काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!
तो पुन्हा पुन्हा भेटत राहतो काश्मीरच्या अक्ख्या प्रवासात. कधी कावा पिताना, कधी सफरचंद खाताना. 'अमन कि आशा' त्यालाही असते पण त्यामागची किंमत गेली अनेक वर्षं तो चुकवत असतो. पर्यटन वाढतं, त्याला रोजगार मिळतो, नवीन संधी मिळतात पण तरीही जुन्या, खोलवर झालेल्या जखमांचे घाव भळभळत राहतात.
गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगरावर उभं राहून जेव्हा तो दाखवतो "वो है पाकिस्तान दाये तरफ और बायें तरफ उस पार आझाद कश्मीर!!" आपल्याला कसनुसं होतं. पाकव्याप्त काश्मीर आपण शिकलेलो असतो ते अचानक आझाद कश्मीर बनून समोर येतं. वर्षानुवर्षं शिकलेला इतिहास, भूगोल सगळं उलटसुलट होऊन समोर येत राहतं. पोम्पोरेचं केशर घेऊन, सोपोरे ची सफरचंद खात, गुलमर्गमध्ये काढलेले बर्फाळ 'slefies' बघत आपण परतीच्या प्रवासाला लागतो. मनात मात्र त्याचं वाक्य घुमत असतं, "जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो". खास काश्मीरचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा यायला आपण काही दिलीप पाडगावकर नसतो. आपल्यापुरता आपण काश्मीरचा प्रश्न संपवलेला असतो. त्यासाठीच तर आपल्याला शिकवलेला असतं, "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दूध मंगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे"
-अभिषेक राऊत