Sunday, January 17, 2021

तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला -विंदा करंदीकर - रसग्रहण

 मुळात ही कल्पनाच ग्रेट आहे. ते म्हणतात ना जे न देखे रवी ते देखे कवी. त्यात जर तो कवी म्हणजे विंदा करंदीकर असतील तर सांगायलाच नको.

तर ही कविता म्हणजे दोन महान सृजनशील माणसांमधला संवाद आहे. एकाच वेळेला दोघांचं एकमेकांच्या निर्मितीबद्दल असणारं कुतूहल आणि त्या कुतुहलातून येणारा छानसा संवाद म्हणजे ही कविता. 

बरं हा संवाद होतो कुठे तर तुकारामांच्या दुकानात. शेक्सपियर अगदी सहज म्हणून जातो , मी भलेही मानवी भावभावनांचा संसार मांडला असेल पण बा तुकारामा, जे शब्दातीत तू शब्दांत मांडलेस त्याची तोड नाही . 

शेवटच्या काही कडव्यांमध्ये तुकाराम म्हणतात , ही सगळी शब्दपीट व्यर्थच. शेवटी जाऊन भगवंताला मिळणं हेच खरं सत्य. आणि मग क्षणार्धात त्यांना आठवण येते आवडेची. संसाराची. संसारात राहून विठ्ठलाची प्रीती करणं कठीणच.


तर अशी ही शेक्सपिअर आणि तुकारामांच्या भेटीची कहाणी, विंदानी ती फार सुरेख रंगावलीये

Sunday, January 10, 2021

पितात सारे गोड हिवाळा - रसग्रहण

 पितात सारे गोड हिवाळा - बा. सी. मर्ढेकर 

बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर हे मराठीतले एक नामवंत कवी. मर्ढेकरांचा जन्म १९०९ चा तर १९५६ ला त्यांचं निधन झालं. उण्यापुऱ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठी कवितेला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. मर्ढेकरांच्या कवितेची ठळक लक्षणं सांगायची झाली तर, नावीन्यपूर्ण प्रतिमांचा वापर , रचनेमधील नवता आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर शहरी जीवनाच्या जाणिवांचे चित्रण. हे करताना त्यांनी प्रस्थापित मराठी कवितेचा ढाचा बदलला आणि स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. 

आजची त्यांची कविता , पितात सारे गोड हिवाळा ही मुंबईतल्या हिवाळ्याच्या दिवसाची कविता. पहाट आणि सकाळ ह्यांच्या सिमरेषेवरची ही कविता आणि त्यासोबत आजूवाजुला घडणारे बदल मर्ढेकरांनि टिपलेत. 

वर सांगितलेली त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये या कवितेत प्रकर्षाने जाणवतात. 

पहाटेच्या मुंबईला न्हायलेल्या गर्भवतीच्या सौंदर्याची उपमा देणे असो किंवा मग झोपेतून जाग येण्याला , "डोकी अलगद घरे उचलती , काळोखाच्या उशिवरूनी" असं म्हणणं असो. प्रतिमांमधला नावीन्यपूर्णपणा दिसतो तो असा . 

मर्ढेकरांच्या आधीची मराठी कविता छंदोबद्ध, गेय अशी होती . मर्ढेकरांच्या कवितेतील रचनेचं वेगळेपण या कवितेत दिसतं ते पहिल्या कडव्यातच. 

तर अशी ही कविता पहाटेच्या मुंबई शहराचं वर्णन करणारी आणि मग शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो ,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा

अजस्त्र धांदल क्षणात देई , जिवंततेचे अर्घ्य भास्करा. 

साधारण १९४०-४५ च्या दरम्यान टिपलेली मुंबईच्या पोटातली ही धांदल , मुंबईचं हे स्पिरिट , मुंबईची धावपळ आजही तशीच आहे. मर्ढेकर आज नाहीत, १९४०-५० ची मुंबई आज नाही पण मुंबईची धांदल मात्र आजही आहे आणि उद्याही राहील आणि उगवत्या सूर्याला जिवंततेचे अर्घ्य देत राहील.


- अभिषेक राऊत