मुळात ही कल्पनाच ग्रेट आहे. ते म्हणतात ना जे न देखे रवी ते देखे कवी. त्यात जर तो कवी म्हणजे विंदा करंदीकर असतील तर सांगायलाच नको.
तर ही कविता म्हणजे दोन महान सृजनशील माणसांमधला संवाद आहे. एकाच वेळेला दोघांचं एकमेकांच्या निर्मितीबद्दल असणारं कुतूहल आणि त्या कुतुहलातून येणारा छानसा संवाद म्हणजे ही कविता.
बरं हा संवाद होतो कुठे तर तुकारामांच्या दुकानात. शेक्सपियर अगदी सहज म्हणून जातो , मी भलेही मानवी भावभावनांचा संसार मांडला असेल पण बा तुकारामा, जे शब्दातीत तू शब्दांत मांडलेस त्याची तोड नाही .
शेवटच्या काही कडव्यांमध्ये तुकाराम म्हणतात , ही सगळी शब्दपीट व्यर्थच. शेवटी जाऊन भगवंताला मिळणं हेच खरं सत्य. आणि मग क्षणार्धात त्यांना आठवण येते आवडेची. संसाराची. संसारात राहून विठ्ठलाची प्रीती करणं कठीणच.
तर अशी ही शेक्सपिअर आणि तुकारामांच्या भेटीची कहाणी, विंदानी ती फार सुरेख रंगावलीये