणवत असेल का, कि आपलं टॅलेंट वेगळं आहे, शर्यतीच्या दिवशी परफॉर्मन्सचं टेंशन त्यालाही असेल का, शर्यतीच्या अश्वाकडे बघत बेभान धावताना त्याला कळत असेल का शर्यत कधी संपली, "जिंकली रे जिंकली" म्हणत मागच्या धुराळ्यातून धावत, टोप्या उडवत येणाऱ्यांचा आनंद त्याला कळत असेल का. मग असं वाटतं ,कदाचित  इतकं सगळं जाणवून फारसा फायदा नाही. गाड्याची शर्यत एक निव्वळ खेळ आहे. माणसाला आनंद मिळावा म्हणून माणसाने , माणसांसाठी तयार केलेला. बैलांनी त्यात जीव  तोडून पण निमूटपणे धावायचं फक्त. म्हणजे लोकांना आनंद मिळेल, टोप्या उडवता येतील, गुलाल उधळता येईल आणि गाडामालकांना प्रतिष्ठेच्या गावगप्पा  सांगता येतील.

निव्वळ एक खेळ. शर्यतीचा खेळ. खेळणारे आपण सगळेच.मग जाणवत जातं आपणही आहोतच या खेळात. वर्षानुवर्षे धावत. आपापला गाडा ओढत धावणारे, तोंडाला फेस येईपर्यंत. आपापल्या शर्यतींचे आपण बैल. आपल्याला खेळवणारं तसं तर कुणीच नाही. तरीही आपण आपली शर्यत धावतो. न  थाबणारी. न संपणारी. कारण शर्यतीत गंमत आहे , थरार आहे , भाव भावना , विभ्रम आहेत , हार-जीत आहे, जीव थकेल, श्वास गुदमरेल , अंग पिळवटेल इतकी मेहनत आहे पण तरीही आपल्याला आपली शर्यत प्रिय आहे.
हे जे आपलं अविरत धावणं आहे , त्याची सुरुवात,शेवट , जिंकण्याचे आयाम, यातल्या नक्की कशाचं भान असतं का आपल्याला? जन्माला आल्यापासून कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा मग स्वतःच्या मनाने किंवा मग दुसऱ्यासाठी कुणासाठी आपण आपली शर्यत धावतो तेव्हा क्वचित कधीतरी जाणवतं का आपल्याला कि आपलाही बैल झालाय.किंवा मग आपणच समजूत घालतो  का  स्वतःची  कि शर्यत अशीच असते त्यात जीव तोडून धावताना कशाचंच भान नसतं आणि जेव्हा भान येतं तोपर्यंत शर्यत संपलेली तरी असते किंवा आपण बाहेर तरी फेकलो गेलेलो असतो.

शर्यत निरर्थक आहे का? नाही धावलो आपण आपली शर्यत तर काय?, असले मूलभूत प्रश्न आपल्याला पडतच नाहीत. किंबहुना वर्षानुवर्षे शर्यत धावणाऱ्या प्रत्येकाने हे प्रश्न नव्या भिडूला पडूच नयेत याची तजवीज केलेली असते. ब्रीदवाक्य होऊन जातं,"कीप रनिंग". थोडं थांबून सिंहावलोकन करायचं याचंसुद्धा भान राहत नाही. मॅस्लोने त्याच्या जगप्रसिद्ध "थेरी ऑफ नीड्स"मध्ये म्हटल्याप्रमाणे आधी भौतिक मग ऐहिक मग सामाजिक मग आत्मिक सुखासाठी,गरजांसाठी, अपेक्षांसाठी,ध्येयासाठी माणूस धावत जातो अविरत शर्यत.

इतकं सारं मुक्तचिंतन करूनही काय साधणार आहे. शर्यत अपरिहार्य आहे. ती सत्य आहे. मनुष्याच्या पिढ्यानपिढ्या स्वतःशी,काळाशी, तर्कांशी ,सर्वंकष सत्तांशी ही शर्यत खेळल्या आहेत आणि म्हणूनच आज उभ्या आहेत जिंकून.शर्यत अनादी आहे अनंत आहे. डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा शर्यतीचंच रूप आहे. शर्यत असेल तर थरार आहे,जिवंतपणा आहे,चुरस आहे,स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आहे आणि विजयाचा आनंद आहे. शर्यत नुसता खेळ नाही ती एक जिवंत रसरशीत भावना आहे.

जन्मापासून अविरत धावताना हि शर्यत का आहे आणि कुठवर आहे हे जोपर्यंत आपल्या ध्यानात आहे तोपर्यंत आपण माणूस म्हणून जगू. ज्याक्षणी ह्याचा विसर पडेल त्याक्षणी मग त्या बैलजोडीत आणि आपल्यात फारसा फरक उरणार नाही.

-अभिषेक राऊत


Friday, November 18, 2016

म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णय



आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते. संध्याकाळी तोच डोसे विकतो. दिवसभर माणसांच्या, गाड्यांच्या गर्दीत ओथंबणाऱ्या चौकाच्या मध्यभागी, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा योग्य ठिकाणी चौकाच्या नावाचा बोर्ड असतो. ती त्या चौकाची ओळख असते.
ती त्या चौकात रोज सकाळी येते. ठरलेल्या वेळेला. तिच्या हातात एक झाडू असतो आणि पाठीला मोठ्ठालं गोणपाट. चार रस्त्यांच्या कडेकडेने झाडते आणि गोळा होणार कचरा गोणपाटात भरत जाते. एका कोपऱ्यातल्या टपरीपासून सुरुवात करत. ती झाडत जाते आणि उडणाऱ्या धुळीसोबत गोळा होत जातात असंख्य गुटख्याची पाकीटं, सिगारेटींची थोटकं आणि चुरगाळून टाकलेले कागद. ती सारं काही पाठीवरच्या गोणपाटात भारत जाते आणि पुढे सरकते. पुढे सरकण्याआधी टपरीवाला तिच्या हातात एक विडी टेकवतो. वाण्याच्या दुकानासमोर ती थोडं जास्तवेळ थांबून नीटपणे झाडते. तिने रस्ता झाडल्याशिवाय तो त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या मांडून ठेवत नाही. दुकानासमोरचा सगळा कचरा गोणपाटात भरल्यावर  काही वेळ त्याच्या पायरीवर रेंगाळते. गल्ल्यावर बसलेला शेठ ते पाहून उठतो. एका हाताने नाकाला लावलेला रुमाल  तसाच ठेवून दुसऱ्या हाताने दहा-वीसची एखादी नोट काढून तिच्या हातात टेकवतो. ती पुढे सरकत राहते झाडू आणि गोणपाट घेऊन. काय काय पडलेलं असतं रस्त्यांच्या कडेला. प्लास्टिकच्या पिशव्या, रात्री  भर चौकात दारू पिऊन फेकून दिलेल्या बाटल्या, चुरगाळून फेकलेली जुनी बिलं,तिकिटं, वापरून फेकलेल्या असंख्य गोष्टी ज्यात टूथपेस्टच्या संपलेल्या ट्यूबपासून ते कॉन्डोमच्या रिकाम्या पाकिटापर्यंत सगळं काही असतं. ती सगळ्यांवर आपला झाडू फिरवत जाते आणि गोणपाट भारत जाते. चौकाच्या एका कोपऱ्यात पोहे, मेदुवडे विकणारा असतो. त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. गर्दी सहजपणे तिला वाट करून देते. लोक तोंड फिरवतात, काही तोंड वाकडं करतात, काही एका हाताने आपली खाण्याची प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. ती सहजपणे पुढे जाते, कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा ज्यात लोकांच्या खरकट्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, अर्धवट उरलेला सांबार, फेकून दिलेली चटणी असं सारं काही असतं. ते ती उचलते आणि आपल्या गोणपाटात रिकामं करते आणि पुढे जात राहते. त्याच शेजारी फुलवली आजी दुकान मांडत असते. शिळी फुलं गोणपाटात टाकून ती  पुढे सरकते. कधी कधी आजी तिच्या हातात एखादा गजरा ठेवते तेव्हा ती खुश होते. एका कोपऱ्यात उभं राहून ती स्वच्छ झालेल्या चौकाचा अंदाज घेते. निघताना तिला कधी कधी  एखाद प्लेट मेदुवडा किंवा पोहे मिळतात किंवा गरमागरम चहा करणाऱ्या पोराच्या हातून एखाद कप चहा. त्याने चहा दिला कि खूपशा प्रेमाने ती त्याच्याकडे पाहते. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवताना सहजपणे ती त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून जातेकदाचित तिला तिचा नातू आठवत असावा. चहा आटोपला कि चौकाच्या एका कोपऱ्यात काळी छत्री उघडून चाम्भाराचं सामान घेऊन बसलेल्या आजोबांच्या शेजारी बसून टपरीवाल्याने दिलेली विडी ओढते. रोज सकाळी तीन चार चौक झाडून पन्नासेक रुपये कमावणारी  म्हातारी  आमच्या चौकाचं अविभाज्य अंग झालेली असते. मला वाटत असतं कचरा गोळा करणाऱ्या त्या आज्जीला आणि चौकाला एकमेकांशिवाय करमत नसेल.
 एक दिवशी नाश्ता करताना मला लक्षात येतं, एका कोपऱ्यात ती एकटीच बसलीये, रस्त्याकडे पाहत. निरपेक्ष नजरेने. मी आधी तिच्याकडे पाहतो आणि मग रस्त्याकडे. मला दिसतं रोड स्वीपिंग मशीन. दहा मिनिटात ते मशीन चारी रस्ते झाडून काढतं. धुळीचा एक कणसुद्धा उडत नाही. सगळा रस्ता स्वच्छ होत जातो. टपरीवाल्याला एक विडी द्यावी लागत नाही, शेठला उठून दहा रुपये द्यावे लागत नाहीत, चहावाल्याचा रोजचा एक फुकटचा चहा वाचतो. मला आठवतं पेपरमध्ये स्वीपिंग मशीनबद्दल वाचलेलं. वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने असे १० मशिन्स मागवलेले असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे ते मशीन अक्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याश्या अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूर दूर जाऊ लागते. मला जाणवतं कि अरे आपल्याला उगाचंच असं वाटत होतं कि कचरा गोळा करणारी ती म्हातारी आणि तो चौक यांना एकमेकांशिवाय करमणार  नाही.
त्यानंतर ती म्हातारी मला पुन्हा दिसली नाही. बाकी सगळं  तसंच आहे. म्हातारी कुठे तरी नामशेष झाली. शहराला सिंगापूर बनवायचं तर तेवढी काळ सोसायलाच हवी. कधी कधी असं वाटतं , उतरंडीच्या वर कुठेतरी असणाऱ्या  चार डोक्यांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय फार खाली राहिलेल्या कुणाला बघता बघता कसा नामशेष करेल सांगता येत नाही.

-अभिषेक राऊत